सॅमसंगची जगातील सर्वात मोठी फॅक्टरी नोएडातील सेक्टर ८१मध्ये उभारण्यात येणार आहे. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फॅक्टरीचे उद्घाटन केले. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष पहिल्यांदाच भारत भेटीवर आहेत. अध्यक्षांसोबत त्यांच्या पत्नी देखील भारत दौऱ्यावर आल्या आहेत. उत्तरप्रदेशमधील नोएडामध्ये सेक्टर ८१मध्ये जवळपास ३५ एकरवर सॅमसंगची फॅक्टरी उभारण्यात येणार आहे. त्यामुळे भारतातील मोबाईल फोनच्या मार्केटमध्ये मजल मारण्यासाठी सॅमसंगला मोठी मदत होणार आहे. १९९६मध्ये नोएडामध्ये सॅमसंगने पहिला प्लॅन्ट उभा केला. त्यानंतर १९९७ साली सॅमसंगने टीव्ही बनवण्याचा प्लॅन्ट उभा केला. तर, २००५ साली मोबाईल मार्केटमध्ये कंपनीने पाऊल ठेवले. २०१२ साली सॅमसंगने गॅलॅक्सी एस३ मार्केटमध्ये आणला आणि त्यानंतर कंपनीने भारतातील मार्केटमध्ये नाव कमवायला सुरूवात केली. आज घडीला सॅमसंग भारतातील मोबाईल फोन्सच्या शर्यतीतमध्ये अव्वल नंबरवर पोहोचली आहे. सध्यस्थितीला सॅमसंगचे १० टक्के उत्पादन भारतातून होते. पण, पुढील तीन वर्षामध्ये हेच उत्पादन ५० टक्क्यांवर नेण्याचा कंपनीचा मानस आहे.
सॅमसंगची भारतात मोठी गुंतवणूक
२०१७ साली सॅमसंगने भारतामध्ये ४९१५ कोटींची गुंतवणूक ही मोबाईल आणि फ्रिजच्या निर्मितीमध्ये केली होती. फॅक्टरीच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांनी सॅमसंगच्या निर्णयामुळे किमान ५००० रोजगार निर्मिती होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान, नोएडातील ३५ एकरवरील फॅक्टरीसाठी उत्तर प्रदेश सरकारने मान्यता दिली आहे.