कर्नाटक राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस पक्षाने आता दोन वरिष्ठ नेत्यांना पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजसभा सदस्य गुलाम नबी आझाद आणि बी. के. हरी प्रसाद यांना पाचारण करण्यात आले आहे. गुलाम नबी आझाद आणि बी. के. हरी प्रसाद बंगरुळु येथे जाणार असून राज्य काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांशी तसेच मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि जेडीएस प्रमुख आणि माजी पंतप्रधान एच. डी देवेगौडा यांच्या सोबत बैठक घेणार आहेत.
राजीनाम्यामागे काय आहे कारण?
कुमारस्वामी सरकारला वाचविण्यासाठी काँग्रेस आणि जनता दलाच्या मंत्र्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. १३ महिने सत्तेत असणारे कुमारस्वामी सरकारचे संख्याबळ आता ११३ वरून १०५ वर आले आहे. शनिवारी काँग्रेस- जेडीसच्या ११ आमदारांनी राज्य सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त करीत आमदारकीचा राजीनामा दिला होता. २२५ सदस्य असलेल्या कर्नाटक विधानसभेत काँग्रेसचे ७९ तर जनता दलचे (सेक्युलर) ३७ आमदार आहेत. मागील महिन्यात झालेल्या कुमारस्वामी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात दोन अपक्ष आमदारांचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेस आणि जेडीएसमधील बरेचसे आमदार नाराज असल्याचे समजते.