मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी त्यांच्या ‘लेट मी से इट नाऊ’ या पुस्तकामध्ये २६/११च्या दहशतवादी कारवायांसंदर्भात काही धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यात सगळ्यात मोठा खुलासा म्हणजे अजमल कसाबला तो हिंदू असल्याचं भासवायचं होतं आणि हा सगळा हल्ला हिंदू दहशतवादी संघटनांनी घडवल्याचं चित्र उभं करण्याचा कट होता, असं मारिया यांनी या पुस्तकात म्हटलं आहे. मात्र, त्यावर भाजपकडून मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर टीका केली आहे. ‘२६/११च्या हल्ल्यावेळी हिंदू दहशतवादाच्या नावाने जनतेची फसवणूक करण्याचा हा काँग्रेसचा कट होता’, असं पियुष गोयल म्हणाले आहेत.
‘हिंदु दहशतवादाचे खोटे आरोप’
राकेश मारियांनी केलेल्या या दाव्यामुळे मोठी चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून याच मुद्द्यावरून काँग्रेसवर निशाणा साधण्यात आला आहे. यासाठी पियुष गोयल यांनी थेट तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरम यांच्यावरच निशाणा साधला आहे. ‘मारियांनी ही सगळी माहिती आत्ताच का सांगितली? ते जेव्हा सेवेत होते, तेव्हाच त्यांनी हे सांगायला हवं होतं. काँग्रेस आणि युपीएकडून तेव्हा हा कट रचण्यात आला होता. चिदम्बरम यांच्या सांगण्यावरून हे सगळं करण्यात आलं होतं. काँग्रेसने हिंदू दहशतवादाचे खोटे आरोप करून देशाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचे परिणाम त्यांना २०१४ आणि २०१९मध्ये भोगावे लागले. मला वाटतं दहशतवादाचा कोणताही धर्म असत नाही. दहशतवादी हा दहशतवादी असतो’, असं मारिया यावेळी म्हणाले.
#WATCH Union Minister Piyush Goyal speaks on reported excerpt from the Ex-Mumbai Police Commissioner Rakesh Maria's book that Kasab would have died as Samir Dinesh Chaudhari with 'red thread around his wrist' had LeT succeeded in their plan pic.twitter.com/cxNTIVVF5K
— ANI (@ANI) February 18, 2020
राकेश मारियांच्या या पुस्तकावरून आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कसाबच्या हातात हिंदु धागा बांधण्यात आला होता. तसेच, त्याला तिथेच मृत्यू आला असता, तर त्याला समीर चौधरी म्हणून मृत्यू आला असता. त्यातून हा हिंदू दहशतवादी संघटनेने केलेला हल्ला होता, असं भासवलं गेलं असतं, असं देखील मारियांनी या पुस्तकात नमूद केलं आहे.