शुक्रवारी दुपारी भारतीय जनता पार्टीच्या वतीने अध्यक्ष अमित शाह यांनी, तर काँग्रेस पक्षाच्या वतीने अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. भाजपाच्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही उपस्थित होते. मात्र पत्रकारांच्या प्रश्नाला त्यांनी उत्तरे न देता माईक अमित शाह यांच्याकडे दिल्याने पत्रकार परिषदेत पंतप्रधान बोललेच नाहीत अशी राहुल गांधींसह सर्व विरोधी पक्षांनी केली. अनेक माध्यमांमध्येही अशाच पद्धतीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. प्रत्यक्षात मात्र ही पत्रकार परिषद पंतप्रधान नरेद्र मोदी यांची नसून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची असल्याचे समोर येत आहे. दुसरीकडे पंतप्रधानांनी या पत्रकार परिषदेला उपस्थित राहून मुद्दामच चर्चा घडून यावे, अशी भाजपाची छुपी प्रचार नीति असल्याचीही चर्चा होत आहे.
अमित शाहांच्या नावे पत्रकार परिषदेचा निरोप
या पत्रकार परिषदेचे वास्तव मात्र वेगळेच असून पत्रकारांना भाजपाच्या वतीने मोबाईल एसएमएसद्वारे गेलेल्या निमंत्रणात अमित शाह यांची पत्रकार परिषद असल्याचे म्हटले आहे. दिल्लीतील पत्रकारांकडून ‘माय महानगर’ला प्राप्त झालेल्या या एसएमएसमध्ये म्हटलेय की भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे दुपारी ३.४५ वाजता पत्रकार परिषद घेतील. पत्ता– भाजपा मुख्यालय, ६ ए, दीनदयाळ उपाध्याय मार्ग, नवी दिल्ली. कृपया आपण उपस्थित राहा. पंतप्रधान नरेंद्र मोदी या पत्रकार परिषदेत उपस्थित राहणार किंवा बोलणार आहेत, असे कुठेही या संदेशात म्हटले नव्हते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही अधिकृत पत्रकार परिषद नसल्याचे दिल्लीतील पत्रकारांनी सांगितले.
LIVE: Shri @AmitShah is addressing a press conference in the presence of PM Shri @narendramodi at BJP HQ. #DeshKaGauravModi https://t.co/PyeR1mudj9
— BJP (@BJP4India) May 17, 2019
नवी दिल्ली येथील ज्येष्ठ पत्रकार आणि इंडियास्क्रोल या संकेतस्थळाचे संपादक एस. श्रीदथन यांनीही याला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले ‘आमच्या पत्रकारांच्या ग्रूपमध्ये पत्रकार परिषदेचा संदेश आला होता. मात्र त्यात अमित शाहांची पत्रकार परिषद असल्याचा उल्लेख होता. तथापि काही ग्रूपवर पंतप्रधान उपस्थित राहण्याची शक्यताही वर्तविली होती.’ भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि दिल्ली राज्याचे प्रभारी श्याम जाजू यांनी ‘माय महानगर’ला सांगितले की कालच्या पत्रकार परिषदेची निमंत्रणे पत्रकारांना गेली, पण त्याचे पत्रक किंवा निमंत्रण पत्र असं आम्ही दिलं नव्हतं, मात्र सर्वांना निरोप देण्याची व्यवस्था केली होती. त्यात कुठेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पत्रकार परिषद असल्याचे म्हटले नव्हते. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचीच ही परिषद असल्याचे म्हटले होते.
राहुल गांधींची टिका ठरली चर्चेला कारणीभूत
नियोजित वेळेपेक्षा थोडी उशिरा सुरू झालेल्या या पत्रकार परिषदेत प्रत्यक्षात भाजपाचे स्टार प्रचारक असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिल्याने विविध वाहिन्यांच्या ‘ब्रेकिंग न्यूज’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची पाच वर्षातील पहिलीच पत्रकार परिषद असे प्रसिद्ध झाले. दरम्यान त्याचवेळेस काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचीही पत्रकार परिषद सुरू होती. त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवत राफेल प्रश्नावर ते बोलतील का? किंवा पत्रकार परिषदेत माझ्याशी समोरासमोर त्यांनी बोलून दाखवावे असे आव्हानही केले. दुसऱ्या बाजूला काही पत्रकारांनी राफेलसह विविध मुद्दयांवर प्रश्न विचारले पण भाजपात अध्यक्षांचा मान मोठा असतो, ही त्यांची परिषद आहे, असे सांगून पंतप्रधान मोदींनी यावर उत्तर दिले नाही. त्यानंतर राहुल गांधी यांच्या विधानाचा धागा पकडून –की मोदी पत्रकारांना सामोरे जात नाहीत– विरोधकांनी– मोदी बोललेच नाहीत अशी टिका सुरू केली. रात्री उशिरा राहुल गांधी यांनी ट्विटरदवारे मतप्रदर्शन करून पंतप्रधान मोदी यांची खिल्ली उडविली.
Congratulations Modi Ji. Excellent Press Conference! Showing up is half the battle. Next time Mr Shah may even allow you to answer a couple of questions. Well done! ?
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 17, 2019
प्रचारसमाप्तीनंतर पक्षाध्यक्षांनी परिषद घेण्याची परंपरा
लोकसभा निवडणूकीतील सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानाच प्रचार काल सायंकाळी संपला. त्यानंतर प्रथेप्रमाणे काही पक्षांनी पत्रकार परिेषद घेऊन आपल्या कामाचा लेखाजोखा आणि आपली प्रचारातील भूमिका स्पष्ट केली. त्यात भाजपाचाही समावेश होता. भाजपाच्या काही वरिष्ठ नेत्यांनी सांगितले की मागच्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचार समाप्तीनंतर म्हणजेच २०१४ मध्ये, त्यावेळेस भाजपाने अशीच पत्रकार परिषद बोलावली होती. तेव्हा भाजपाच्या पक्षांतर्गत राजशिष्टाचाराप्रमाणे तत्कालिन राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनी परिषदेला संबोधित केले होते. त्यामुळे शुक्रवारी झालेली पत्रकार परिषदेत पंतप्रधानांनी बोलणे अपेक्षित नव्हते, मात्र तरीही अमित शाह यांच्यानंतर त्यांनी आपले म्हणणे मांडले. ती केंद्र सरकारची पत्रकार परिषद नव्हती, तर भाजपा या पक्षाची पत्रकार परिषद होती. जर पंतप्रधान नरेंद्र मोदींची अधिकृत पत्रकार परिषद असती तर मात्र त्यांनी नक्कीच उत्तरे दिली असती.
हा भाजपाचा ठरवून केलेला ‘प्रचार फंडा’ तर नव्हे?
एका बाजूला मोदींच्या पत्रकार परिषदेवरून रान पेटले असताना, दुसऱ्या बाजूला मात्र हा प्रकार भाजपाची ‘सोची समझी’ निवडणूक चाल असल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहेत. अमित शाहांच्या पत्रकार परिषदेला उपस्थिती लावून आणि त्याबद्दल संदिग्धता ठेवून पंतप्रधान मोदींनी हा वाद मुद्दामच ओढवून घेतल्याचे सांगितले जातेय. विरोधी पक्षांसह काही माध्यमांना ‘कामाला’ लावायचे, त्यांना डिवचायचे आणि त्यांनी केलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या माध्यमातून भाजपा आणि नरेंद्र मोदी यांचे नाव चर्चेत ठेवायचे ही भाजपाची पूर्वीचीच प्रचाराची स्ट्रॅटेजी असल्याची शक्यता दिल्लीत अनेक वर्षे वार्तांकन केलेले वरिष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषकांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर ‘माय महानगर’कडे व्यक्त केली. अशा चर्चेतून मतदारांमध्ये फूट पडून भाजपाच्या विचारसरणीच्या बाजूचे आणि विरोधी अशी स्पष्टता येऊ शकते आणि त्याचा फायदा सातव्या टप्प्यातील मतदानात होऊ शकतो. त्याच पत्रकार परिषदेतील पंतप्रधानांच्या प्रचारसभांबद्दलचे वक्तव्याचा याला आधार आहे.
पुढे ते म्हणाले की आमच्या प्रचारसभा या नियोजनपूर्वक आखलेल्या होत्या. यावरून भाजपा प्रत्येक गोष्ट अतिशय नियोजनपूर्वक करते हे स्पष्ट होते. परिणामी कालच्या पत्रकारपरिषदेत पंतप्रधान मोदींची अचानक हजेरी हा सुद्धा भाजपाच्या विचारपूर्वक नियोजनाचा भाग असू शकतो आणि त्यामागे नक्कीच एक विशिष्ट हेतू असू शकतो, तो सामान्यांचा चटकन लक्षात येत नाही. प्रज्ञा सिंह यांनी नथुराम गोडसे यांच्याबाबतीत केलेले वक्तव्य हे सुद्धा ‘नियोजन पूर्वक’ केलेले असू शकेल, असा तर्कही त्यांनी सांगितला. या वक्तव्यामुळे सुद्धा कट्टर हिंदूत्ववादी आणि इतर असा मतदारांमध्ये भेद स्पष्ट होईल, की जो निवडणूकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. दुसरी बाब म्हणजे प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्यानंतर उठलेल्या वादावरून आता माध्यमांचे आणि जनतेचे लक्ष मोदींच्या मौनाकडे गेले आहे. त्यामुळेही हा पत्रकार परिषदेतील मोदींचे मौन हे नियोजनबद्ध धोरण असू शकेल अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
‘मोदी उत्तरेच देत नाहीत…’
दिल्लीत राजकीय वार्तांकन करणाऱ्या एक ज्येष्ठ महिला पत्रकारांनी मात्र थोडे वेगळे मत मांडले. त्या म्हणाल्या, ‘मूळात पत्रकारांच्या कुठल्याच प्रश्नावर पंतप्रधान मोदी उत्तर देत नाहीत असा आमचा पाच वर्षांचा अनुभव आहे. मध्यंतरी दिवाळीत त्यांनी सर्व पत्रकारांना बोलावले होते. त्यावेळी ते काही बोलतील अशी आमची अपेक्षा होती. पण केवळ दिवाळीच्या शुभेच्छा देऊन त्यांनी आपले म्हणणे आटोपते घेतले. प्रश्न विचारण्याला संधीच दिली नाही कुणाला. नंतर मात्र वैयक्तिक पत्रकारांची विचारपूस केली, तरी कुणाच्या प्रश्नाला उत्तरे मात्र दिली नाहीत. त्यातही ज्यांनी कुणी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, त्यांना अगदी त्रोटक उत्तरं देऊन त्यांची बोळवण केली.’