या जगात जर कुठे स्वर्ग आहे तर इथेच आहे…, असे विशेषण काश्मीरसाठी वापरले जाते. ही स्वर्गनगरी पाहण्यासाठी देशातील तसेच कानाकोपऱ्यातील पर्यटक उत्सुक असतात. मात्र राज्यात कलम ३७० लावल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून काश्मीरमध्ये पर्यटकांवर बंदी होती. परंतू आता पर्यटकांना काश्मीरमध्ये जाता येणार आहे. उद्या, १० ऑक्टोबरपासून काश्मीर पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. काश्मीरमधून अमरनाथ यात्रेकरू आणि पर्यटकांना माघारी पाठविण्याबाबत गृह विभागाने जारी केलेला आदेश जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मागे घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून होणार आहे. कलम ३७० रद्द केल्यानंतर पर्यटक पहिल्यांदाच काश्मीरला जाणार आहेत.
काय आहे प्रकरण
जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा देणारे कलम ३७० रद्द कण्याच्या तीन दिवस आधी २ ऑगस्ट रोजी एक सूचना जारी करून राज्यातील सर्व पर्यटकांना तत्काळ माघारी परतण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात कुणीही पर्यटक फिरकला नव्हता. राज्यपालांच्या सूचनेनुसर आता गुरुवारपासून संबंधित अॅडव्हायजरी मागे घेतली जाणार असून अशी सूचना गृह विभागाला करण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यपाल मलिक यांनी जम्मू काश्मीरमधील सुरक्षेचा आढावा घेतला. या बैठकीला विशेष सल्लागारांसह राज्याचे मुख्य सचिव तसेच योजना व गृहनिर्माण, नगरविकास विभागाचे प्रधान सचिवही उपस्थित होते. बैठकीत ब्लॉक डेव्हलपमेंट कौन्सिलच्या (बीडीसी) निवडणुकीबाबत अधिकाऱ्यांनी राज्यपालांना माहिती दिली. बीडीसी निवडणुका घेऊन जास्तीत जास्त अध्यक्ष निवडी पूर्ण करण्यात येतील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.