करोनावरील औषधोपचाराचा शोध अद्याप न लागल्याने परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अशा वेळी प्रत्येक नागरिकांनी आपापल्या घरीच थांबणे गरजेचे आहे. याशिवाय वाढता उष्माही प्रतिकारशक्ती कमी करु शकतो. त्यामुळे या काळात रोगप्रतिकारशक्ती टिकवून ठेवणे; किंबहुना ती वाढविणे जास्त आव्हानात्मक काम आहे. लिंबाचे थेंब टाकलेला चहा पिल्यास तरतरी टिकून राहिल, असा मोलाचा सल्ला प्रसिद्ध आहारतज्ज्ञ रंजिता शर्मा- चोबे यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना दिली.
प्रतिकुल परिस्थितीत हातपाय न गाळता या परिस्थितीशी नेटाने सामना करणे गरजेचे आहे. त्यासाठी रोगप्रतिकारशक्तीला महत्व द्यावे असे सांगत रंजिता शर्मा म्हणाल्या की, भारतीय संस्कृतीत ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ मानले जाते. ब्रह्म म्हणजे संपूर्ण विश्व. सध्या करोना व्हायरसने संपूर्ण विश्वाला विळख्यात घेतलेले आहे. त्यामुळे यातून सहिसलामत सुटायचे असेल तर अन्नाला महत्व देणे गरजेचे आहे. तसेच सरकारने ज्या आवश्यक सूचना दिलेल्या आहेत त्यांचे पालन करण्याचे कर्तव्य प्रत्येकाचे आहे. त्याचरोबर आपण सर्वांनी अशा प्रतिकूल परिस्थितीत स्वतःची रोग प्रतिकारशक्ती वाढवणे हा एक सर्वोत्तम उपाय आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपणास आपल्या रोजच्या जेवणामध्ये जीवनसत्व क घेणे अतिशय आवश्यक आहे.
क जीवनसत्वासाठीचे काही सोपे उपाय-
- कोमट पाण्यात एक संपूर्ण लिंबू पिळून प्यावे. दररोज दोन वेळा असे लिंबूपाणी प्यावे. लिंबाच्या सालासकट उपयोग केला तर अधिक उत्तम. त्यामुळे जंतुसंसर्गाशी लढा सक्षमपणे देता येतो.
- जेवणाची सुरुवात कच्चे पदार्थ खाऊन करावी. जसे, काकडी, टोमॅटो, मुळा, गाजर, कोशिंबीर आदी. जेणेकरून रक्तातील पांढर्या पेशी (डब्ल्यूबीसी) नियंत्रणात राहतील. या पेशी रोगप्रतिकार शक्तीला चालना देतात.
- दररोज आपल्या आहारात संत्री, मोसंबी यांचा रस घ्यावा. तो घरी तयार केलेला असावा.
- आहारात आवळा, हिरव्या पालेभाज्या, शिमला, कोबी, शेवग्याच्या शेंगा, टोमॅटो इत्यादींचा वापर आवर्जून करावा.
- आपल्या शरीरातील रक्ताचा पीएच (क्षारकता) नियंत्रित ठेवावा. त्यासाठी शरीर आपल्याला अल्कधर्मी (अल्कलाईन) ठेवणे गरजेचे असते. त्यासाठी योग्य आहार महत्त्वाचा ठरतो.
- जास्त अॅसिडीक पदार्थ खाल्ल्याने शरीरात जंतुसंसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. त्यासाठी जास्त प्रमाणात दूध, दुधाचे पदार्थ आणि मांसाहार टाळावा.
- शरीरातील पीएच नियंत्रीत ठेवण्यासाठी दररोज एक ग्लास कोमट पाण्यात जेष्ठमध घेतल्यास नक्कीच फायदा होतो.
असा तयार करा आयुर्वेदिक चहा-
- Advertisement -
आयुर्वेदिक महत्व शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी घरी तयार केलेला आयुर्वेदिक चहा उत्तम पर्याय आहे. त्यासाठी एक ग्लास पाणी घ्या. त्यात आलं, २ लवंग, एक तुकडा दालचिनी, 2 ते 3 काळे मिरे, २ इलायची, गवती चहा, तुळशीची पाने, पुदिना आणि गूळ टाकावा. औषधी गुणधर्मांनी युक्त असलेले हे पदार्थ दहा मिनीटे उकळून घ्यावेत. उकळल्यानंतर काचेच्या ग्लासमध्ये गाळून घ्यावे. लिंबाचे पाच ते सहा थेंब त्यात टाकावे. असा गरमागरम अॅण्टी ऑक्साईडयुक्त चहा दिवसातून दोन वेळा प्यावा.
काय खाऊ-पिऊ नये?
- उघड्यावरील अन्न पदार्थ, तळलेले पदार्थ, पाणीपुरी, मसालेदार पदार्थ, कोल्ड्रिंक्स, वडापाव, रस्त्यावरील शीतपेये, हॉटेलमधील फळांचे ज्यूस. अशा पदार्थांमधून जंतूसंसर्ग होऊ शकतो.
सर्वसामान्यपणे ही घ्यावी काळजी :
- दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्यावे
- मद्यपान व धूम्रपान करू नये
- स्वयंपाकाला सुरुवात करताना सर्वप्रथम आपले हात साबणाने किंवा लिक्विड सोपने स्वच्छ धुवावे
- सर्व भाजीपाला गरम पाण्यात मीठ टाकून स्वच्छ धुऊन नंतरच चिरावा
- चिरलेली भाजी तातडीने उकळणे, जास्त काळ उघडी ठेवणे चुकीचे आहे
- शक्यतो ताजे अन्न खावे
- फ्रिजमधील पदार्थ खाणे टाळावे
- आहारात लसून, आलं, हळद, काळे मिरे यांचा वापर करावा