गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान हवाई क्षेत्रात असणारी बंदी आज, मंगळवारी सकाळी पाकिस्तान सरकारने उठविली आहे. त्यामुळे भारतीय विमान कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाकिस्तानने हवाई क्षेत्रातील बंदी उठवल्यामुळे भारतीय विमाने पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून प्रवास करु शकणार आहेत. पाकिस्तानने घेतलेल्या या निर्णयामुळे एअर इंडियाला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण पाकिस्तानने घातलेल्या हवाई क्षेत्रातील बंदीमुळे एअर इंडियाचे जवळपास ४९१ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. अनेक आंतरराष्ट्रीय विमानाचे मार्ग बदलण्यात आले होते. अखेर मंगळवारी पहाटे १२.४१ मिनिटांनी पाकिस्तानने हवाई क्षेत्रातील बंदी उठविली. त्यामुळे या मार्गातून पुन्हा सामान्यरित्या प्रवासाला सुरुवात होणार आहे. यासंबंधी पाकिस्तानच्या नागरी उड्डाण मंत्रालयाकडून याबाबत एअरमेन (NOTAM) नोटीस जारी केली आहे.
Pakistan Civil Aviation Authority issues notice to airmen (NOTAM), states "with immediate effect Pakistan airspace is open for all type of civil traffic on published ATS (air traffic service) routes". pic.twitter.com/UMuOnK3WSg
— ANI (@ANI) July 16, 2019
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी किर्गिस्तानच्या बिश्केक येथे संघाई कोऑपरेशन ऑर्गनाइजेशन(SCO) च्या शिखर संमेलनाला उपस्थित राहिले होते. त्यावेळी बिश्केक येथे जाण्यासाठी पंतप्रधान पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून प्रवास करणार होते. मात्र ऐनवेळी भारताने आशियाई हवाई मार्गातून बिश्केकचा प्रवास केला.
यासाठी घातलेली बंदी
बालाकोट हवाई हल्ल्यांनंतर पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र बंद ठेवले आहे. हे हवाई क्षेत्र खुलं करण्यासाठी आता पाकिस्तानकडून अट ठेवण्यात आली होती. जोपर्यंत भारतीय वायुसेनेच्या हवाई तळांवरून (फॉरवर्ड बेस) लढाऊ विमानांना हटवले जात नाही तोपर्यंत भारताच्या व्यापारी उड्डाणांसाठी पाकिस्तान आपले हवाई क्षेत्र खुले करून देणार नाही. पाकिस्तानचे हवाई उड्डाण खात्याचे सचिव शाहरुख नुसरत यांनी एका संसदीय समितीला ही माहिती दिली. भारतीय हवाई दलाने पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी बालाकोटमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. यानंतर २६ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी त्यांचा हवाई मार्ग बंद केला होता.