आपला देश महासत्ता होणार असल्याचे चित्र आपल्यासमोर नेहमीच उभे केले जाते. तर राजकारणी मंडळी नेहमीच महिला सशक्तीकरणाच्या गप्पा मारताना पहायला मिळतात. परंतु देशाची खरी परिस्थिती मात्र वेगळी असल्याचे जाणवते. काही दिवसांपूर्वी लंडनधील एका संस्थेने महिलांच्या सुरक्षिततेबाबत एक सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये भारत हा महिलांसाठी सर्वात असुरक्षित देश असल्याचे म्हटले होते. भारताने हे सर्वेक्षण नाकारलेही होते. राष्ट्रीय महिला आयोगानेदेखील सदर सर्वेक्षणाची निंदा केली. परंतु या सर्वेक्षणाला खरे ठरवणाऱ्या घटना वारंवार देशात घडत आहेत. देशातील बलात्काराच्या घटना थांबेनात. त्यातच गेल्या आठवड्यात एका इटालियन महिलेवर मुंबईत बलात्काराची घटना घडली. त्यामुळे देशाची मान अजूनच खाली गेली. आता अजून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशमध्ये महिला भाड्याने दिल्या किंवा घेतल्या जात असल्याचं समोर आलं आहे. अवघ्या काही रुपयांमध्ये महिलांची खरेदी-विक्री होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारावरुन भारत खरंच महिलांसाठी सुरक्षित आहे का? हे पुन्हा एकदा तपासून घ्यायला हवे.
महिला ठरत आहेत अनिष्ठ प्रथेच्या बळी
मध्य प्रदेशमधील शिवपुरी जिल्ह्यात काही रुपयांमध्ये बायको भाड्याने मिळते. एक महिन्यापासून ते वर्षभरापर्यंत महिला भाड्याने दिल्या जातात. मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेर भागात धडीचा नावाची प्रथा आहे. परिसरातील श्रीमंत पुरूष या प्रथेचा गैरफायदा घेतात. अवघ्या काही हजार रूपयांमध्ये येथील धनवान पुरूष महिलांची काही दिवसांसाठी खरेदी करतात. हा सर्व व्यवहार सदर लोक १० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करतात. जितक्या वेळासाठी महिला भाड्याने घेतली आहे, तो कालावधी संपत आल्यानंतर व्यवहाराचे पुन्हा नुतनीकरण करुन घेता येते. या प्रथेचा बाजार भरतो. त्यामध्ये महिला बाजारात उभ्या असतात. धनाढ्य लोक बाजारात जाऊन महिलांची निवड करतात. ही प्रथा गुजरातमध्येदेखील आहे.
८ ते ३० हजार रुपयांना विक्री
दोन वर्षांपूर्वी इंदूरमधील एका इसमाने एका लग्न समारंभात त्याच्या बायकोला ३० हजार रुपयांमध्ये विकले होते. विकल्यानंतर अनेक दिवस त्या महिलेवर शारिरीक अत्याचार केले. ज्या इसमाने महिलेची खरेदी केली होती, त्यानेच काही दिवसांनी सदर महिलेची पुन्हा एकदा विक्री केली. मध्य प्रदेशमधील शिवपुरी जिल्ह्यातील एका धनाढ्य व्यक्तीने त्या महिलेची खरेदी केली. महिलेने त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली. सुटकेनंतर तिने शिवपुरी पोलीस ठाणे गाठले. महिलेने तिच्या नवऱ्याविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर तिच्या नवऱ्याला अटक करण्यात आली. याआधी अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. २००६ साली देखील गुजरातमधील एका इसमाने त्याच्या पत्नीची ८००० रूपयांना विक्री केली होती.