आज अयोध्येमध्ये फार महत्त्वाच्या दोन घडामोडी घडताना दिसत आहेत. सकाळीच उद्धव ठाकरे यांनी रामजन्मभूमीवर जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले. तिथे त्यांनी शिवनेरी किल्यावरील मातीचा कलश रामजन्मभूमीवर ठेवला. अयोध्येत राम मंदिर बांधावे यासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे शनिवार पासून अयोध्या दौऱ्यावर होते. त्यांचा हा दोन दिवसाचा अयोध्या दौरा आज दुपारी बारा वाजता संपला आहे. ठाकरे आता दौरा संपवून मुंबईच्या दिशेला रवाना झाले आहेत. दरम्यान, या दोन दिवसांच्या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी राम जन्मभूमीचे दर्शन घेतले, अयोध्येतील पवित्र स्थान असेलेल्या लक्ष्मण किला येथे संत महंताचे दर्शन घेतले. शनिवारी रात्री उद्धव ठाकरे यांनी शरयू मातेच्या काठी शरयू मातेची महाआरती केली. ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर अयोध्येत विश्व हिंदू परिषदेने महासभेचे आयोजन केले आहे. राम मंदिर बांधण्यासाठी सरकारवर दबाव आणावा यासाठी विश्व हिंदू परिषदेने आज अयोध्येत महासभेचे आयोजन केले आहे. राम मंदिरासाठी आयोध्येत होणारी ही शेवटची महासभा असेल, असे सांगितले जात आहे. या महसभेसाठी आज अयोध्येत दोन ते तीन लाख रामभक्त येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. महासभेदरम्यान सुमारे ५० ते ६० मान्यवर लोकांना संबोधित करणार आहेत. ही महासभा ५ तास असणार आहे.
हेही वाचा – अयोध्येला जेव्हा जाग येते!
महासभेत १०० पेक्षा जास्त साधू
अयोध्येच्या रस्त्यारस्त्यांवर विश्व हिंदू परिषदेचे ‘चलो अयोध्या’ आणि शिवसेनेचे ‘पहिले मंदिर, मग सरकार’ असे पोस्टर लावले गेले आहेत. प्रत्येक रस्त्यांवर भगवा रंगाचे झेंडे फडकत आहेत. विश्व हिंदू परिषदेच्या महासभेत १०० पेक्षा जास्त साधुसंताना निमंत्रण दिले गेले आहे. या महासभेत राम भद्राचार्य, स्वामी परमानंद, हंसदेवाचार्य, राम भद्राचार्य आणि राम जन्मभूमी न्यासचे अध्यक्ष नृत्य गोपाल दास देखील उपस्थित राहणार आहेत. विश्व हिंदू परिषदेचे मंत्री भोलेंद्र यांनी सांगितले आहे की, ही शेवटची महासभा असणार आहे. यानंतर धर्मसभा होणार नाही तर राम मंदिराचे बांधकाम सुरु होईल.
हेही वाचा – शिवसेनेचा अयोध्या दौरा ‘रामदर्शना’साठीच
सुरक्षेसाठी योगींनी घेतली आढावा बैठक
अयोध्येत सुरक्षेसाठी १० हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष सशस्त्र दलाच्या २० तुकड्य़ा, निमलष्करी दलाच्या ७ तुकड्या आणि रॅपिड अॅक्शन फोर्सच्या २ तुकड्या अयोध्येतील महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. खबरदारी म्हणून अयोध्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कार्यक्रम स्थळ वगळता शहरांवर गर्दी होणार नाही, याची दक्षता घेताना पोलीस दिसत आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी रात्री बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. योगी यांनी घेतलेल्या बैठकीला राज्याचे पोलीस महासंचालक, मुख्य गृह सचिव, अतिरिक्त पोलीस महासंचालक व अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते.
Security has been tightened in Ayodhya ahead of the separate events of Shiv Sena and VHP being organised in the city today over the matter of #RamTemple. pic.twitter.com/7pHNcrEl2w
— ANI UP (@ANINewsUP) November 25, 2018
हेही वाचा – अयोध्या दौरा : हेमंत ढोमेचा उध्दव ठाकरेंना थेट सवाल