घरफिचर्सभारतीय नॉस्ट्राडेमसचे भविष्य

भारतीय नॉस्ट्राडेमसचे भविष्य

Subscribe

– भाऊ तोरसेकर

आमीर खानच्या चित्रपटाच्या गीतामध्ये महागाईचे इतके वर्णन आठ वर्षांपूर्वी आलेले असेल आणि त्यातही पेट्रोल-डिझेलचा उल्लेख आलेला असेल, तर आज आभाळ कोसळून पडल्याचा गदारोळ निव्वळ भंपकपणा आहे. त्यासाठी भाजपाने, युपीएच्या काळातील किंमतीचा आलेख दाखवण्याची गरज नाही की काँग्रेस व पुरोगाम्यांनी किंमतवाढीसाठी गळा काढण्याचे कारण नाही. 

कधीकाळी म्हणजे चार वर्षांपूर्वी पियुष गोयल हे बहुतेक वाहिन्यांवर भाजपाचे प्रवक्ते म्हणून झळकत होते आणि तत्कालीन युपीए सरकारचे अर्थमंत्री असलेल्या पी. चिदंबरम यांच्या अर्थकारणावर सडकून टीका करायचे. सध्या योगायोग असा की, विद्यमान अर्थमंत्री अरुण जेटली उपचारार्थ सुट्टीवर गेलेले असून, गोयलच अर्थमंत्री म्हणून काम बघत आहेत. त्याचा अर्थ चिदंबरम यांनी काँग्रेसच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी उचलली असा होत नाही. पण अधूनमधून चिदंबरम प्रवक्तेपद सांभाळत असतात. आपला विषय नसलेल्या कामात लुडबुडणे, हा त्यांचा जुनाच स्वभाव आहे.

- Advertisement -

चिदंबरमांची जादूची कांडी                                                                                                  2008 सालात कसाब टोळीने मुंबईवर हल्ला केला, तेव्हा तत्कालीन गृहमंत्री शिवराज पाटील यांना हाकलून चिदंबरम यांना गृहमंत्री करावे लागलेले होते. पण गृहखात्यापेक्षाही चिदंबरम आर्थिक विषयावरच अधिक बोलायचे. आताही पेट्रोलच्या किंमती खूपच वधारल्याने लोकांमध्ये चलबिचल निर्माण झालेली आहे, तेव्हा चिदंबरम यांनी जादूची कांडी फिरवून त्या किमती 25 रुपयांनी खाली आणल्या जाऊ शकतात, असे विधान केलेले आहे. इतकी सहज स्वस्ताई करणे शक्य असेल, तर अर्थमंत्री असताना चिदंबरम यांनी त्याचा अवलंब कशाला केला नव्हता? त्यांच्या काळात इंधनाच्या किंमती पार कोसळलेल्या होत्या आणि फुकटातच पेट्रोल वगैरे मिळत होते काय? चिदंबरम यांना जे शक्य वाटते आहे, ते मोदी सरकारला का शक्य नाही? आणि चिदंबरम यांना जे शक्य वाटते आहे, तेच त्यांनी त्यांच्या अधिकारात कशाला केलेले नव्हते? की चिदंबरम यांनाआमीर खान हा भारतीय नॉस्ट्राडेमस वाटतो? नॉस्ट्राडेमस नावाचा कोणी पाश्चात्य देशातला भविष्यवेत्ता असून, त्याने हजारो वर्षांपूर्वी भविष्यात काय घडणार ते लिहून ठेवलेले होते, असे म्हणतात. चिदंबरम यांना आमीर खान त्याचीच भारतीय आवृत्ती वाटते की काय? नसेल तर त्यांनी इतकी गंमतीशीर विधाने केलीच नसती.

