घरफिचर्सपोलीस दलातील ‘दहशतवादी’

पोलीस दलातील ‘दहशतवादी’

Subscribe

काश्मीरमध्ये २ दहशतवाद्यांसह राष्ट्रपतीपदक विजेते पोलीस उपअधीक्षक देविंदर सिंह याला अटक होणे, हे धक्कादायक आहे. जम्मू-काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी तर देविंदर सिंह याची ‘दहशतवादी’ म्हणून चौकशी करण्यात येणार’, हे स्पष्ट केले आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना पकडण्यासाठी ‘विशेष पोलीस पथका’ची (एस.पी.ओ.ची) स्थापना करण्यात आली आहे. या पथकामध्ये स्थानिक काश्मिरींचा समावेश केला जातो. मात्र, याच पथकातील पोलीसच दहशतवादी होत असल्याच्या अनेक घटना यापूर्वीही पुढे आल्या आहेत. अदिल बशीर शेख, सुलेमान खान, शबिर अहमद दर हे या पथकातील पोलीस पुढे दहशतवादी संघटनांमध्ये सामील झाले होते. आताही देविंदर सिंह याच्यासह अटक करण्यात आलेला नावेद बाबू हा कधी काळी पोलीस म्हणून कार्यरत होता. पाकपुरस्कृत दहशतवादाचे समर्थक म्हणून या आधी काश्मिरातील पोलीस दलातील स्थानिक पुढे दहशतवादी संघटनांना मिळाल्याची उदाहरणे होती, त्यामध्ये ‘खान’ अथवा ‘शेख’ अशी नावे होती, परंतु याच पोलीस दलातील फुटीर ज्याला अटक करण्यात आली, त्या पोलीस अधिकार्‍याचे नाव ‘देविंदर सिंह’ असे आहे. ‘सिंह’ नावाच्या व्यक्तीने पाकपुरस्कृत दहशतवाद्यांशी हातमिळवणी करणे, हे पचनी पडणारे नाही. शीख पंथाचा इतिहास हा जिहादी आणि धर्मांध यांच्याशी दोन हात करणार्‍या अनेक शीख योद्ध्यांच्या पराक्रमाने भरला आहे. अशा पंथातील ‘खाकी’ वर्दी परिधान केलेली पोलीस खात्यातील व्यक्ती जिहादी दहशतवाद्यांच्या मांडीला मांडी लावून बसते, हे संतापजनक आहे. आतापर्यंत पोलिसांना ‘भ्रष्टाचारी’, ‘गुंड’, ‘बलात्कारी’ अशा अनेक उपमा लागल्या होत्या. देविंदर सिंह याच्या कृत्यामुळे आता त्यात ‘दहशतवादी’ या आणखी एका उपमेची भर पडली आहे. पोलिसांनी दहशतवाद्यांशी केलेली ही हातमिळवणी, हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. देविंदर सिंह याच्या पोलीस सेवेतील कामगिरीची दखल घेऊन त्याला पोलीस दलात उपअधीक्षक पदावर बढती देण्यात आली होती. सिंह याने जम्मू-काश्मीर पोलीसदलात बराच काळ काम केले, त्यामुळे त्याला राज्याच्या पोलीस दलाची इत्थंभूत माहिती झाली आहे. पोलीस दलातील अनेक खाचखळगे ठाऊक झाले असतील. पोलीस दलातील कोणता पोलीस फुटीर होऊन तो पुढे दहशतवादी बनू शकतो, कुणामध्ये राष्ट्रप्रेम आहे, कोणत्या वरिष्ठ पोलिसांची काय कमजोरी आहे, इत्यादी सर्व माहिती सिंह याला माहीत आहे. ही सर्व माहिती देविंदर सिंह याने पाकिस्तानातील दहशतवाद्यांना पुरवली असणारच. त्या माहितीचा दहशतवाद्यांकडून वापर सुरू झाला असणार. अलीकडेच दहशतवाद्यांकडून पोलिसांच्या चौक्यांवर होणारे हल्ले आणि अनेक पोलिसांना ठार मारण्याच्या घटना पाहता ही शक्यता नाकारता येत नाही. देविंदर सिंह याला अटक केल्यानंतर त्याच्या दहशतवादी कृत्यांचे अनेक किस्से समोर येत आहेत, पण दहशतवाद्यांना मिळालेल्या एका पोलीस अधिकार्‍याविषयीची माहिती गुप्तचर यंत्रणांना का मिळाली नाही? देविंदर सिंह याची कसून चौकशी होईल. मात्र, सुरक्षायंत्रणांमध्ये कार्यरत असलेल्या अशा दहशतवाद्यांपर्यंत पोहचणे यंत्रणांना तत्परतेने का जमले नाही? हे सर्वच सुरक्षायंत्रणांचे मोठे अपयश आहे. महत्त्वाचे म्हणजे अशी कृत्ये करणार्‍यांना ‘राष्ट्रपती पदक’ म्हणून सन्मानित केले गेले. ही या पदकाची मोठी विटंबना आहे. कर्तव्यतत्पर, सदाचारी आणि जनताभिमुख पोलिसांऐवजी जनतेच्याच मुळावर उठलेल्यांना मानाचे पुरस्कार मिळणार असतील, तर असे पुरस्कार देण्यामागे जे काही राजकारण चालले असेल, त्याच्यावरील पडदाही हटायला हवा. देविंदर सिंह याचे दहशतवादी संघटनांशी असलेले संबंध २००१ सालीच उजेडात आले होते. संसदेवर हल्ला करणारा महंमद अफझल याने देविंदर सिंह याला संसदेवर दहशतवादी हल्ला करणार्‍या दहशतवाद्यांना साहाय्य करण्यासाठी माझ्यावर दबाव आणला होता, असे सांगितले होते. त्या वेळी त्याच्याकडे कोणी लक्ष दिले नव्हते. तसे पाहिले तर एका दहशतवाद्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही. मात्र, खबरदारीची उपाययोजना म्हणून त्याने दिलेले संदर्भ पडताळून पाहणे आवश्यक होते. सुरक्षायंत्रणेचे ते कामच असते. मात्र, तशी पडताळणी का केली गेली नाही? सुरक्षायंत्रणांची ही घोडचूकच म्हणावी लागेल. त्याच वेळी सिंह याची चौकशी करून त्याच्या मुसक्या आवळल्या असत्या, तर जम्मू-काश्मीरच्या पोलीसदलाचे जे नुकसान झाले, ते टाळता आले असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे देविंदर सिंह हा लाचखोर अधिकारी म्हणून कुप्रसिद्ध होता. त्याची चौकशी केल्यानंतर अनेक दहशतवाद्यांच्या निवासाची व्यवस्था तोच करत असायचा. त्यासाठी तो लाखो रुपये घेत असायचा. सेवा बजावत असताना त्याला लाच घेताना अटकही करण्यात आली होती. त्यानंतर त्याचेे निलंबन करण्यात आले. मात्र, नंतर त्याला परत बोलावून त्याची अन्य ठिकाणी नियुक्ती करण्यात आली. त्याच वेळी त्याच्या बेहिशोबी संपत्तीची चौकशी केली असती, तर आज देविंदर सिंह याचा इतका विद्रूप चेहरा समोर आला नसता. मात्र, आपल्याकडील व्यवस्थाच इतकी कूचकामी आहे की, कितीही भ्रष्टाचार करा, त्याची चौकशी होऊन खटला चालू होईपर्यंत भ्रष्टाचारी बिनधास्त उजळमाथ्याने फिरत असतो. व्यवस्थेतील या अक्षम्य त्रुटींमुळे भ्रष्टाचार्‍यांचे फावतेच. मात्र, आता देविंदर सिंह याच्यासारख्या राष्ट्रद्रोह्यांनाही राष्ट्रविरोधी कृती करण्याचे बळ मिळते. देविंदर सिंह विविध दहशतवाद्यांशी वेगवेगळ्या माध्यमांद्वारे संपर्कात होता, दहशतवाद्यांचा आश्रयदाता होता, त्याच्या जेवणाची, राहण्याची व्यवस्था करायचा, त्यांना दहशतवादी हल्ले करण्यासाठी इत्थंभूत माहिती पुरवायचा, एखादा अधिकारी दिवस-रात्र प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सेवेत असताना एका बाजूला पोलीस सेवेतील जबाबदार्‍या सांभाळतो आणि दुसर्‍या बाजूला दहशतवाद्यांचे संबंध जपतो, त्यांच्याशी संवाद ठेवतो, त्यांना मदत करतो, असे सर्व सुरू असताना त्याविषयी पोलीस दलातील अन्य सहकारी आणि अधिकारी यांना त्याची भनकही लागू नये, यावर शेंबडे पोरंही विश्वास ठेवणार नाही. या सर्व घटनांचा आढावा घेतला तर जम्मू-काश्मीर पोलीस दलातील ‘दहशतवादी’ वेचून काढण्यासाठी सरकारी व्यवस्थेला धाडसी निर्णय घ्यावे लागतील !

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -