येत्या १४ एप्रिलपर्यंत देशभरात लॉकडाऊन सुरू राहणार आहे. मात्र, आत्तापासूनच नागरिकांना लॉकडाऊन कधी एकदा हटतोय असं झालेलं आहे. पण असं असलं, तरी देशातली कोरोनाग्रस्तांची नियमित वाढणारी संख्या पाहाता देशभरातला लॉकडाऊन १४ एप्रिलला संपेल का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज संध्याकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये ज्या भागांमध्ये कोरोनाचा फैलाव नाही, अशा भागांमधला लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने काढता येईल का? यासंदर्भात नियोजन करायला सांगितलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या बाजूचं राज्य असलेल्या तेलंगणामध्ये लॉकडाऊन १४ एप्रिलनंतर देखील २ आठवड्यांनी वाढण्याची शक्यता आहे. खुद्द तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनीच तसा प्रस्ताव मांडला आहे. त्यामुळे तेलंगणा सरकारनं असा निर्णय घेतला, तर लॉकडाऊन काळ वाढवणारं तेलंगणा हे देशातलं पहिलं राज्य ठरेल.
Telangana Chief Minister's Office now clarifies that CM K Chandrasekhar Rao suggested extension of lockdown for 2 more weeks (after April 15). He took a reference from BCG report which suggested lockdown in India will be good until June 3. No announcement of extension yet. pic.twitter.com/dxLb89RapT
— ANI (@ANI) April 6, 2020
महाराष्ट्रात लॉकडाऊन उठणार का?
देशभरात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात देखील लॉकडाऊनचा कालावधी वाढणार का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. राज्याचे आरोग्यमत्री राजेश टोपे यांनी संध्याकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधताना लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर निर्बंध शिथिल होतील असं गृहीत धरून चालू नका, असा सल्ला दिला आहे. ‘१० ते १५ एप्रिलदरम्यानच्या परिस्थितीचा आढावा घेऊन लॉकडाऊनसंदर्भात मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करूनच लॉकडाऊनबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल’, असं राजेश टोपेंनी नमूद केलं आहे. या पार्श्वभूमीवर आता तेलंगणा काय निर्णय घेतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.