घरमनोरंजनविविध रुपातील ’नाजूका’ येतच राहणार

विविध रुपातील ’नाजूका’ येतच राहणार

Subscribe

अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माता आणि लेखिका अशा विविध क्षेत्रात कार्यरत असणारी मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री तृप्ती भोईर रुपेरी पडद्यावर जितकी मनमोकळी आणि हसमुख आहे. तितकीच ती खर्‍या आयुष्यातही आहे. माझा अगडबम या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने तृप्तीने आपलं महानगरच्या वाचकांशी माय महानगरच्या फेसबुक लाईव्हमधून संवाद साधला आहे. चित्रपटांची कोणतीही पार्श्वभूमी नसताना केवळ महत्त्वाकांक्षेच्या जोरावर तृप्तीने उत्तमोत्तम कलाकृती प्रेक्षकांसमोर आणल्या आहेत. तिचा हा मराठी सिनेमांचा आजवरचा प्रवास जाणून घेऊयात.

जाडजूड, भरपूर खादाड पण तितकीच गोड नाजूका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचा नक्कीच आनंद आहे. मात्र ही नाजूका घडवण्यासाठी लागणारी मेहनतही तितकीच महत्त्वाची आहे. मेकअपला लागणारा तब्बल साडेपाच तासांचा वेळ, 40 किलोचा मेकअपचा थर, सलग 12 तास शूटींग आणि मेकअप काढण्यासाठी लागणारा एक तास या शेड्यूलसह 43 दिवस या चित्रपटाचे शूटींग केले आहे. प्रमुख अभिनेत्रींसह दिग्दर्शक आणि पहिल्यांदा लेखिकेचीही जबाबदारी पार पाडत आहे. हे अजिबात सोपं नव्हतं.

कारण काही चार तासानंतर संपूर्ण मेकअप हा निघायला सुरुवात होत होती. शूटींगचे पहिले 10 दिवस बरे गेले, मात्र नंतर शारीरिक त्रास जाणवू लागला. त्वचेचे आजार होऊ लागले. नाजूका जरी अंगाने जाडजूड असली तरी तृप्ती मात्र 60 किलोंचीच आहे. त्यामुळे शरीरावर इतक ओझं घेऊन वावरणं सोप नव्हतं. मेकअपमुळे 12 तास मी काहीच खाऊ शकत नव्हते. फक्त लिक्विडवर असायचे, पण युरिन पास होण्यासाठीही अडचणी येऊ लागल्या. अखेर मला युरिन इन्फेक्शन झाले आणि डॉक्टरांनी मला यापुढे किमान 2 आठवडेतरी असा मेकअप करू नको, हा सल्ला दिला आहे. अगडबममध्ये नाजूका 250 किलोची होती. मात्र आता माझा अगडबममध्ये ती 300 किलोची झाली आहे. पहिल्या भागात नवर्‍याने दुर्लक्षित केलेली, घाबरणारी, बिचकणारी नाजूका आता आठ वर्षांनी बिनधास्त झाली आहे. घरात रुळली आहे. विशेष म्हणजे तिच्या नवर्‍याचं तिच्यावर निस्सिम प्रेम आहे.

- Advertisement -

सुबोध भावेंसोबतची केमिस्ट्री

चित्रपटाच्या पहिल्या भागात अभिनेता मकरंद अनासपुरे होते. तर दुसर्‍या भागात सध्याचे सुपरस्टार सुबोध भावे आहेत. मकरंदसोबत जी होती त्याहीपेक्षा उत्तम केमिस्ट्री सुबोधसोबत जुळली आहे. मराठीतील अष्टपैलू अभिनेता म्हणून सुबोधची ओळख असून त्याने मला खूपच सांभाळून घेतले आहे.

टुरिन टॉकिजचा भन्नाट अनुभव

अरे संसार संसार या पहिल्या चित्रपटानंतर टुरिन टॉकिज हा चित्रपट बनवला. खरंतर हा चित्रपट म्हणजे खर्‍या आयुष्यातील अनुभव होता. पहिल्या चित्रपटासाठी कर्ज घेतले होते. परंतू हा सिनेमा फ्लॉप ठरला. आता हा सिनेमा चालवायचा तर होता. त्यासाठी टुरिन टॉकिजचा पर्याय निवडला. टुरिन टॉकिजमध्ये चित्रपट दाखवण्याचा अनुभव खूपच विलक्षण होता. गावाकडच्या लोकांशी संपर्क साधणे, जत्रेमध्ये तब्बल एकावेळी 12 चित्रपट टुरिन टॉकिजमध्ये दाखवले जात असताना आपला सिनेमा कसा पाहिला जाईल, यासाठी शक्कल लढवली. हे अनुभव शब्दात मांडता येणे कठीण आहे. पण या अनुभवांवरच मी टुरिन टॉकिज हा सिनेमा बनवला आणि त्यातील काही वास्तविक दृष्यही चित्रपटात दाखवले. या मेहनतीचा परिपाक म्हणजे हा सिनेमा थेट ऑस्करपर्यंत गेला. खरतर ऑस्करला जाणार्‍या सिनेमांची जातकुळीच वेगळी असते. आपण 50 कोटी जरी खर्च केले तरी ऑस्करच्या श्रेणीत बसणार नाही. पण ऑस्करच्या वारीत मी स्वतः 3 तीन तंबू ठोकून माझा सिनेमा प्रेक्षकांना दाखवला. दिवसाला तीन-तीन शो या सिनेमाचे केले. त्यावर्षी आपल्या भारतीय सिनेमाला 100 वर्ष पूर्ण झाली होती. ती खर्‍या अर्थाने मी तिथे साजरी केली.

- Advertisement -

पॅशन, जिद्द आणि चिकाटी

खरंतर शिक्षणाची आवड नसलेली मी केवळ 10 पास आहे. सिनेमाची कोणतीही पार्श्वभूमी मला नाही. पण या क्षेत्रात आल्यानंतर हळूहळू सिनेमाची गणितं शिकतं गेली. अभिनय, दिग्दर्शन सगळेच शिकत आहे. मला इंग्रजीदेखील येत नाही. पण आता इंग्रजी बोलायला आणि वाचायला शिकत आहे. पण एक मात्र नक्की सांगेन की, आपल्याकडे पॅशन, जिद्द आणि चिकाटी असेल तर काहीही साध्य होऊ शकतं. याच जिद्दीच्या जोरावर सिनेक्षेत्रात इथवर मजल मारली आहे. मी इंडस्ट्रीच्या समुद्रात उडी मारली आता सगळं शिकत आहे.

मीटूवरही परखड मत

सध्या देशात मीटूचं वार वाहू लागलयं ही बाब चांगलीच आहे. एकीने बोलायला सुरुवात केली म्हणून आता सगळे बोलत आहेत. तिचं अभिनंदन. पण नुसत याबाबत बोललं जात आहे. त्याचा परिणाम काय, यावर काही अ‍ॅक्शन घेतली जात आहे का, हे पाहणं ही महत्त्वाच आहे. हॉलीवूडमध्ये अशा घटना समोर आल्या तर त्या कलाकाराला इंडस्ट्रीमधून काढून टाकतात. शिवाय ही घटना केवळ सिनेक्षेत्रातच घडत नसून नोकरी, घरकाम, शाळा, कार्यालय या ठिकाणांवरही घडत असते. त्यामुळे त्याचाही विचार होणे गरजेचे आहे.

नाजूका विविध रुपात येतच राहणार

माझा अगडबमनंतर त्याचा तिसरा भागही मी घेऊन येणार आहे. माझ्यासाठी ही एक सुपरमॅन, स्पायडरमॅन सारखी सीरीजच आहे. पुढील कथानकही विनोदीच असेल. शिवाय याच्या बर्‍याच सीरिज प्रेक्षकांसमोर आणण्याचा माझा मानस आहे. मी नाजूकाला अनेक रुपांमध्ये दाखवू शकते. हिरोईन ही नेहमीच सेक्सी, कडक, माल असायला हवी का, हा माझा प्रश्न आहे. सर्वसामान्य बायकायाही तितक्याच सुंदर असतात. नाजूका तर खूपच गोड आहे आणि हेच नेमकं मला रुपेरी पडद्यावरील चित्रपटांच्या माध्यमातून दाखवायचं आहे. माझ्या मते सौंदर्य म्हणजे तुमचं मनं. ते निर्मळ आणि सुंदर असेल तर तुम्ही सुंदर आहात, असं मी मानते. तुम्ही लोकांना कशी वागणूक देता. कोणाला दुखवता का, हे ठरवत की तुम्ही सुंदर आहात की नाही. तसे करत नसाल तर माझ्यासाठी हे सुंदर आहे आणि नाजुका सुंदरच आहे. नाजूका माझ्यासाठी सुपरमन, स्पायडरमनसारखीच आहे.

दरम्यान, सही रे सही या नाटकातही छोटीशी भूमिका साकारली आहे. मुळात शिक्षणाची आवड नसल्यामुळे 11 वीला अ‍ॅडमिशन घेऊनही कधी लेक्चरला बसले नाही. सतत एकांकिकांवर लक्ष केंद्रीत केलं. खूप लवकर लग्न झालं आणि नंतर अभिनय मागे पडला. मधल्या काही काळात ब्युटिशियनचा कोर्सही केला. त्यावेळी घरोघरी जाऊन महिलांना ब्युटिशियनची सर्विस दिली आहे. मात्र वाटले हे करताना पुन्हा आपल्या खर्‍या आवडीकडे वळावे आणि अभिनयात पुन्हा नव्याने प्रवेश केला. गंमत अशी झाली की सही रे सही नाटकात एक छोटासा रोल करणारी मुलगी दुर्दैवाने आजारी पडली आणि त्या भूमिकेसाठी माझी निवड झाली. या नाटकाचे मी तब्बल 75 प्रयोग केले.

महानगर आणि मी

महानगरने मला घडवलं. आज मी जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात जगू शकते. मुंबईमध्ये जगणारी व्यक्ती जगाच्या पाठीवर कुठेही गेली तरी त्याला काय खाऊ, कसं फिरू, कुठे राहू, याचा प्रश्न पडत नाही. त्याला तडजोड करणं हे शिकवावं लागत नाही. या महानगराने मला खूप बळ दिलं आहे. मला या महानगराला काही परत द्यायच असेल तर मी सिनेमांच्या माध्यमातूनच देऊ शकेन आणि ते मी देत राहीन.

शब्दांकन-रश्मी माने 

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -