मराठी संस्कृतीचा वारसा ‘झी टॉकीज’ अनेक वर्षानं पासून चालवत आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी ‘झी टॉकीज’ नेहमीच नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असते. म्हणूनच प्रेक्षकांनी ‘झी टॉकीज’ला कायमच आपली पसंती दर्शविली आहे. ‘झी टॉकीज’वरील ‘मन मंदिरा’ या कार्यक्रमाने नेहमीच प्रेक्षकांना वेग वेगळ्या कीर्तनकारांच्या कीर्तनाची मेजवानी दिलेली आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे कीर्तनकार आणि भक्तगण सोबतच विठ्ठल नामाचा जयघोष करतात व जीवनात मिळालेल्या सुखा बद्दल त्याचे आभार मानतात. काही दिवसांपूर्वीच शिवानी बावकरने या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी स्वीकारली आहे. या कठीण काळात ‘मन मंदिरा’ हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोबल उंचावण्याचे आणि सकारात्मकता पुन्हा जागृत करण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
शिवानीने महाराष्ट्रातील लोकप्रिय धार्मिक स्थळांवर या कार्यक्रमाच्या चित्रीकरणास प्रारंभ केला आहे. ती आता बीड मध्ये असून पुढील चित्रीकरण करण्यास आतुर आहे. शिवानी म्हणाली, “लॉकडाऊन नंतर पहिल्यांदा आउटडोर शूटचा अनुभव ‘मन मंदिरा’ या कार्यक्रमामुळे मिळाला. थोडी भीतीही वाटत होती, पण कार्यक्रमाचं चित्रीकरण करताना सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जात होती. सरकारने घातलेल्या नियमांनुसार सोशल डिस्टंसिंगचं पालन करून, शूट लोकेशन नियमित सॅनिटाईझ करून, सगळ्यांचं टेम्परेचर चेक करूनच शूटिंगची सुरुवात होते. देवाच्या कृपेने सगळं हळूहळू रुळावर येत चाललंय, त्याचा असाच आशीर्वाद आपल्यावर असुदे हीच ईश्वर चरणी प्रार्थना.”