काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. ‘मी नरेंद्र मोदींना घाबरत नाही. मी स्वच्छ आहे. मला कुणी हात लावू शकत नाहीत. मला कुणीतरी गोळी मारू शकतं, पण हात लावू शकत नाही. मी एकटा उभा राहीन. या बाबतीत मी त्यांच्यापेक्षा जास्त कट्टर आहे. ज्यासाठी हा देश ७० वर्षांपूर्वी लढला होता, तेच आता पुन्हा घडतंय. आत्ता तुम्हाला मी काय बोलतो ते कळणार नाही, पण जेव्हा गुलाम व्हाल, तेव्हा कळेल’, असं ते म्हणाले. शेतकरी आंदोलनाबाबत दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी या मुद्द्यावरून टीका केली आहे.
‘हे इतक्यात थांबणार नाहीत. यांचं ध्येय आहे की भारतातल्या शेती व्यवस्थेला संपवून टाकणं. आणि देशाती शेतीव्यवस्था काही मंडळींच्या हाती देऊन टाकणं. ही तीन विधेयकं रद्द झाली, तरी मोदी एवढ्यावरच थांबतील, असं समजू नका. आपल्याला मोदींना थांबवायचं आहे’, अशा शब्दांत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
There is tragedy unfolding today in country, govt wants to ignore issue & misinform the country. I'm not going to speak about farmers alone as it is only part of tragedy. It's important for youngsters. This is not about present but about your Future: Congress leader Rahul Gandhi pic.twitter.com/gBlGVxFXnq
— ANI (@ANI) January 19, 2021
मी १०० टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी
‘शेतीत पुन्हा पारतंत्र्याच्या वेळची परिस्थिती निर्माण केली जात आहे. ४ ते ५ लोकांच्या हातात देशाची शेतीव्यवस्था देण्याचा प्रयत्न सुरू आहे. शेतकरी पंतप्रधानांपेक्षा जास्त हुशार आहेत. त्यांना कळतंय की काय घडतंय आणि काय चुकतंय. तिन्ही शेती कायदे मागे घेणे हाच यावरचा एकमेव उपाय आहे. याबद्दल ९ वेळा सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा झाली आहे. पण निष्कर्ष निघाला नाही. आंदोलन करणारे शेतकरी देशाच्या ६० टक्के लोकांना अन्नधान्य पुरवत आहेत. मी १०० टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. सगळ्यांनी पाठिंबा द्यायला हवा. कारण ते आपल्यासाठी भांडत आहेत’, असंही राहुल गांधी म्हणाले.
अर्णब गोस्वामींना माहिती दिली कुणी?
दरम्यान, यावेळी रिपल्बिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याकडे भारतीय सैन्य तळावरच्या हल्ल्याची गोपनीय माहिती कशी आली? असा सवाल देखील राहुल गांधींनी यावेळी उपस्थित केला. ‘पत्रकारांना देशाची गोपनीय माहिती देणं हा गुन्हा आहे. ही माहिती नक्की कुणी दिली, हे समोर आलं पाहिजे. हे स्वत: पंतप्रधान होते, की गृहमंत्री होते की संरक्षण मंत्री होते, ते समोर आलं पाहिजे’, असं देखील राहुल गांधी म्हणाले.