वाराणसीमध्ये कॉरिडोरच्या नावाखाली शेकडो मंदिरे उद्धवस्त करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इशाऱ्यानंतर बाबा विश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी पैसे आकारण्यात येत आहे. औरंगजेब काशीच्या गल्लीबोळात अत्याचार करण्यासाठी उतरला होता. हिंदूची मंदिरे तोडली जात होती. तेव्हा हिंदू लोकांनी विरोध केला होता. जे काम औरंगजेब करु शकला नाही, ते काम नरेंद्र मोदी करत आहेत. नरेंद्र मोदी औरंगजेबाचे आधुनिक अवतार आहेत, अशी टीका काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केली आहे. वाराणसी येथे एका कार्यक्रमात बोलताना निरुपम यांनी मोदींवर निशाणा साधला. दरम्यान, बाबा विश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी ५५० रुपयांचा कर आकारला जातो. हिंदू रक्षण करण्याचा दावा करणारे मोदी काशीमध्ये मंदिरे तोडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात अहंकार आहे. काशीची संस्कृती हिंदू लोकांनी औरंगजेबापासून वाचवली होती. आज औरंगजेबाचे काम नरेंद्र मोदी करत आहे, असही निरुपम यावेळी म्हणाले.
#WATCH Sanjay Nirupam, Congress, in Varanasi: I feel that the person that people here have chosen- that Narendra Modi is actually the modern incarnation of Aurangzeb. (07.05.2019) pic.twitter.com/u6x0UsgU3D
— ANI UP (@ANINewsUP) May 8, 2019
स्मृती इराणींचा पराभव निश्चित
भाजपावाले नेहमी खोटं बोलून चुकीच्या गोष्टी लोकांपर्यंत पसरवण्याचं काम करतात. मनमोहन सिंग सरकारमध्येही सर्जिकल स्ट्राईक झाले होते. काँग्रेसच्या शासनकाळातही सैन्य पाकिस्तानात घुसलं होतं. मोदी याचं राजकारण करत आहेत, असा आरोप निरुपम यांनी केला. तर देशाचे संरक्षणमंत्री, परराष्ट्र मंत्री आणि रेल्वेमंत्री निवडणूक लढवत नाहीत. त्यांच्याजागी सनी देओल, साध्वी प्रज्ञा ठाकूर, मनोज तिवारी अशांना भाजपाकडून निवडणूक लढवावी लागत आहे. जर देशात मोदींची लाट असती तर निर्मला सितारामन, सुषमा स्वराज, पियुष गोयल यांनी निवडणूक लढवली असती असा टोला निरुपम यांनी भाजपाला लगावला. तसेच प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्या ताकदीमुळे भाजपामध्ये भितीचं वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक फेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल केले जात आहे, असं निरुपम यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांच्यावर केलेल्या विधानामुळे अमेठी लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार स्मृती इराणी जवळपास अडीच लाख मतांनी पराभूत होणार हे निश्चित करण्याचं काम मोदींनी केलं असा दावा संजय निरुपम यांनी केला.
हेही वाचा –
भाजप-सेनेकडूनच आचारसंहितेचा भंग – संजय निरुपम