जगातील मंदीच्या सावटाने भारतातील वाहन उद्योग क्षेत्रातील मंदीचा फटका कामगारांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच, आता बिस्कीटाच्या कंपनीला देखील मोठा फटका बसणार आहे. बिस्कीटांचे उत्पादन घेणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या पारले कंपनीलाही या मंदीचा सामना करावा लागणार आहे. मागणी घटल्याने आगामी काळात आठ ते दहा हजार कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची शक्यता आहे.
विक्री घटल्याने हा निर्णय घेतला जाईल.
पारले कंपनीचे प्रमुख मयंक शाह यांच्या म्हणण्यानुसार, ‘१०० रुपये प्रतिकिलो किंवा त्याहून कमी किंमतीच्या बिस्कीटांवरील जीएसटी कमी करण्याची मागणी आम्ही केली आहे. सर्वसाधारण पाच रुपये किंवा त्याहून कमी किंमतीत पाकीटे विकली जातात. सरकारने जर आमची मागणी मान्य केली नाही तर, कंपनीतील आठ ते दहा हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढावे लागेल. विक्री घटल्याने आम्हाला मोठे नुकसान सोसावे लागत आहे.’
लाखो कर्मचारी काम करतात
पारले – जी, मोनॅको आणि मारी बिस्कीटचे उत्पादन घेणाऱ्या पारेलची विक्री १० हजार कोटींहून अधिक होते. या कंपनीच्या १० प्रकल्पांमध्ये जवळपास एक लाख कर्मचारी काम करतात. तसेच जीएसटी लागू होण्यापूर्वी १०० रुपये प्रतिकिलोहून कमी किंमतीच्या बिस्कीटांवर १२ टक्के कर आकारला दात होता. मात्र, सरकारने दोन वर्षांपूर्वी जीएसटी लागू केल्यानंतर सर्व प्रकारच्या बिस्कीटांचा समावेश १८ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये केला. त्यामुळे कंपन्यांना देखील आपल्या कंपन्यांचे दर वाढवले आहेत. त्यामुळे विक्रीत घट झाली असून याचा फटका कर्मचाऱ्यांना बसला आहे.
हेही वाचा – वाहन उद्योगाला मंदीचा ब्रेक