कुठेही दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट वापरणं सक्तीचे झाले असताना आता या संदर्भातील आणखी एक नियम लागू करण्याची तयारी केंद्र सरकारने सुरू केली आहे. दुचाकीवरून प्रवास करताना दुचाकीस्वारांनी ब्रँडेड हॅल्मेट वापरावेत, तसेच या हॅल्मेटचे उत्पादन आणि विक्रीबाबतचा नवा कायदा लागू करण्याच्या दिशेने केंद्र सरकारने पावले टाकली असल्याचे सांगितले जात आहे.
लोकल हॅल्मेट वापरल्यास…
या नव्या नियमानुसार लोकल हॅल्मेट घालून दुचाकी चालवताना सापडल्यास एक हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. तसेच लोकल हॅल्मेटच्या उत्पादनावर दोन लाखांपर्यंतचा दंड तसेच कारावासाची शिक्षा सुनावण्याची तरतूद या नव्या नियमात करण्यात आली आहे. देशात विना हॅल्मेट किंवा लोकल हॅल्मेट चा वापर करून दुचाकी चालवताना दररोज २८ लोकांचा मृत्यू होत असल्याचे देखील सांगितले जात आहे.
३० दिवसांनंतर नवा नियम लागू होणार
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दुचाकीस्वारांना सुरक्षित हॅ्ल्मेट पुरवण्यासाठी प्रथमच भारतीय सुरक्षा मानक ब्युरोच्या सुचीत समाविष्ट केले आहे. या अंतर्गत मंत्रालयाने ३० जुलैपर्यंत जारी केलेल्या अध्यादेशामध्ये संबंधितांकडून सल्ले आणि हरकती मागवल्या आहेत. आता ३० दिवसांनंतर याबाबतचा नवा नियम लागू करण्यात येणार आहे. या कायद्यांतर्गत हॅल्मेट निर्माता कंपन्यांना हॅल्मेटची बाजारात विक्री करण्यापूर्वी बीएसआयकडून हे हॅल्मेट प्रमाणित करून घ्यावे लागणार असून यामध्ये राज्य सरकारच्या प्रवर्तन विभागाला लोकल हॅल्मेटचे उत्पादन आणि विक्रीवर निर्बंध आणण्यासाठी वेळोवेळी तपासणी करण्याचे अधिकार असणार आहेत.
हेल्मेटचे वजन होणार कमी
नव्या मापदंडांनुसार हेल्मेटचे वजन दीड किलोवरू घटवून एक किलो २०० ग्रॅम करण्यात आले आहे. दरम्यान, विना बीआयएस मानांकित हॅल्मेटचे उत्पादन आणि विक्री हा गुन्हा मानला जाणार आहे. तसेच असे करणाऱ्या कंपनीला दोन लाखांपर्यंत दंड आणि कारावासाची शिक्षा सुनावण्यात येऊ शकते. तसेच अशा लोकल हॅल्मेटची आता निर्यात करता येणार नसल्याचेही नव्या नियमावरून सांगितले जात आहे.