“जे भ्रष्टाचार करताना पकडले जातील त्यांना त्यांची योग्य जागा दाखवण्यात येईल,” असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रांची मध्ये आपल्या भ्रष्टाचारमुक्त सरकारच्या आश्वासनाचा पुनरुच्चार केला. शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजनेचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज झारखंड मध्ये आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
हा केवळ ट्रेलर आहे – पंतप्रधान
ते पुढे म्हणाले की, “भ्रष्टाचारावर सर्वात मोठी कारवाई सुरु झाली आहे. जे लोक जनतेला लुटतील त्यांना त्यांची योग्य जागा दाखवण्यात येईल.” मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील १०० दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “हा केवळ ट्रेलर आहे. संपूर्ण चित्रपट अजून बाकी आहे.”
यांना मिळणार योजनेचा लाभ
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेअंतर्गत १८ ते ४० वर्षांमधील शेतकऱ्यांना वयाची ६० वर्षे पूर्ण केल्यानंतर दर महिन्याला ३ हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. पुढील तीन वर्षांसाठी या योजनेसाठी १०,७७४ रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सध्या वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या शेतकऱ्यापासून ४० वर्षाच्या शेतकऱ्यांपर्यंत सर्व लहान आणि मध्यम गटातील शेतकरी या योजनेसाठी अर्ज करु शकतात.