‘सय्याजी बहुतजी कमात है, दायन महंगाई खाये जात है’
पेट्रोल डिझेलच्या किंमती आभाळाला जाऊन भिडलेल्या आहेत. त्याचे कारण त्यावर केंद्र सरकार ज्या पद्धतीची करवसुली करते, त्यातच दडलेले आहे. पण यातले बहुतांश कर मोदी सरकारने सत्तेत आल्यानंतर लागू केलेले नाहीत. काँग्रेसच्या आमदनीत आणि पुढे चिदंबरम अर्थमंत्री असलेल्या युपीएच्या कालखंडातही तीच वसुली चालू होती. तेव्हा लोकांच्या पगार व उत्पन्नाच्या तुलनेत पेट्रोल व डिझेल खूपच स्वस्त होते आणि राजीखुशीने लोक आपल्या खिशातले पैसे काढून सरकारच्या तिजोरीत भरणा करीत होते काय? किंबहुना आज जे 25 रुपये सरकारने घेऊ नयेत असा चिदंबरम यांचा सल्ला आहे, तीच जादूची कांडी त्यांनी त्याच्याच कारकिर्दीत फिरवली असती, तर मोदींना लोकसभेत यश मिळाले नसते, की मोदींच्या चुका दाखवण्याचा नसता उद्योग चिदंबरम यांना करावा लागला नसता. जो हिशोब चिदंबरम सांगत आहेत, ती करवसुली त्यांच्या काळातही अखंड चालू होती आणि त्याचेच प्रतिबिंब तेव्हाच्या अनेक वर्तमानपत्रे व माध्यमांतही पडत होते. म्हणून तर आमीर खान याने 2010 सालात निर्माण केलेल्या ‘पिपली लाईव्ह’ नावाच्या चित्रपटात एक गाजलेले गाणे समाविष्ट होऊ शकले. ‘सय्याजी बहुतजी कमात है, दायन महंगाई खाये जात है’ अशा स्वरूपाचे गाणे खूप गाजले होते आणि चित्रपटही खूप चालला होता. मग ते गाणे वा त्यातली वर्णने काय 2018 मध्ये मोदी सरकारच्या कालखंडात होऊ घातलेल्या इंधन दरवाढीची होती काय? असतील तर आमीर खानला भारताचा नॉस्ट्राडेमसच म्हणायला हवे. कारण त्या चित्रपटातील प्रसंग व घटनाक्रम आज चाललेल्या तक्रारीशी जुळणारा आहे. पण टिकेचा सूर असा आहे, की देशात प्रथमच महागाई असह्य झाली असून, पेट्रोल डिझेलच्या किंमतीही प्रथमच आकाशाला जाऊन भिडलेल्या आहेत. अन्यथा युपीएचा कालखंड म्हणजे स्वस्ताईचा सुकाळच असावा ना?

- Advertisement -

इंधनवाढीचा चाललेला गाजवाजा आणि राजकीय तमाशा
सोयाबीन, तुरीच्या किंमती वा शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा बाजारातील महागाई व त्यामुळे सामान्य
नागरिकाचे खेडूताचे असह्य झालेले जीवन हे आमीर खानच्या चित्रपटात आलेले वर्णन व घटनाक्रम तत्कालीन असेल, तर चिदंबरम धडधडीत खोटेपणा करीत असावेत. नसेल तर आमीर खान हा आठदहा वर्षे पुढल्या घटनांवर चित्रपट निर्माण करणारा नॉस्ट्राडेमस असला पाहिजे. पण त्या दोन्ही गोष्टी खऱ्या नसून, आज इंधनवाढीचा चाललेला गाजवाजा राजकीय तमाशा आहे. त्यासाठी मोदी सरकारला झोडपून काढायला अजिबात हरकत नाही. पण आज जी स्थिती आहे, त्यापेक्षा आधीच्या कालखंडात फारच सुखवस्तू जीवन होते, असा आभास निर्माण केला जातो, ती निव्वळ बदमाशी आहे. कुठलीही सत्ता कधीच लोकांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करू शकत नसते आणि सर्वांना समाधानी करणे कोणालाही शक्य नसते. त्यामुळेच काही त्रुटी प्रत्येकाच्या कामात राहत असतात. पण त्यातल्या त्यात कमी त्रासदायक असेल, त्याला लोक निवडत असतात. मोदींची लोकप्रियता त्यापेक्षा अधिक नव्हती वा नाही. काँग्रेस, युपीए वा पुरोगामी तमाशापेक्षा सुसह्य सरकार, इतकीच मोदी सरकारची महत्ता आहे. हे सरकार अतिशय कल्याणकारी वा निर्भेळ स्वच्छ असल्याचा दावा कोणी करणार नाही आणि केला तरी तो खोटाच असेल. पण नागड्यापेक्षा लंगोटी लावलेला सभ्य म्हणावे, इतकाच फरक असतो आणि लोकांना त्यातून पर्यायाची निवड करावी लागत असते. आमीर खानच्या चित्रपटाच्या गीतामध्ये महागाईचे इतके वर्णन आठ वर्षापूर्वी आलेले असेल आणि त्यातही पेट्रोल डिझेलचा उल्लेख आलेला असेल, तर आज आभाळ कोसळून पडल्याचा गदारोळ निव्वळ भंपकपणा आहे. त्यासाठी भाजपाने युपीएच्या काळातील किंमतीचा आलेख दाखवण्याची गरज नाही, की कॉग्रेस व पुरोगाम्यांनी किंमतवाढीसाही गळा काढण्याचे कारण नाही.

राहुल गांधी आणि पिढीजात पक्ष
राहुल गांधी आज आपल्या पिढीजात पक्षाचा नव्याने जिर्णोद्धार करायला कंबर कसून उभे रहात आहेत आणि अन्य पुरोगामी नेते पक्ष त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे ठाकलेले आहेत. पण राहुलच्या आजीने 1980 सालात लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसचा जिर्णोद्धार केला होता. त्याचे यापैकी एकालाही स्मरण नसावे याचे मोठे नवल वाटते. तेव्हा जनता पक्षाचा बोऱ्या वाजला होता आणि इंदिराजींच्या पाठींब्यावर पंतप्रधान होऊन पराभूत झालेले चरणसिंग सरकार हंगामी म्हणून कार्यरत होते. तेव्हा पुन्हा लोकसभा जिंकण्यासाठी इंदिराजींनी उत्तर भारतात 38 वर्षांपूर्वी दिलेली घोषणा आज त्यांच्या नातवालाही आठवत नाही, की चरणसिंगांच्या वंशजांना देखील स्मरत नाही. ती घोषणा होती, ‘खा गये शक्कर पी गये तेल, चरणसिंग के दोनो बैल.’ चरणसिंगांच्या लोकदल पक्षाचे चिन्ह नांगरधारी बैलजोडी असे होते. सांगायचा मुद्दा इतकाच, की आज ज्यांचे वय तिशीच्या आतले आहे, त्यांचा तेव्हा जन्मही झाला नव्हता. पण जे त्यावेळी राजकारणात व पत्रकारितेत होते, अशा सर्वांनाच त्या घोषणेचे स्मरण उरलेले नाही. देशात जणू पहिल्यांदाच इंधनाच्या किंमती भडकल्या असा आभास उभा केला जात आहे. तेव्हा देशात इंधनाचा खप आजच्या दहा टक्के सुद्धा नव्हता तेव्हाही हीच बोंब होती आणि आज त्याच्या शंभरपटीने वाहने व पन्नास पटीने इंधनाचा खप वाढल्यावरही तेच रडगाणे आहे. सत्ताधारी असोत वा विरोधी असोत. प्रत्येकजण आपल्या परीने लोकांच्या डोळ्यात धूळफ़ेक करण्यासाठी आपली बुद्धी खर्ची घालत आहेत. याचा अर्थ मोदी सरकार फ़ारच कार्यक्षम आहे वा होईल ती दरवाढ निमूट सह्न करावी; असा होत नाही. पण यापूर्वी खूप छानछान परिस्थिती होती आणि भारतवर्षातून सोन्याचा धूर निघत होता, असल्या भाकडकथा ऐकवल्या जाऊ नयेत. राजकारणात कोणीही साधूसंत नसतात. आपापले उल्लू सिधा करण्यालाच राजकारण म्हणतात. लाचार जनतेला दोनचारातला कमीत कमी नालायक निवडण्याचेच स्वातंत्र्य असते. त्यालाच लोकशाही संबोधले जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -