घरफिचर्सअवकाळाचे चरित्र

अवकाळाचे चरित्र

Subscribe

पाहता पाहता या शतकातील अठरा वर्षे संपत आली. भारत देश महासत्ता होण्याच्या माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलामांनी पाहिलेल्या स्वप्नांच्या पुर्तीसाठी अवघी दोन वर्षे शिल्लक उरली. अर्थात आता हे दिवा स्वप्न वाटत असले तरी कल्पिलेले स्वप्न देशाच्या भवितव्यासाठी प्रेरक होते. परंतु, त्याच्या पूर्तीसाठी पडणारी पावले शिस्तबद्ध हवी होती. अवाढव्य लोकसंख्या आणि विविधता देशाचा स्थायीभाव असला तरी देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पोषक वातावरण कायमच होते.

महानगरातील झोपड्यांत आणि खेड्यात आजही किड्या मुंग्यांसारखी जगतात माणसं. रेशनच्या रांगेत देशाचे भवितव्य ठळक दिसते दारिद्य्ररेषेखाली बारमाही. लोकसंख्येच्या अर्ध्या समूहाच्या वाट्याला पोटाची खळगी भरण्याची भ्रांतकायमचीच. स्वातंत्र्याचा ‘प्रकाश’ असंख्य तांडे, वाड्या, वस्त्यांवर पोहोचला नाही अद्यापही. मोफत वायफायच्या वल्गना एकीकडे तर दुसरीकडे फक्त शिक्षणाच्या सक्तीची भाषा. ही सक्ती केली काय? अन् मोफत दिले काय? मुळात अंग झाकायला कपडाच नसेल तर शाळेच्या चारभिंती आत जावून उघडे नागडे बसायचे तरी कसे, हा प्रश्न सतावत असतो गोरगरिबांच्या लेकरांना. पोटाचाच पीळ सुटत नाही म्हणून छोटी छोटी हॉटेल, विटभट्ट्या, गॅरेजेस, खदानी, शेतात राबताना सर्रास दिसतो उद्याचा ‘कोवळा’ भारत. रानावनात, जंगलात, झोपड्यांत आदिवासी पाड्यांवर, गावकुसाच्या वाड्यांवर फाटकाच असतो प्रपंच गरिबांचा. यात लेकरांना शाळेत टाकायचे कसे? ही विवंचना नित्याचीच. म्हणूनच असंख्य लेकरांना ओढता आली नाही कधी शाळेच्या पाटीवर पांढरी रेघ.

आजही मजल दरमजल करीत भटकत असतात ‘पालं’ या गावाची त्या गावाला पाठीवर ‘पोट’ घेवून महासत्ता होण्यास निघालेल्या देशात. ह्यात दारिद्य्र पाचवीला घेवून आयुष्याची गुजराण करणार्‍या भटक्या आयुष्याची मुशाफिरी सत्तर वर्षांतही थांबवू शकले नाही हे स्वातंत्र्य. शेतकरी, शेतमजूर, हमाल, मापाडी, भंगारवाले, लव्वालोखंडवाले, दगडमातीवाले, मोहल्यातील, झोपड्यातील, रस्त्यातील, वस्त्यांतील, जंगलातील याच देशाचे नागरिक. त्यांचाही असतो एक चेहरा काळवंडलेला; जो कधीच दिसत नाही दिल्लीच्या लाल किल्ल्यावरुन पंधरा ऑगस्ट रोजी नाना वल्गना करताना. आजही महानगरातील असंख्य वस्त्यांमधून, रेल्वे रुळांच्या आजूबाजूला दाटीवाटीने कुरतडत राहतं भणंग आयुष्य माणसांना; अन्न, वस्र, निवारा या मूलभूत गरजांच्याच गराड्यात. तिथे नसते जात, धर्म, पंथ, प्रांत आणि भाषा ‘पोट’ भरताना. मात्र, भरलेल्या पोटात सामावलेला असतो एक अख्खा देश त्यात असतो प्रत्येकाला एक एक धर्म, जात-पात, पंथ, प्रांत आणखी बरेच काही. तिथेच निवडणुकींच्या हंगामात बोकळतात लोकशाही व व्यवहाराचे ‘काळे’ घोडे. लोकशाहीलाच उभे केले जाते बाजारात, तिचीच लागते बोली, ठरतो भाव आणि स्वस्तात विकत घेतल्या जातात भणंग वस्त्या चने, फुटाणे आणि बाटल्यांवर. जमलेच नाही एवढ्यात तर ऐन हंगामात इतिहासाच्या पानांवरची धूळ झटकून घातली जाते साद अस्मितांना. माणसांच्या कळपांना केले जाते जायबंदी असल्या हुकमी ‘चाली’ खेळत. जाती, धर्मांचा ‘कोळदांडा’ घालून सोडली जातात माणसं ‘रंग’ पाहूनच समूहात. चाली, प्रतिचाली, मोर्चे, आंदोलने, निर्देशनांसाठी ‘जात’ वार पेटवली ‘आग’ की माणसं विसरतात तहानभूक; हे जुनेच गणित आखत असते व्यवस्था वारंवार..

- Advertisement -

असल्या ‘बेईमान’ उजेडात एक ‘वात’ जपून नेण्याचे आवाहन असते मित्रांनो. पण याचेच उरले नाही भान गिधाडांच्या टोळ्यांना. डोक्यात भुसा अन् हातात दगड, गोटे घेवून बोंबलत सुटतो आम्ही निरपराधांच्या वस्त्यांकडे. पुन्हा कोणत्या रंगाचा झेंडा घेवून धावली फौज त्यावर ठरते हिंस्त्रता. पांढर्‍या बगळ्यांचा असतो वरदहस्त चेहरा नसलेल्या गर्दीला. जुने-पुराणे असतात हिशोब त्यांचे, होतात चुकते गर्दी आडून.

- Advertisement -

ज्या हातात असावी पाटी-पेन्सिल ते हात आवळतात मुठी आणि होतात झुंडीत सामील तेव्हा ‘भारत माझा देश आहे,सारे भारतीय माझे बांधव’ ही फोल ठरते प्रतिज्ञा. कपाळावरचा गंध, डोक्यावरची टोपी, गळ्यातील रुमाल, वाढलेली दाढी, घरावरचा झेंडा ठरवत असतो आमचे अमुक तमुक असणे. ‘शिळा’ होवून पडलेल्या पुराणातल्या देवीच्या सैन्यासारखं समाज नुसता पाहतो तुकड्या-तुकड्यात ‘विलग’ होत जाणारे आपले अस्तित्व. कारण प्रश्न ‘बेगडी’ अस्मितांचे बसलेत वर्तमानाच्या बोकांडी, संपलेत सत्तर साल आझादीचे पण रुजली नाही समता-बंधुता.‘मानवता’ शिकवणारी व्यवस्था कायमच घातली थडग्यात धर्ममार्तंडानी. तेव्हाच मावळत गेली तिळा तिळाने रोज आमची एकमेकांविषयीची आस्था, म्हणून संपत नाही शिमगा दुष्मनांचा; काळ मागतच राहतो निरपराधांचा बळी, लटकवण्यासाठी प्रत्येक क्रुसाला एक निष्पाप माणूस. रस्त्यावर उतरलेल्या जथ्यांच्या डोक्यात असतात इतिहासात नसलेले अभद्र विषाणू. ते टोकरतात एक एक मेंदू, तसे इकडे ‘हातं’ उचलत दगड-गोटे आणि भिरकवत असतात ‘रोबोट’ बनून. त्यांचा रिमोट असतो कोसो दूर कुठल्या तरी धर्मग्रंथाच्या पानावर निश्चित पहुडलेला. कोणाच्या तरी जिभेवर आग ओकत, कोणाच्या मेंदूत ध्रुवीकरणाचा डाव खेळत, रचत जातो पत्त्यांचा डाव तो. एक्का, दुर्री, तिर्री करीत केले जातात असंख्य तरुण मेंदू ‘गुलाम’ संमोहाने; सोडली जाते बीन भांडवली विषाणूची पैदास; पिढ्यान्पिढ्या त्यांची वंशावळ चालत राहावी म्हणून.

भावांनो…वेळीच ओळखा या विषाणूंचा ज्वर. नसता या बेगडी अस्मिता अन् आतबट्याच्या व्यवहारात खपतील अजून कैक पिढ्या. इतिहासाची पानं चाळून नसतो चालत संसार. काळाचे भान ठेवूनच करावे लागते ‘वर्तन’ व घ्यावा लागतो भविष्यवेध हे तुम्हाला आताशा कळायलाच हवे. किती दिवस लढणार आम्ही रोज नवी लढाई जाती,धर्माचे ‘विष’ पोटात घेवून आपापसांत.

मतांच्या बेरजेऐवजी ‘राष्ट्रहित’ला प्राधान्य द्यावे लागेल. ‘मानवता’ हाच धर्म आणि ‘भारतीयत्व’ हीच आमची जात सगळ्याला ओरडून सांगावं लागेल. दहशतवाद, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, गरिबी, दारिद्य्र इत्यादी समस्यांचे उच्चाटन करीत सामाजिक न्यायाची प्रस्थापना करुन ‘हम सब एक है’ चा नारा पुन्हा नव्याने बुलंद करावा लागेल..!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -