अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी नाना पाटेकर यांची पाठराखण केली आहे. ‘जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी नानांसोबत’, अशा शब्दात मकरंद यांनी नाना पाटेकर यांना पाठिंबा दिला आहे. तनुश्री दत्ताने नाना पाटेकरवर केलेल्या आरोपानंतर बॉलिवूडच्या बऱ्याच कलाकारांनी तिला पाठिंबा दर्शविला होता. त्याचबरोबर मराठमोळी अभिनेत्री रेणूका शहाणेने सुद्धा तनुश्रीला पाठिंबा दिला होता. रेणूका शहाने आणि मकरंद अनासपुरे यांनी कॉमेडीची बुलेट ट्रेन या कार्यक्रमात परिक्षकाचे एकत्र काम केले होते. परंतु, दोघांचा पाठिंबा हा वेगवेगळा दिसून येत आहे.
काय म्हणाले मकरंद अनासपुरे?
मकरंद अनासपुरे यांनी आपण नाना पाटेकर यांच्या पाठीशी आहोत असे सांगितले. नाना गेली कित्येक दशकं चित्रपटसृष्टीत काम करत आहेत. त्यांच्यावर कुणीही बोट दाखवला नाही. नानांचा स्वभाव रागीट असल्याचे आपण मान्य करत असून त्यामागे तशी कारणेही असल्याचे मकरंदने सांगितले. शिवाय, तुनुश्रीने दहा वर्षानंतर पुन्हा तेच आरोप करणे चुकीचे आहे. तिच्या आरोपमागे कुणीतरी आहे, त्याला शोधलं पाहिजे, असं मकरंद यांनी सांगितले.
नाना पाटेकरांचे देशासाठी मोलाचं योगदान – मकरंद
नाना पाटेकर यांच्यासोबत आपण सदैव उभे राहणार असल्याची माहिती मकरंद अनासपुरे यांनी दिली. मकरंद अनासपुरे यांनी सांगितले की, या प्रकरणाकडे सामंजसपणाने बघायला हवे. शिवाय, सत्य लोकांना माहित आहे. फक्त ते योग्य पद्धतीने लोकांसमोर यायला हवे. नाना पाटेकर यांचे देशासाठीही मोलाचं योगदान आहे. त्यामुळे आपण ‘जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी’ नानांसोबत असल्याचे मकरंद यांनी सांगितले.