घरफिचर्सनकोसा स्पर्श, नजर आणि प्रवास

नकोसा स्पर्श, नजर आणि प्रवास

Subscribe

गलिच्छपणे हसत त्याने त्याच्या हातातील टोपली माझ्या सीटखाली सरकवली आणि एक सारखा बघत उभा राहिला. त्याची नजर अत्यंत घाणेरडी होती. तो ज्या पद्धतीने खालून वर वरून खाली पाहत होता ते भयंकर होते. त्याचे केवळ डोळेच नव्हे तर संपूर्ण शरीरच डोळे बनून गेले होते. इतकी वासना टपटपत होती. त्याची नजर आपल्याला स्कॅन करून छिन्न विच्छिन करत आहे असा फील येत होता. प्रवासात मी एकटी आहे हे मला त्याला अजिबात जाणवू द्यायचे नव्हते. त्याच्याकडे रागाने पहिलं तर तो अधिकच घाणेरडं हसू लागला. माझ्याशेजारी एक आजी बसल्या होत्या त्या मला धीर देत होत्या.

मी अकरावीत होते. घर ते कॉलेज एकच बस नव्हती. मी राहायला बिबवेवाडी अन् कॉलेज गोळीबार मैदान. स्वारगेटला बस बदलून पुढे जावे लागत असे. शाळेच्या प्रवासात बसची गरज पडत नसे. म्हणजे अंतर होते पण सगळेच पायी जात असत. ज्या दिवशी बसने जायला मिळे तो दिवस म्हणजे चैन असे. त्यामुळे कॉलेजचे पहिले दोन दिवस तर आजोबा सोडायला आले. तिसर्‍या दिवशी मात्र आता माझा मी प्रवास करणे अपेक्षित होते. बस, गर्दी यांची अद्याप सवय झाली नव्हती. कॉलेज ही अद्याप नीट सुरू झाले नव्हते. त्यादिवशी लवकरच कॉलेज सुटले. बारा एकची वेळ होती. स्वारगेटला मी अप्पर इंदिरानगर बसमध्ये चढले. खिडकीच्या बाजूला बसले. माझ्या शेजारी एक पंचविशीतला तरुण बसला. बस सुरू झाली तसा त्याचा हात आमच्या दोघांमधील मोकळ्या जागेत आला. हळूहळू त्याचा हात माझ्या मांडीला स्पर्श करू लागला. चुकून धक्का लागला समजून मी आक्रसून बसले. पण हळूहळू करत त्याने त्याचा हात थेट माझ्या मांडीवरच ठेवला.

पाठीतून एक जोरदार कळ गेली. मला काहीच सुचेनासे झाले. बधीर झाल्यासारखी अवस्था झाली. काही क्षण असेच गेले. मला काहीच सुधरत नव्हते..इतके की त्याचा हात झिडकारला पाहिजे हे ही मला सुचले नाही. पण त्याने पुढच्या क्षणी हाताने दाब निर्माण केला अन मी एकदम ताडकन उभी राहिले. त्या जागेवरून बाहेर पडताना, त्याच्या पायावर जोरात पाय मारला. ते ही कसे सुचले कोणास ठाऊक. बसमध्ये फार गर्दी नव्हती. एक दोन सीट रिकामे ही होते पण मी शेवटपर्यंत बसले नाही. तो संपूर्ण दिवस विचित्र ग्लानीत असल्यासारखा गेला. त्याने स्पर्श केलेल्या माझ्याच मांडीचा भाग मला नकोसा वाटत होता. दिवसभर वाटत होते की तिथे त्याचा हात जणू चिकटून आहे. तो स्पर्श डोक्यातून जातच नव्हता. त्यानंतर पुढचे काही दिवस बसने प्रवास करायची भीतीच बसली.

- Advertisement -

२०१० ची गोष्ट आहे. साधना साप्ताहिकासाठी मी ‘मुस्लीम तरुण – तरुणीचे मानस’ हा विषय घेऊन काही शहरांतील मुस्लीम वस्त्यांमध्ये फिरणार होते. पहिल्यांदाच मी आपले शहर सोडून एकटीने प्रवास करणार होते. पुणे ते नगर प्रवास चांगला झाला. नगर ते औरंगाबाद ही. पुढे मला लातूरला जायचे होते. औरंगाबाद ते लातूर साधारण पाच तासांचा प्रवास आहे अशी एक जुजबी माहिती होती. औरंगाबाद येथील काम संपल्यावर ठरवले की त्याच दिवशी लातूरला पोहोचावे. म्हणजे दुसर्‍या दिवशी सकाळपासूनच कामाला सुरुवात करता येईल. औरंगाबाद येथे मी ज्यांच्याकडे थांबले होते त्यांनी ही मी वेळेत पोहचू शकेन अशी खात्री दिली आणि त्या वयस्क गृहस्थांचा निरोप घेऊन बसस्टॅण्डवर आले. साडेतीन होत होते. चारची बस मिळाली तरी मी नऊपर्यंत पोहोचेन असा अंदाज होता. पण चारची बस आली नाही.

प्रवासाबाबत करावा लागणारा पूर्वअभ्यास कमी होता. माझ्या पत्रकारितेच्या कामाला दीड वर्ष झाले होते. त्यामुळे मी एकूणच माझ्या कामाबाबत ही नवखी आणि अपरिपक्व होते. पुढे साडेचार, पाच, साडे पाच करत शेवटी सहाची एस. टी. आली. एस. टी.मध्ये प्रचंड गर्दी होती. बर्‍याच वेळेपासून प्रवासी थांबले होते. त्यामुळे एकच झुंबड उडाली. आत अजिबात जागा नव्हती. मी ती एस. टी. सोडू शकत नव्हते. बसायला अर्थात जागा मिळाली नाही. एस. टी. सुरू झाल्यावर कंडकटर तिकीट काढण्यासाठी उठला आणि मी त्या जागी बसले. थोड्या वेळेत औरंगाबादेतील पुढच्या एका स्टॅण्डवर प्रौढ वयाचा व्यक्ती चढला. चाळीशीच्या आसपासचा. त्याच्या हातात कसली तरी टोपली होती. आत शिरायला जागा नव्हती त्यामुळे तो दारातच पायर्‍यांवर उभा राहिला. गलिच्छपणे हसत त्याने त्याच्या हातातील टोपली माझ्या सीटखाली सरकवली आणि एक सारखा बघत उभा राहिला. त्याची नजर अत्यंत घाणेरडी होती. तो ज्या पद्धतीने खालून वर वरून खाली पाहत होता ते भयंकर होते. त्याचे केवळ डोळेच नव्हे तर संपूर्ण शरीरच डोळे बनून गेले होते.

- Advertisement -

इतकी वासना टपटपत होती. त्याची नजर आपल्याला स्कॅन करून छिन्न विच्छिन करत आहे असा फील येत होता. प्रवासात मी एकटी आहे हे मला त्याला अजिबात जाणवू द्यायचे नव्हते. त्याच्याकडे रागाने पहिलं तर तो अधिकच घाणेरड हसू लागला. माझ्याशेजारी एक आजी बसल्या होत्या त्या मला धीर देत होत्या. दुर्लक्ष कर. सावध बस असं काही काही सुचवत होत्या. त्याची नजर इतकी बेकार होती की आजीनाही त्याला काही बोलायची भीती वाटली. तरी आजूबाजूच्या बायकांनी त्याला झापायचा प्रयत्न केला पण तो आडमुठेपणा करत राहिला. त्याला पायर्‍यांच्यावर आत ये म्हणून सांगितले. मागे जा किंवा ड्रायव्हरच्या केबिनमध्ये बस म्हणून दरडावले तरी तो हलत नव्हता. मग त्याने त्याची टोपली आहे का पाहण्याच्या बहाण्याने माझ्या पायाला स्पर्श केला. नुसता ओझरता स्पर्श नव्हे तर त्याने काही सेकंद हात पायाशी घासला. मी एकदम दचकून पाय वर केला. तर त्यावर हसून पुन्हा काही नाही टोपली आहे का पाहत होतो अशी बतावणी केली. टोपली घेऊन उभा रहा असं मी रागाने सुनावल्यावर मग तुमच्या मांडीवर ठेऊ का? असं काहीतरी उत्तरला. मनातून मी चांगलीच घाबरून गेले होते. कंडक्टर आल्यावर त्याला जागा द्यावी लागली. मी उभी राहिले तसा तो वर सरकला. मागे येऊन उभा राहिला.

गर्दी इतकी होती की कोणी कोणाला इकडे तिकडे व्हा सांगू शकत नव्हते. त्या आजीचा उगीच आधार वाटत होता पण तिचा स्टॉप लगेच होता. तोवर खरतर ती आजी आणि मी एकत्र आहोत असा त्याचा समज होता. ती उतरल्यावर काय असा मोठा प्रश्न होता. शेवटी ती आजी उतरली. आता तर त्याचे चांगलंच फावलं. त्याने धक्काबुक्की करायला सुरुवात केली. बाहेर भरपूर अंधार होता. बसमध्येही. मनातही. आपण उगीच निघालो इथून सुरु झालेले विचार आयुष्यात पुन्हा कधीही पत्रकारिता करायची नाही इथवर आले. का आपण ही assignment करत आहोत? परत कधीच कुठे ही एकटीने जायचे नाही. आयुष्यात कधीच मी अशा फिरस्तीचे विषय घेणार नाही असे काय विचार डोक्यात येत होते. इतकी टोकाची भावना वाटावी अशी हतबलता, भीती मनात दाटून आली होती. पुढे काही जणांनी त्याच्या आडमुठेपणाकडे दुर्लक्ष करत त्याला ड्रायव्हरच्या केबिनमध्ये ढकलले. पण त्याची नजर काही हटली नव्हती. तो बीडला उतरला आणि मला फार सुटल्यासारखे झाले. लातूरला पोहचायला बारा वाजले. मध्ये गाडी पंक्चर देखील झाली होती. पण माधव बावगे सरांच्या घरात शिरल्यावर मनातील भीती कमी होत गेली. रात्री बराच वेळ झोप काही लागली नाही.

सुदैवाने माझ्याकडे हे सगळं सांगण्याची जागा होती. जवळची मैत्रीण आणि मित्र होते. दुसरा प्रसंग मी जेव्हा माझ्या मित्राला सांगितला त्याने तो शांतपणे ऐकून घेतला आणि म्हणाला, ‘पुढच्यावेळेस जाताना नीट तयारी करत जा. सगळी माहिती घेत जा. अंदाज बांधताना ही स्वतःच्या अंदाजावर राहू नको.’ तो असं म्हणतो न म्हणतो मी त्याला म्हणाले, ‘आता मी नाही जायची कुठे? एकटी तर अजिबातच नाही.’ तो यावर मान डोलावत हसला. तो खिजवत होता अन मी चिडत. पण माझ्या आयुष्यात या प्रसंगांच्या आधी आणि नंतरही चांगले पुरुष होते. आहेत. त्यांचा मैत्रीपूर्ण व्यवहार पुरुषांना एकाच फुटपट्टीवर मोजण्यापासून रोखू शकला. त्यांच्यावर विश्वास टाकता येतो अशी भावना हळू हळू घर करत गेली. त्यामुळे कदाचित या प्रसंगाचा परिणाम लवकर संपला. मी पटकन आपल्या नियमित आयुष्यात व्यस्त होऊ शकले.

दुसर्‍या घटनेच्या वेळेस अजिबातच एकटीने फिरणार नाही किंवा फिरस्ती गरजेची असेल असे विषयच करणार नाही इतका टोकाचा जो विचार आला होता तो कालांतराने कधीतरी गळून पडला. पुढे मी पुन्हा एकटीने प्रवास केला. आपले शहर सोडूनच नव्हे तर राज्य ही. पुढे ही करत राहीन. मात्र एक आहे, मी जेव्हा केव्हा नव्या ठिकाणी एकटीने जायचं ठरवते, त्याच्या आदल्या रात्री मला अजिबात झोप येत नाही. पोटात एक वियर्ड फिलिंग असते. मनात किंचित भितीचा भाव. मेंदूत excitement आणि प्रवासाबाबतची साशंकता. माझे डोळे मिटतच नाहीत. कुठेतरी मेंदूने या अनुभवांचे जाळे अजून जपून ठेवले असावेत. प्रवासाच्या आदल्या रात्री ते मला असे घेरून टाकतात. त्यावेळी फार म्हणजे फार निराशावादी वाटायला लागते. मग पुढच्या दिवशी माझा प्रवास सुरू होतो. चांगली माणसे भेटू लागतात आणि अलवारपणे ही भीती, वियर्ड फिलिंग नामशेष होत जाते…!


हिनाकौसर खान -पिंजार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -