लग्न करण्यासाठी तुम्हाला ओळखपत्राची गरज लागत नाही. मात्र, आता सोनं जर खरेदी करायचे असेल, तर तुम्हाला ओळखपत्राची गरज लागणार आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्रालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची आता देशभरातील सराफ व्यापाऱ्यांकडून अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे आता सोने, चांदी, हिरे, प्लॅटिनम आणि मौल्यवान रत्नांची खरेदी रोख पैसे देऊन करायची असल्यास तुम्हाला आधारकार्ड आणि पॅनकार्ड दाखवणे बंधनकारक असणार आहे. अन्यथा देशातील कोणत्याही ज्वेलर्समध्ये तुम्हाला सोने खरेदी करता येणार नाही.
KYC ही सादर करावे लागणार
विशेष म्हणजे आगामी काळात सोने-चांदीचे दागिने खरेदीसाठी आर्थिक व्यवहारांप्रमाणे आता KYCही सादर करावे लागणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर आता सोने व्यापारी अगदी दोन लाखांपर्यंतच्या रोखीच्या व्यवहारांसाठीही KYCची मागणी करु लागले आहेत. त्याचप्रमाणे आता दोन लाखांपेक्षा कमी रकमेच्या व्यवहारासाठी ग्राहकांकडून पॅनकार्ड मागितले जात आहे. जेणेकरून आपल्याला भविष्यात ईडीच्या कारवाईला सामोरे जावे लागणार नाही, याची काळजी सराफ व्यापारी घेत आहेत.
…अन्यथा तुरुंगवासाची शिक्षा
केंद्रीय अर्थमंत्रालयाने २८ डिसेंबरला सोन्याच्या व्यापाऱ्याला कायद्याच्या अखत्यारित आणल्याची अधिसूचना जारी केली होती. त्यामुळे आता ईडीला कोणत्याही कागदपत्रांशिवाय सोन्याच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांची तपासणी करण्याचे अधिकार मिळाले आहेत. त्यामुळे आता या आदेशानुसारच पेढी आणि सोने व्यापाऱ्यांना १० लाखांपेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारांचे तपशील ठेवणे बंधनकारक असणार आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास तीन ते सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
हेही वाचा – हेडफोन्स लावून गाणी ऐकणे बेतले तरुणाच्या जीवावर