घरफिचर्ससत्ताबाजार

सत्ताबाजार

Subscribe

शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद आणि महत्त्वाची समसमान खाती हवी आहेत तर त्यांनी भाजपशी काडीमोड घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी संसार थाटण्याची हिंमत दाखवायला हवी. पण, तेवढी हिंमत मातोश्री दाखवू शकणार नाही. कारण अनेक हेतू त्यात गुंतले आहे. मुख्य म्हणजे मुंबई महापालिकेच्या सत्तेत शिवसेनेचा जीव गुंतला आहे. भाजपने ठरवले तर कधीही ते शिवसेनेची सत्ता खाली खेचू शकतात. याशिवाय सांगता येणार नाही अशी आणि ईडीच्या वर्तुळात येऊ शकतील, असे काही ‘कारभार’ शिवसेनेचे असूही शकतात. राजकारणात कोणी सभ्य नाही.

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून एक आठवडा झाल्यानंतर आणि महायुतीला बहुमताचा स्पष्ट कौल असताना अजूनही भाजप आणि शिवसेना मित्रपक्षांचे सरकार बनत नाही म्हणजे कमाल झाली. एकूणच ही सारी गंमत सुरू आहे, असे म्हणायची वेळ आली आहे. गावाकुसात, शहरांत दिवाळी आली की तमाशाचे फड, सर्कस, डोंबारी, दरवेशी, नंदीबैल आणि बहुरूपी असे खेळ येतात. लोकांचे दोन घटका मनोरंजन होते. शेतंभातं पिकली असल्याने पै पैसा धान्य अडका गाठीशी असल्याने वर हात करून खेळाला दोन पैसे देताना गरीब सरीबाचा हात कधी आखडत नाही. पण, सध्या महाराष्ट्रात दिवाळीच्या तोंडावर सुरू झालेला आणि अजूनही संपत नसलेला सत्तेचा खेळ पाहून जनता विटली आहे. आधीच अवकाळी पावसाने थैमान घालत हातचा घास हिरावून नेला आहे आणि त्यात हा खेळ… हे काय चाललंय. बळीराजाचे अश्रू पुसण्याची ही वेळ असताना माझा का तुझा मुख्यमंत्री यात लोकांना आता काडीचा रस उरलेला नाही. कारण आधीच महागाई, बेकारी, मंदीने कंबरडे मोडले आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी आणि आता विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना जागा वाटपाच्या वेळी तुमचे सारे ठरले होते, तर हा खेळ कशाला?

महायुतीची सत्ता येऊनही भाजप आणि शिवसेनेला पुन्हा एकदा आपले सरकार आल्याचा आनंद जनतेने काही मिळवून दिलेला नाही. दुसर्‍या बाजूला पंधरा वर्षे बेबंदशाही कारभार करणार्‍या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला दुसर्‍यांदा विरोधकांमध्ये बसवले आहे. आघाडी विरोधकांच्या खुर्चीवर बसणार हे अपेक्षित होते. पण त्यांचे अस्तित्व दिसणार नाही, असे भाजपचे नेते सांगत होते तसे काही झाले नाही. राष्ट्रवादी ५४ आणि काँग्रेसला ४४ असे मिळून आघाडीच्या पदरात ९८ जागांचे देणे टाकताना लोकशाही जिवंत ठेवली. हे सारे सांगण्याचे कारण म्हणजे या सार्‍या आकड्याच्या खेळात आता सत्तेसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. १०५ जागा मिळवून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी स्वबळावर ते सत्ता स्थापन करू शकणार नाहीत आणि महायुती करून सरकार बनवायचे ठरवले तरी शिवसेना आता किंग मेकरच्या भूमिकेत गेली आहे. मातोश्रीला आता अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद आणि सत्तेत समान वाटा हवा आहे. महत्त्वाची खाती समसमान वाटून घेतली पाहिजेत, अशी शिवसेनेची भूमिका आहे आणि ती सध्या शिवसेनेचे नेते संजय राऊत चांगली रंगवत आहेत. गावात असे काही अस्थिर असेल तर या चाणक्य नेत्याला भलतेच महत्त्व येते.

- Advertisement -

आगीत तेल ओतून ते आणखी खळबळ माजवून देतात. आपला हा आवडता खेळ खेळायला त्यांनी आता जोरात सुरुवात केली आहे. इस्लामाबादला शिवसेनेचे फलक झळकले यामागे राऊत होते, असे आणि पक्षाबरोबर आपले महत्त्व वाढवण्यात ते तरबेज आहेत. कदाचित ते सिल्वर ओकच्या इशार्‍यावरूनही दिवाळीच्या वातावरणाचा फायदा घेऊन फटाके लावत असतील. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर आपले दुसरे राजकीय गुरू शरद पवार यांना मानणार्‍या राऊत यांनी या सत्तेच्या खेळात पवार यांची भेट घेऊन भाजपला आणखी टेंशन दिले आहे. शिवसेनेच्या मुखपत्रातून आधीच बोचरी टीका करून भाजपला घायाळ करणार्‍या राऊत यांना फडणवीस डोळ्यासमोर धरायला तयार नाहीत. सत्तेची बोलणी करायची असेल तर राऊत नको, असा फडणवीशी फतवा मुख्यमंत्र्यांनी काढला आहे. राऊत यांनी आपली भूमिका चोख बजावल्याने मातोश्री खूश आहे. कारण वांद्रे येथील गडावरून आदेश आल्याशिवाय प्रभादेवीच्या ‘सद्गुरु’वरून तोफांचे आवाज येणार नाहीत, हे कळण्याइतकी जनता आता हुशार आहे.

राजकारणात काही होऊ शकते. जर तरला काहीच महत्त्व नसते, असे राजकीय नेते कितीही वरचा सूर लावून सांगत असले तरी या जर तरच्या मधल्या ओळीत राजकारण फिरत असते. आम्हाला सत्तेसाठी दुसर्‍या पर्यायाचा विचार करायला भाग पाडू नका, असे सांगत राऊत यांनी मोठा फटका लावल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तो आवाज सहन झालेला नाही. शिवसेनेच्या मुखपत्रातून निकाल लागल्यानंतर जी काही फटाकेबाजी सुरू आहे, त्यामुळे मुख्यमंत्री नाराज आहेत आणि ही नाराजी शंभर टक्के असल्याचे ते म्हणत आहेत. आम्ही सोबत आहोत तर असे लिहिण्याची गरज नाही. एवढ्या ताकदीने कधी काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधातही लिहून दाखवावे, असा टोला देखील फडणवीस यांनी हाणला आहे. हा टोला मारताना त्यांनी एक मोठे विधान केले आहे ते म्हणजे पाच वर्षे मुख्यमंत्री मी आणि मीच असणार आहे. तसेच आमदार आणि शिवसैनिकांच्या माध्यमातून ठाकरे घराण्यातील पहिले आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्याची घाई मातोश्रीला झाली आहे.

- Advertisement -

तसे फलक आणि आमदारांच्या बैठकीतील मागणी सर्वत्र पोहचली पाहिजे, हे ठरवून केले जात आहे. भाजपही काही धुतल्या तांदळासारखी नाही. शिवसेनेच्या दबावामुळे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा नाराज असून यामुळे त्यांनी मुंबई भेट रद्द केली ते शिवसेनेचे ४५ आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहेत, असे खासदार संजय काकडे यांच्या तोंडून बोलायला भाग पाडण्यापर्यंत डावपेच खेळायला सुरुवात झाली आहे. मुख्य म्हणजे पडद्यामागे वेगाने घडामोडी घडत आहेत. याकामी माहीर असलेले मिलिंद नार्वेकर आणि प्रसाद लाड यांनी आपल्या आवडत्या भूमिका रंगवायला सुरुवात केली आहे. २८ अपक्ष आमदारांपैकी अधिकाधिक आमदार आपल्या बाजूने वळवून आपण किती ताकदवर आहोत, हे दाखवले जात आहे.

सत्तेसाठी रस्सीखेचचा हा प्रयोग बघताना प्रेक्षकांत बसूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनाही महत्त्वाकांक्षेचे धुमारे फुटले आहेत. शिवसेनेला हवा देताना काँग्रेसने उघड आणि राष्ट्रवादीने गुपचूप पाठिंबा देण्याच्या हालचाली तेज केल्या आहेत. शिवसेनेला गप्प बसून चालणार नाही आणि ‘हीच ती वेळ’ असल्याचे सारखे बजावत आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी पुढाकार घेताना शिवसेना आमचा पाठिंबा मागत असेल तर दिल्लीत आमच्या नेत्यांबरोबर आम्ही बोलायला तयार आहोत, असे सांगून थोरातांनी सत्तेच्या खेळात आणखी रंगत आणली आहे. खरेतर त्यांनी या उचापत्या करण्यापेक्षा आपला पक्ष पुढे कसा वाढेल, याकडे लक्ष द्यायला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आता शांत बसले असले आणि आम्ही विरोधकांच्या बाकावर बसून सत्ताधार्‍यांवर अंकुश ठेवू, असे म्हणत असले तरी ते स्वस्थ बसणार्‍यातील नाही.

अजून सत्तेचा हा खेळ बराच रंगायचा असल्याने पवार त्यात रंग हा भरणारच. २०१४ मध्ये न मागताही आपला भाजपला पाठिंबा असल्याचे सांगत राष्ट्रवादीने आपला सत्तालोलूप रंग दाखवला होता. निवडणुकीच्या प्रचार काळात कोसळणार्‍या पावसात हा रंग निघून सक्षम विरोधी पक्षाचे दान जनतेने त्यांच्या पारड्यात टाकले आहे आणि हे दान म्हणजे पुढची पाच वर्षे सत्तेवर अंकुश ठेवण्यासाठी जनतेने दिलेला कौल आहे, हे ध्यानात ठेवून काम केले तरच भविष्य उज्ज्वल असेल, असे यातून सूचित होते. तसाच इशारा भाजप आणि शिवसेनेला दिला आहे. या इशार्‍यातून समजून त्यांनी सरकार स्थापन करून मागच्या पाच वर्षांत केलेल्या चुका सुधारायला हव्यात. मात्र तसे होण्यापूर्वी रस्सीखेच करून आपल्या पदरात जास्तीत जास्त मोठे दान कसे पडेल यासाठी साठमारी सुरू झाली आहे.

२०१४ साली सत्तेत बसताना ६३ जागा मिळूनही शिवसेनेला दुय्यम खाती मिळाली होती. यावेळी मात्र सेनेच्या ७ जागा कमी झाल्या आहेत; पण भाजपच्या १८ जागा वजा झाल्यात. या वजा जागा आपल्याला सत्तेत समान वाटा देतील, असे सेनेला वाटते. किमान मुख्यमंत्रीपद नाही तर उपमुख्यमंत्रीपद आणि कॅबिनेटमधील महत्त्वाची खाती आपल्या पदरात पडतील, यासाठी त्यांनी ही रस्सीखेच सुरू केली आहे. हरयाणातही सरकार बनवताना भाजपला जननायक जनता पक्षाची मदत घ्यावी लागली आणि या पक्षाचे नेते दुष्यंत चौटाला यांना उपमुख्यमंत्रीपद द्यावे लागले. पाच वर्षांपूर्वी सत्तेत सहभागी होऊन दुय्यम वागणूक मिळालेल्या शिवसेनेला लोकसभेतही भाजपनंतर सर्वाधिक १८ जागा मिळूनही अवजडसारखे महत्त्व नसलेले खाते मान खाली घालून घ्यावे लागले होते. ही मानहानी, जागावाटपात कायम छोटा भाऊ राहून मिळतील त्या जागा घेऊन मानावे लागणारे समाधान या सर्वांवर यावेळच्या निकालाने सत्तेत समान वाटा या वाटेवर शिवसेनेला आणून सोडले आहे. याआधी आम्ही गप्प बसलो होतो, पण आता नाही असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला आणि रस्सीखेच सुरू झाली.

शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद आणि महत्त्वाची समसमान खाती हवी आहेत तर त्यांनी भाजपशी काडीमोड घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी संसार थाटण्याची हिंमत दाखवायला हवी. पण, तेवढी हिंमत मातोश्री दाखवू शकणार नाही. कारण अनेक हेतू त्यात गुंतले आहे. मुख्य म्हणजे मुंबई महापालिकेच्या सत्तेत शिवसेनेचा जीव गुंतला आहे. भाजपने ठरवले तर कधीही ते शिवसेनेची सत्ता खाली खेचू शकतात. याशिवाय सांगता येणार नाही अशी आणि ईडीच्या वर्तुळात येऊ शकतील, असे काही ‘कारभार’ शिवसेनेचे असूही शकतात. राजकारणात कोणी सभ्य नाही. हे फटाके मागे लावून घ्यायचे की उपमुख्यमंत्रीपदासह एकूण मिळून १३ खाती पदरात पाडून घ्यायची हा चेंडू आता शिवसेनेच्या कोर्टात आहे. देशाच्या इतिहासात कुठल्या सत्ताधार्‍यांनी केला नसेल इतका ईडीचा वापर भाजपने केला आहे आणि मुख्य म्हणजे कधी ईडीची पिडा मागे लावायची हे भाजपला बरोबर कळते. विशेष म्हणजे शिवसेनेला या सार्‍याची कल्पना नाही, असे मुळीच नाही.

फडणवीस आणि उद्धव यांचे राजकारणाच्या पलीकडे जाऊन वैयक्तिक उत्तम संबंध आहेत. युतीत समसमान जागांची मागणी करणार्‍या शिवसेनेला बाजूला करा आणि स्वबळावर निवडणुकांना सामोरे जा, अशा स्पष्ट सूचना अमित शहा यांनी दिल्या होत्या. पण, शिवसेनेला सोबत घेऊन जायचे हे फडणवीस यांनी आधीच ठरवले होते आणि भाजपच्या अपेक्षेपेक्षा जागांचे मोठे दान त्यांनी शिवसेनेच्या पारड्यात टाकले. खरेतर स्वतंत्र लढूनही २०१४ साली ६३ जागा मिळवणार्‍या शिवसेनेला यावेळी ५६ जागा मिळाल्या, यावरून त्यांनी आपली ताकद ओळखायला हवी आहे. पण, तसे न करता त्यांना सहाव्या माळ्यावर मुख्यमंत्रीपदाची खुर्ची हवी आहे आणि ती कदापि भाजप देणार नाही. दिल्लीवरून पक्षश्रेष्ठींनी आता फडणवीस यांना आता बस… शिवसेनेशिवाय सत्ता बनवण्याच्या कामाला लागा, अशा सूचना दिल्या आहेत. सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तेचा दावा करा, पुढे बहुमताचे बघता येईल. गोवा आणि कर्नाटकमध्ये रंगवला तसा सत्तेचा खेळ करता येईल… हाय काय, नाय काय! शेवटपर्यंत ताणून धरून अखेर सोडून द्यायचे, अशी ओळख असणारी शिवसेना पुन्हा एकदा मान खाली घालून सत्तेत सामील होईल आणि या खेळावर पडदा पडेल. कदाचित तो दिवस रविवारी संध्याकाळी असेल किंवा पुढे आणखी तीन एक दिवसांनी… तोपर्यंत खेळाचा शेवटचा अंक रंगलेला असेल!

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -