लॉकडाऊनमुळे करोनाच्या प्रसारचा वेग घटला. लॉकडाऊन नसता, तर करोना रुग्णांची संख्या खूप जास्त असती. लॉकडाऊनमुळे रुग्णांसोबतच मृतांचा आकडादेखील घटला. अन्यथा आजच्या घडीला देशात ३७ ते ६८ हजारांचा मृत्यू झाला असता. तर बाधितांची संख्या १४ ते २९ लाख असती, असे करोना रोखण्यासाठी देशात तयार करण्यात आलेल्या टास्क फोर्समधील गटाचे प्रमुख व्ही. के. पॉल यांनी स्पष्ट केले आहे.
करोनाला रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टास्क फोर्समधील गटाचे प्रमुख व्ही. के. पॉल यांनी पत्रकार परिषद घेऊन लॉकडाऊनमुळे संक्रमणाचा वेग घटल्याचे मत व्यक्त केले. देशातले ८० टक्के करोना रुग्ण केवळ पाच राज्यांमध्ये आहेत. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, दिल्ली आणि मध्य प्रदेशचा समावेश होतो. देशातले ९० टक्क्यांहून अधिक करोनाबाधित १० राज्यांमध्ये असून उर्वरित राज्यांमधील करोनाबाधितांची संख्या १० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे पॉल यांनी सांगितले. मुंबई, दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, ठाणे, पुणे, इंदूर, कोलकाता, हैदराबाद आणि औरंगाबाद या १० शहरांमध्ये करोनाचे ७० टक्क्यांहून अधिक रुग्ण असल्याची माहिती पॉल यांनी दिली.
देशातील करोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. करोना रुग्णांची संख्या एक लाख वीस हजारांच्या आसपास पोहोचली असून मृतांचा आकडा साडेतीन हजारांच्या पुढे गेला आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात जवळपास दोन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनमुळे करोना संक्रमणाचा वेग कमी झाल्याचे करोनाला रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टास्क फोर्समधील एका गटाने म्हटले आहे. लॉकडाऊन योग्य वेळी जाहीर केला नसता, तर सध्या देशातील करोना रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा नेमका किती असता, याची माहिती या गटाने दिली आहे.