घरमनोरंजनPulwama attack: पाकिस्तानचं तुणतुणं वाजवू नका - मनसे

Pulwama attack: पाकिस्तानचं तुणतुणं वाजवू नका – मनसे

Subscribe

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी एफएम रेडिओ वाहिन्यांना रोखठोक इशारा दिला आहे.

‘जैश- ए- मोहम्मद’ या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेने केलेल्या भ्याड हल्ल्याचे पडसाद देशभरात विवध क्षेत्रांतून उमटत आहेत. याच मुद्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने FM रेडिओ वाहिन्यांना चांगलीच तंबी दिली आहे. ‘पाकिस्तानी गायकांचं तुणतुणं वाजवणं बंद करा’ असा थेट इशारा मनसेने एफएम रेडिओ वाहिन्यांना दिला आहे. ‘रेडिओ वाहिन्यांमध्ये जे लोक काम करतात किंवा इथल्या कार्यक्रमांचं शेड्यूल जे आखतात, त्यांना देशवासीयांची भावना काय आहे, याची काहीच जाणीव नाही का ? मनसे जोपर्यंत विरोध करणार नाही तोपर्यंत पाकिस्तानचं तुणतुणं वाजतच राहणार का?’, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी एफएम रेडिओ वाहिन्यांना रोखठोक इशारा दिला आहे. सिनेमा असो की यूट्यूब किंवा अगदी रेडिओ वाहिन्या, दरवेळी काय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेच पाकिस्तानी कलाकारांना विरोध करायचा? असा सवाल शालिनी ठाकरे यांनी पत्राद्वारे उपस्थित केला आहे.

शालिनी ठाकरे यांनी पत्राद्वारे सर्व एफएम रेडिओ वाहिन्यांच्या संचालकांना तसंच प्रोग्राम हेड्सना हा संदेश पाठवला आहे.

काय म्हटलंय पत्रामध्ये?

शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या अश्रूंचा सूड घेण्यासाठी एक देश म्हणून आपण सर्व भारतीय वचनबद्ध आहोत. मात्र, आपल्या लोकप्रिय रेडिओ वाहिनीवरअत्यंत निर्लज्जपणे पाकिस्तानी गायक -संगीतकारांची गाणी वाजवली जात आहेत. पाकिस्तान हे शत्रुराष्ट्र आपल्या देशाविरोधात सातत्याने दहशतवादी कारवाया करत असताना, भारत-पाक सीमेवर अत्यंत तणावाचं वातावरण असताना तसंच या दोन देशांमध्ये कधीही युद्धाचा भडका उडेल अशी नाजूक स्थिती असताना आपली रेडिओ वाहिनी मात्र नुसरत फतेह अली खान, राहत फतेह अली खान, आतिफ अस्लम, अली झफर, सज्जाद अली, गुलाम अली, रेश्मा, सफाकत अमानत अली यांसारख्या पाकिस्तानी गायक-संगीतकारांची गाणी करोडो भारतीयांना ऐकवत आहे. संगीत ऐकणा-याच्या मनात प्रेमाची भावना निर्माण होते हे खरं असलं तरी सध्याच्या संवेदनशील स्थितीत पाकिस्तानी गायक-संगीतकारांची गाणी मात्र देशवासीयांच्या मनात संतापाची भावना निर्माण करत आहेत. म्हणूनच रेडिओ वाहिन्यांवर पाकिस्तानी गायक-संगीतकारांची गाणी वाजवली जाऊ नयेत, अशी प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे.
आपल्या रेडिओ वाहिनीच्या करोडो श्रोत्यांच्या पाकिस्तानबाबतच्या संतप्त भावना लक्षात घेऊन आपण पाकिस्तानी गायक-संगीतकारांची गाणी आपल्या रेडिओ वाहिनीवर वाजवणं तत्काळ थांबवावं, ही आग्रहाची मागणी आम्ही या पत्राद्वारे करत आहोत. भारतीयांच्या भावनांचा आपण आदर कराल याची खात्री आहेच, अन्यथा आपल्या रेडिओ वाहिनीवरून वाजवली जाणारी पाकिस्तानी गाणी बंद करण्यासाठी ‘सर्जिकल स्ट्राइक’ कसा करायचा, हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ठाऊक आहेच.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -