मध्य प्रदेशच्या भोपाल मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. साध्वी प्रज्ञा आज भोपाळ मतदारसंघासाठी उमेदवारीचा अर्ज भरणार आहेत. परंतु, त्या सध्या दुसऱ्याच कारणासाठी पुन्हा चर्चेच्या विषय ठरल्या आहेत. त्यांनी ‘आजतक’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दावा केला आहे की, गोमुत्रामुळे त्यांचा कर्करोग बरा झाला आहे. यावेळी त्यांनी गाईचं आपल्या आयुष्यात किती महत्त्व आहे, याचं विश्लेषण केलं. त्यांचं हेच विश्लेषण सध्या चर्चेचं विषय ठरत आहे. सोशल मीडियावर त्यांच्या या दाव्यावरुन चर्चा रंगली आहे.
मुलाखती दरम्यान गाई संदर्भात प्रश्न विचारला गेला तेव्हा साध्वी प्रज्ञा ठाकुर यांनी सांगितलं की, मी कर्करोगग्रस्त होती. परंतु, गोमुत्रमुळेच माझा कर्करोग बरा झाला. गोमुत्र आणि पंचगव्य यांपासून बनलेल्या औषधांमुळे माझा कर्करोग बरा झाला. पंचगव्यमध्ये शेण, दही, गोमुत्र सारखे आणि ५ पदार्थ असतात. यामुळे विविध आजार बरे होतात.
साध्वी प्रज्ञा यांनी सांगितलं की, ‘गायीच्या पाठीवरुन हात फिरवला तर तुमचा ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतो. त्याचबरोबर गायीच्या मुखापासून पाठपर्यंत हात फिरवला तर दोघांना त्यापासून सुख मिळते. याशिवाय जर गायीच्या पाठिवरुन मुखापर्यंत हात फिरवला तर त्याचा त्रास गायीला होता. मात्र आपलं ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतो. आपल्यासाठी गाय स्वत: त्रास सहन करते. या गोष्टीची समर्थन वैज्ञानिकांनीही केली आहे.’