बॉलिवूडचे संस्कारी बाबूजी म्हणजेच आलोक नाथ यांच्यावर लागलेल्या आरोपानंतर त्यांच्या अडचणीत भर पडत असल्याचे चित्र आहे. या आरोपानंतर त्यांची प्रतिमा मलीन झाली आहे. निर्मात्या, लेखिका विंता नंदाने त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केल्यानंतर बॉलिवूडमधून त्यांच्यावर अनेकांनी टीका केली. या प्रकरणी आलोक नाथ यांना सिने अॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन म्हणजचे सिंटाने कारणे दाखवा नोटीस बजावल्या होत्या. मात्र त्यांच्याकडून काहीच उत्तर मिळाल्यामुळे त्यांना सिंटा मधून बाहेर काढण्याचा निर्णय असोसिएशनद्वारे घेण्यात आला आहे. या बाबत सिंटाने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केले आहे.
In view of the various allegations of sexual harassment and misconduct against Mr. Alok Nath, after due diligence and consideration, the Exec. Committee of #cintaa has decided to expel him from the Association. @sushant_says @renukashahane @FIA_actors @sagaftra @RichaChadha pic.twitter.com/tcNgooWLW6
— CINTAA_Official (@CintaaOfficial) November 13, 2018
काय होते प्रकरण
बॉलीवूडमध्ये संस्कारी बाबूजी अशी ओळख असलेले बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांच्याविरुद्ध प्रसिद्ध लेखिका विंटा नंदा यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात लेखी अर्जाद्वारे तक्रार दाखल केली होती. या तक्रार अर्जात त्यांनी आलोकनाथ यांच्यावर लैगिंक गैरवर्तनाचा आरोप केल्यामुळे आलोकनाथ यांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली. सिनेअभिनेत्री तनूश्री दत्ता हिने सिनेअभिनेता नाना पाटेकर यांच्यावर असभ्य वर्तनाचा आरोप करुन ओशिवरा पोलीस ठाण्यात लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या आरोपानंतर बॉलीवूडसह कॉर्पोरेट जगतात मी टू या मोहीमेतंर्गत अनेक तक्रारी येत होत्या. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध लेखिका विंटा नंदा यांनी त्यांच्या फेसुबकवर एक पोस्ट अपलोड करुन एका महिलेची व्यथा मांडली होती. त्यात त्यांनी आलोकनाथ यांनी तिच्यावर लैगिंक अत्याचाराचा आरोप केला होता. आरोपानंतर बॉलीवूडमध्ये एकच खळबळ उडाली होती. या आरोपानंतर अभिनेत्री नवनीत निशान आणि संध्या मुदुल यांनीही लैगिंक गैरवर्तनाचा आरोप केला होता. त्यात भर म्हणून की काय सिनेअभिनेत्री रेणुका शहाणे हिने आलोकनाथ यांच्याविरुद्ध जाहीर टिका करुन घडलेल्या प्रकारचे आपण साक्षीदार असल्याचे म्हटले होते. दुसरीकडे आलोकनाथ यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावत आपण निर्दोष असल्याचे म्हटले होते. या घटनेनंतर आलोकनाथ यांच्या पत्नीने विंटा नंदा यांच्याविरुद्ध अंधेरीतील स्थानिक न्यायालयात मानहानीचा दावा केला आहे. या दाव्यानंतर विंटा नंदा यांनी बुधवारी ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन आलोकनाथ यांच्याविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार केली आहे. ही तक्रार पोलिसांना प्राप्त झाली असून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते.