नुकतेच अर्थव्यवस्थेतील नोबेल जाहीर झालेले भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांच्यावर टीकात्मक टिप्पणी करणारे भाजपचे खासदार आणि केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यावर काँग्रेसच्या पूर्वांचल सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. ‘तुमची कॉमेडी सर्कस बंद करा, अर्थव्यवस्था सुधारा’, अशा शब्दांत त्यांनी पियुष गोयल आणि भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. शनिवारी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून त्यांनी ही टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या घसरणीवरून राजकीय वर्तुळात मोठा वाद सुरू झाला आहे.
काय आहे वाद?
अभिजित बॅनर्जी यांनी नोबेल जाहीर झाल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेवर भाष्य केलं होतं. ‘भारतीय अर्थव्यवस्था कठीण परिस्थितीतून जात असून यातून सावरायला जास्त काळ लागू शकतो’, अशा आशयाची टिप्पणी बॅनर्जी यांनी केली होती. त्यानंतर केंद्र सरकारवर मोठी टीका होऊ लागली होती. या पार्श्वभूमीवर पियुष गोयल यांनी अभिजित बॅनर्जी यांच्यावरच टीका केली होती. ‘अभिजित बॅनर्जी यांनी २०१९च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी काँग्रेसने मांडलेल्या न्यूनतम आय योजनेला पाठिंबा दिला होता. पण काँग्रेसला मतदारांनी नाकारलं आहे. त्यामुळे अभिजित बॅनर्जी यांनी मांडलेल्या मताला फार किंमत देण्याची आवश्यकता नाही’, असं पियुष गोयल म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्याचा प्रियंका गांधींनी आपल्या ट्वीटमध्ये समाचार घेतला आहे.
भाजपा नेताओं को जो काम मिला है उसको करने की बजाय दूसरों की उपलब्धियों को झुठलाने में लगे हैं। नोबेल पाने वाले ने अपना काम ईमानदारी से किया, नोबेल जीता।
अर्थव्यवस्था ढही जा रही है। आपका काम उसको सुधारना है न कि कॉमेडी सर्कस चलाना।https://t.co/DfZXAMmaxg
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) October 19, 2019
पियुष गोयल यांच्यावर टीका करताना प्रियंका गांधी म्हणतात, ‘भाजप नेत्यांना जे काम सोपवलं गेलंय, ते सोडून ते दुसऱ्याच गोष्टींवर टीका करण्याच्या मागे लागले आहेत. ज्यांना नोबेल मिळालं, त्यांनी त्यांचं काम प्रामाणिकपणे केलं आणि नोबेल जिंकलं. अर्थव्यवस्थेची परिस्थिती खालावली आहे. तुमचं काम अर्थव्यवस्थेला सुधारणं आहे, कॉमेडी सर्कस करणं नाही.’