लॉकडाऊनमध्ये घरी बसून काय करायचं असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण आता हाच प्रश्न वाहिन्यांनी सोडवला आहे. केवळ ९० च्या दशकातील मालिका नाही तर अलिकडेच बंद झालेल्या पण प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय मालिकांचे पुन: प्रक्षेपण करण्याचा निर्णय वाहिन्यांनी घेतला आहे. काही दिवसांपूर्वी अमोल कोल्हे यांनी ट्वीट करत स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका दाखविणार असल्याचे सांगितले होते. या नंतर आता झी मराठीवरील आणखी काही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
‘स्वराज्यरक्षक संभाजी’नंतर आता ‘तुला पाहते रे’ व ‘जय मल्हार’ या दोन लोकप्रिय मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. लॉकडाउनमुळे सर्व शूटिंग बंद असल्याने गाजलेल्या मालिका पुन्हा प्रसारित केल्या जात आहेत. येत्या ६ एप्रिलपासून या दोन्ही मालिका पुन्हा सुरू होणार आहेत.
६ एप्रिलपासून दुपारी १२ वाजता ‘तुला पाहते रे’ आणि संध्याकाळी सहा वाजता ‘जय मल्हार’ या मालिका बघयाला मिळणार आहे. दुसरीकडे अवघ्या महाराष्ट्राचं अराध्यदैवत असलेल्या श्री खंडेरायांची चरित्रगाथा सांगणारी ‘जय मल्हार’ ही मालिकासुद्धा घराघरांत लोकप्रिय झाली होती. मालिकेसोबतच यातील कलाकारांना म्हणजेच मल्हार देवाची भूमिका साकारणारे देवदत्त नागे, म्हाळसाबाईंच्या भूमिकेतील सुरभी हांडे आणि बानूबाईंच्या भूमिकेतील ईशा केसकर यांनाही प्रचंड लोकप्रियता मिळाली.
त्याचबरोबर जून महिन्यात ज्या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप ही मालिका म्हणजे ‘तुला पाहते रे’ . विक्रांत सरंजामेची भूमिका साकारणारा सुबोध भावे व इशा निमकरची भूमिका साकारणारी गायत्री दातार यांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मनं जिंकली. गायत्रीने या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं.
झी मराठीवरील मालिकांबरोबरच प्रवाहवरील राजा शिवछत्रपती आणि आंबटगोड या लोकप्रिय मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सध्याच्या नकारात्मक वातावरणात या दोन्ही मालिका प्रेक्षकांना नक्कीच नवी उभारी देतील. शुक्रवार ३ एप्रिलपासून दररोज सायंकाळी ५ वाजता आंबटगोड आणि ५.३० वाजता राजा शिवछत्रपती या लोकप्रिय मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. शिवरायांचा जाज्वल्य इतिहास प्रत्येक पिढीला भविष्यातील नवे क्षितिज गाठण्यासाठी सदैव प्रेरणा देत असतो. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी निर्मिती केलेल्या या मालिकेचं दिग्दर्शन हेमंत देवधर यांनी केलं आहे. अजय अतुल यांनी संगीतबद्द केलेले मालिकेचं शीर्षकगीत प्रत्येक शिवप्रेमीच्या मनामनात आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज, मृणाल कुलकर्णी यांच्या जिजाऊ, अविनाश नारकर यांचे शहाजी राजे, यतीन कार्येकर यांचा औरंगजेब आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. हेच सोनेरी क्षण पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहेत.