आयपीएल स्पर्धेदरम्यान स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी आढळलेल्या क्रिकेटपटू श्रीसंतला काहीसा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयला श्रीसंतची बाजू ऐकून घेऊन त्यावर ३ महिन्याच्या आत पुनर्विचार करण्याचे आदेश दिले आहेत. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी आढळल्यानंतर श्रीसंतवर बीसीसीआयने आजीवन बंदी घातली होती. मात्र आता या आजीवन बंदीच्या शिक्षेबाबत बीसीसीआयने पुनर्विचार करावा आणि ३ महिन्यांच्या आत याबाबतचा निकाल द्यावा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
काय आहे प्रकरण
श्रीसंतला २०१३ मध्ये आयपीएल स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी मुंबईतून अटक केली होती. त्यानंतर बीसीसीआयने श्रीसंतवर आजीवन बंदी घालण्याचा आणि १० लाख रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आजीवन बंदी घालण्याचा निर्णय अयोग्य असल्याचे श्रीसंतने म्हटले होते. पण काही दिवसांपूर्वी आपण पोलिसांच्या भीतीने आपण हा गुन्हा कबूल केल्याचा दावा श्रीसंतने केला होता. सुप्रीम कोर्टात श्रीसंतने दिल्ली पोलिसांनी आपल्या कुटुंबाला गोवण्याची तसेच छळ करण्याची धमकी दिल्यानेच आपण स्पॉट फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याचा गुन्हा कबूल केला असल्याचे सांगितले होते. सुप्रीम कोर्टाने स्पॉट फिक्सिंगच्या काळात श्रीसंतची वर्तवणूक योग्य नव्हती, असा ठपका ठेवला. आपल्यावर बीसीसीआयकडून लावण्यात आलेली बंदी अत्यंत कठोर असून आपण बेकायदेशीर गोष्टींमध्ये सहभागी होतो हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा नव्हता, असेही श्रीसंतकडून न्यायाधीश अशोक भूषण आणि के. एम. जोसेफ यांच्या खंडपीठासमोर सांगण्यात आले होते. दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावर श्रीसंतने समाधान व्यक्त केले असून लवकरच क्रिकेटच्या मैदानात परतण्याची आशा व्यक्त केली आहे.
Spot fixing case: Supreme Court asked the BCCI to reconsider its order of life ban on S Sreesanth (file pic) pic.twitter.com/fgF3iAUDx7
— ANI (@ANI) March 15, 2019