गेल्या काही महिन्यांमध्ये PNB, PMC आणि Yes Bank या दोन बँकांवर आर्थिक अनियमिततेच्या कारणामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात RBI ने कठोर आर्थिक निर्बंध लादले आहेत. यामुळे या बँकांच्या खातेदारांवर मोठं संकट ओढवलं आहे. असं असतानाच आता यात अजून एका बँकेची भर पडली आहे. लक्ष्मीविलास बँक लिमिटेडवर आज रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातल्याची घोषणा केली आहे. येत्या ३० दिवसांसाठी हे निर्बंध घालण्यात आले आहेत. यासंदर्भात रिझर्व्ह बँक ऑफि इंडियाच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून ट्वीट देखील करण्यात आलं आहे. यामध्ये आरबीआयच्या अधिसूचनेचा समावेश आहे. दरम्यान, येत्या महिन्याभरात म्हणजेच १७ डिसेंबरपर्यंत लक्ष्मीविलास बँकेच्या खातेदारांना खात्यातून फक्त २५ हजार रुपयेच काढता येणार आहेत.
The Lakshmi Vilas Bank Ltd. placed under Moratoriumhttps://t.co/wW8DaBygJX
— ReserveBankOfIndia (@RBI) November 17, 2020
गेल्या तीन वर्षांपासून लक्ष्मीविलास बँकेला मोठा तोटा झाल्याचं बँकेच्या व्यवहारांवरून दिसून आलं. यामध्ये बुडीत कर्जांचं प्रमाण जास्त होतं. त्यासोबतच गेल्या ६ महिन्यांत लक्ष्मीविलास बँकेतून मोठ्या प्रमाणात पैसे काढण्यात आल्याचं रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे. व्यवसाय वाढवण्यासाठी आणि बँकेच्या प्रगतीसाठी बँक प्रशासनाने राबवलेले धोरणं अपयशी ठरवल्यामुळेच बँकेवर ही वेळ ओढवल्याचे ताशेरे देखील रिझर्व्ह बँकेने ओढले आहेत. त्यामुळेच ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र, त्यासोबतच खातेदारांना आरबीआयने दिलासा दिला आहे. खातेदारांनी घाबरून जाण्याचं कारण नसून त्यांच्या ठेवी सुरक्षित असल्याचं आरबीआयने म्हटलं आहे. खातेदारांच्या ठेवींना विमा संरक्षण असून लक्ष्मीविलास बँक दुसऱ्या बँकेत विलीन करण्यासंदर्भात देखील आरबीआय विचार करत असल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे.