सध्या मुंबईसह संपूर्ण राज्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. पावसाळा म्हटलं की थंडगार वातावण आणि निवांतपणा आलाच. पावसाळ्यामध्ये गरमागरम भजी आणि भुट्टा खाण्याचा मोह आवरणं कठीणच. या दिवसांत हमखास घरोघरी चहा-भजीचा बेत बनतो. रस्त्याच्या कडेला असलेल्या भजी आणि भुट्ट्याच्या गाड्यांवरही या दिवसांत खवय्यांची गर्दी पाहायला मिळते. मात्र, रस्त्यावरच्या या पदार्थांचा स्वाद घेताना जरा जपून. अशाप्रकारे रस्त्याच्या कडेला मिळणारे पदार्थ खाणं शरीरासाठी काहीवेळा अपयाकरक ठरु शकतात. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने वारंवार हे पदार्थ खाणं घातक ठरु शकतं. उघड्यावरचे पदार्थ का खाऊ नयेत, यामागे अनेक कारणं आहेत.
१. सभोवतालचं वातावरण
रस्त्याच्या कडेला किंवा एखाद्या बागेममध्ये असलेल्या स्टॉलवर खाण्यापूर्वी आजूबाजूचा परिसर स्वच्छ आहे का हे जरुर पाहा. बऱ्याचदा स्टॉल्सवर माशा घोंगावत असतात. याचा अर्थ त्या स्टॉलच्या आसपास घाणीचा किंवा खराब पाण्याचा साठा असणार हे नक्की. अशाठिकाणचे पदार्थ खाऊन पोटाचे विकार उद्भवण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे अशा ठिकाणी खाणं आवर्जून टाळा.
२. विक्रेत्यांचा अस्वच्छपणा
स्टॉलवर जो माणूस भजी किंवा भुट्ट्याची विक्री करत आहे, तो स्वत: स्वच्छतेबाबत किती टापटीप आहे हेही महत्वाचं असतं. स्टॉलवर खाण्यापूर्वी विक्रेत्याचे हात आणि विशेषत: त्याची नखं स्वच्छ आहेत का? याचा अंदाज घ्या. बरेचदा हे विक्रेते ज्या पाण्याने हात धुतात ते पाणीही खराब असतं. त्यामुळे आपल्याला रोगकारक विषाणूंची लागण होण्याची दाट शक्यता असते.
३. पदार्थ ताजे की शिळे?
तुम्ही भुट्टा किंवा वडा-भजीच्या स्टॉलवर गेल्यानंतर तर तिथे वापरण्यात येणाऱ्या पदार्थांची हक्काने चौकशी करा. उदाहरणार्थ भुट्टा ताजा आहे की जुन आहे याची चौकशी करा. तसंच वडा किंवा भजीमध्ये वापरण्यात येणारा बटाटा आंबलेला (खराब झालेला) नाही ना याची खात्री करुन घ्या. मक्याच्या कणासाला लावलं जाणारं तिखट आणि लिंबू खराब नाहीना हे तपासा. अखेर प्रश्न आपल्या आरोग्याचा आहे.