घरफिचर्ससारांशझाडे लावणारा माणूस

झाडे लावणारा माणूस

Subscribe

एखादा माणूस एखादं झाड लावतो, कुणी बाग लावतो, कुणी आपला परिसर झाडं लावून हिरवीगार करतो, पण कुणी एक एक झाड लावत जंगल वाढवू शकतो? तेही चौदाशे एकर जमिनीवर? कल्पना तरी करू शकाल का? पण ही कल्पना सत्यात आणलीय पायेंग यांनी. आज हे जंगल वाघ, गेंडे, गवे, हरिण, हत्ती, माकड, ससे, गिधाडं अनेक प्रकारच्या पक्षी-प्राण्यांचं निवासस्थान झालंय. पस्तीस वर्षे सातत्याने सुरू असलेल्या त्यांच्या या अभूतपूर्व कामगिरीची ही कथाही तेवढीच रोमांचकारी आहे. मिशिंग जमातीत जन्मलेला पायेंग हा मूळचा आसाममधला जोरहाटचा रहिवासी. ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर वसलेलं हे शहर. याच ब्रह्मपुत्रेमध्ये मजुली नावाचं बेट आहे. नदीमधल्या बेटामधलं हे खूपच मोठं बेट मानलं जातं. गेल्या काही वर्षांपासून जादव याच बेटावर राहत आहेत.

वेड्या माणसांनी हे जग घडवलंय…असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एका लक्ष्याचा पाठलाग करत ते साध्य करणार्‍या असामान्य माणसांची ती गोष्ट असते. बिहारचा दशरथ दास मांझी तब्बल 22 वर्षे बलाढ्य डोंगराच्या छातीवर घाव घालत होता. ‘जब तक तोडेंगे नही, छोडेंगे नही’, असा निर्धार करत त्यांनी 300 फुटांच्या डोंगराचा पराभव केला आणि या डोंगरातून तब्बल 360 फूट लांब आणि 30 फूट रूंद रस्ता काढला. आज वझीरगंज, अत्री भागातल्या तब्बल 60 गावांना या रस्त्याचा फायदा होतोय. या डोंगर पुरुषाप्रमाणे एक जंगल पुरुष आज पुन्हा एकदा समोर आलाय. तसा तो कोणाला माहीत नाही असं नाही, पण एका माणसामुळे फरक पडू शकतो का?, असा प्रश्न विचारल्यास त्याचं उत्तर होय…असं देता येईल आणि उदाहरण दाखवायचं झाल्यास आसामच्या जादव पायेंग यांचं नाव घेता येईल. भारताचे वनपुरुष म्हणजेच ‘फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया’ म्हणून लोकप्रिय असणार्‍या जादव यांनी एकट्यानं संपूर्ण जंगल उभारलंय… आणि पायेंग यांच्या या कामाची दखल आता थेट पाश्चिमात्य देशांकडून घेण्यात येत आहे. नुकताच अमेरिकेतील एका अभ्यासक्रमात पायेंग यांच्या कार्याबद्दल माहिती देणार्‍या एका धड्याचा समावेश करण्यात आला आहे.

कनेक्टीकटमधील ब्रिस्टोल येथील ग्रीन हिल्स स्कूलने सहावीच्या अभ्यासक्रमामध्ये पायेंग यांच्या कामासंदर्भातील धड्याचा समावेश केला आहे. इकोलॉजी म्हणजेच पर्यावरणशास्त्रामध्ये या धड्याचा समावेश करण्यात आला आहे. आता अमेरिकेतील मुलं पद्मश्री पुरस्कारप्राप्त पायेंग यांच्या कार्याबद्दल शिकणार आहेत. जगभरात पर्यावरणासंदर्भात अनेक उलटसुलट गोष्टी घडत असून वातावरणातील बदल खूपच चिंताजनक आहेत. असं असताना पर्यावरणाबद्दल संवेदनशील राहण्यासंदर्भात लहान मुलांना शालेय वयामध्येच शिक्षण देण्याच्या उद्देशाने जगभरामध्ये प्रयत्न सुरू आहेत. अशा मुलांसमोर वयाच्या 16 वर्षापासूनच पर्यावरण संरक्षणाचे काम करणार्‍या पायेंग यांच्यापेक्षा अधिक चांगलं उदाहरण कोणाचं असू शकतं. पायेंग यांच्या कार्याने मुलांनाही प्रेरणा मिळेल या उद्देशाने त्यांच्या आयुष्यावरील धड्याचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलाय.

- Advertisement -

एखादा माणूस एखादं झाड लावतो, कुणी बाग लावतो, कुणी आपला परिसर झाडं लावून हिरवीगार करतो, पण कुणी एक एक झाड लावत जंगल वाढवू शकतो? तेही चौदाशे एकर जमिनीवर? कल्पना तरी करू शकाल का? पण ही कल्पना सत्यात आणलीय पायेंग यांनी. आज हे जंगल वाघ, गेंडे, गवे, हरिण, हत्ती, माकड, ससे, गिधाडं अनेक प्रकारच्या पक्षी-प्राण्यांचं निवासस्थान झालंय. पस्तीस वर्षे सातत्याने सुरू असलेल्या त्यांच्या या अभूतपूर्व कामगिरीची ही कथाही तेवढीच रोमांचकारी आहे. मिशिंग जमातीत जन्मलेला पायेंग हा मूळचा आसाममधला जोरहाटचा रहिवासी. ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर वसलेलं हे शहर. याच ब्रह्मपुत्रेमध्ये मजुली नावाचं बेट आहे. नदीमधल्या बेटामधलं हे खूपच मोठं बेट मानलं जातं. गेल्या काही वर्षांपासून जादव याच बेटावर राहत आहेत. ब्रह्मपुत्रेला सतत येणार्‍या पुरामुळे या बेटावरच्या मातीची झीज झालीय. वाळू पसरलेली असल्यानं सर्व भाग ओसाड वाळवंट झाला होता. पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असलेल्या झाडे लावा, झाडे जगवा या कार्याकडे ते 1979 मध्ये वळले. तेव्हा जादव सोळा वर्षांचे होते. ब्रह्मपुत्रेला प्रचंड पूर आल्यानं अतोनात नुकसान झालं. या पुरानंतर आसपासच्या किनार्‍यावर जिकडे तिकडे मेलेल्या सापांचे असंख्य सांगाडे पडलेले दिसले. पुराबरोबर वाहत आलेले ते साप होते. एकाही झाडाचा आसरा नाही. शिवाय वरून रणरणतं ऊन. त्यामुळे ते साप मृत्युमुखी पडले होते. हळव्या मनाच्या जादव यांना हे सहन झालं नाही. त्याला रडू कोसळलं. ‘एक दिवस आपणही असेच मृत्युमुखी पडणार का?’ त्याने तिथल्या स्थानिक अनुभवी रहिवाशांना विचारलं. त्या वेळी सर्वांनी ‘असं काही होणार नाही’ असं आश्वासनही दिलं. मात्र जादवचं समाधान झालं नाही. त्याचं मन शोध घेत राहिलं. ‘असं का झालं असावं?’ याचा शोध घेतला असता काहींनी सांगितलं, ‘झाडं नसल्यानं असं झालं. या ओसाड वाळवंटात काहीच करता येत नाही. तुलाच काही करता आलं तर बघ.’ असं म्हणून त्यांनी जादवला वीस बांबूंची रोपं दिली. जादवनं मग एक कुंपण तयार केलं आणि त्या वाळुमय मातीत ती रोपं लावली व त्यांची काळजी घेऊ लागले आणि ती रोपं खरोखरच वाढू लागली. मग जादव यांनी बेटावरचा तो सर्व भाग हिरवा करण्याचं स्वप्न पाहिलं. विशेष म्हणजे ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तो दररोज परिश्रम घेऊ लागला. सोळा वर्षांचा जादव आता एकाच ध्येयानं झपाटला गेला.

जादव यांनी एकर, हेक्टर असा हिशेब न करता केवळ झाडं लावण्याचा ध्यास घेतला आणि 35 वर्षे हे एकच काम करत चौदाशे एकर जमिनीवर एक घनदाट जंगल उभं केलं. या जंगलाला मोलाई कठोनी किंवा मोला फॉरेस्ट म्हणतात. (आसामी भाषेत कठोनी म्हणजे जंगल. जादव यांना लाडाने ‘मोलाई’ म्हणतात आणि म्हणून त्यांनी लाडाचं ‘मोलाई’ हे नाव त्या जंगलाला दिलं आहे.) हे काम करीत असताना त्याला मानाचं, प्रसिद्धीचं, पैशाचं कसलंही भान नव्हतं. पण कस्तुरीचा सुगंध दरवळल्याशिवाय कसा राहील? जादव यांच्या कार्याची माहिती तब्बल तीस वर्षांनी 2008 साली जगाला झाली. तीही एका योगायोगानंच! जितू कालिता नावाचा एक वार्ताहर ‘प्रांतिक’ नावाच्या आसामी भाषेतल्या मासिकासाठी काम करायचा. जितू जोरहाटचाच. तो उत्तम फोटोग्राफरही असल्याने विविध प्रकारचे माहितीपट करायचा. असाच एकदा तो अरुणा शापोरीवर आला. तिथे त्याला आकाशात काही गिधाडे दिसली. त्यांचा फोटो काढण्याच्या उद्देशाने पाठलाग करताना वाळूतून चालत चालत तो खूप दूरवर आला आणि त्याला समोर घनदाट जंगल दिसलं. त्याचा विश्वासच बसेना. तिथेच त्याला जादव जंगलाच्या दिशेने चालताना दिसले. जितू आता गिधाडांच्या ऐवजी जादव यांचा पाठलाग करू लागला. जादव आपले झाडं लावण्याच्या कामाला रोजच्याप्रमाणे चालले होते. जादव यांनी मागे वळून पाहिल्यावर हातात मोठ्ठा कॅमेरा घेतलेला जितू त्यांना दिसला. असल्या कॅमेर्‍याची माहिती नसल्याने जादव यांना वाटलं की शिकारीच आला आहे. त्या वेळी त्या जंगलात नुकतंच एका गव्याचं आगमन झालं होतं. जादव यांना वाटलं की, या ‘शिकार्‍याला’ कुठून तरी त्याचा सुगावा लागला असावा आणि त्याची शिकार करण्यासाठीच हा आला असावा. जादव यांनी हातात दगड घेतला व ते जितूला परतवण्याचा प्रयत्न करू लागले. पण जितूनं आसामी भाषेत बोलून आपला स्वच्छ उद्देश सांगितला. मग मात्र जादव शांत झाले आणि त्यांची जितूशी मैत्री झाली. जितूनं एका लेखाद्वारे जादव यांच्या कार्याची माहिती प्रसिद्ध केली. त्याच वर्षी आणखी एक घटना घडली. अरुणा शापोरीवर अचानक शंभर- दीडशे हत्तींचा एक कळप आला आणि मोलाई फॉरेस्टच्या दिशेनं चालू लागला. वाटेत येईल ते तुडवत ते हत्ती चालत होते. त्यामुळे तिथल्या घरांचं, पिकांचं अतोनात नुकसान झालं. सर्व माणसं भयभीत झालेली होती. जादव यांच्या घराचाही चक्काचूर झाला होता. तेही प्रथम गोंधळले, पण नंतर थक्क झाले आणि आनंदानं बेभानही झाले. आपल्या हातून केवढं कार्य घडलं आहे याची त्यांना जाणीव झाली, कारण त्यांनी निर्माण केलेल्या जंगलाच्या आकर्षणानं पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येनं हत्ती त्या भागात आले होते. परंतु त्यांचा आनंद फारच थोडा काळ टिकला. कारण या सर्व नुकसानासाठी तिथल्या रहिवाशांनी जादव यांनाच दोषी ठरवलं. इतकंच नव्हे तर त्यांना जबर मारहाण केली. जादव यांनी हे सहन केलं. परंतु लोकांनी रागाचा उद्रेक म्हणून झाडं कापायला सुरुवात केली. तेव्हा मात्र जादव संतापले व ‘प्रथम मला तोडा, मगच झाडं तोडा’ हा पवित्रा घेतला. तेव्हा झाडं कापणं थांबलं, पण या लोकांनी जंगलाच्या दुसर्‍या बाजूला आग लावली. जवळजवळ एकदशांश जंगल जळून गेलं. हे दु:ख सहन करणं त्यांना शक्यच नव्हत. लगेचच जादव यांनी जंगल खात्याला कळवलं. खात्याचे लोक आले आणि त्या ओसाड भागावर उभे राहिलेलं एवढं मोठ्ठं जंगल पाहून थक्क झाले. आसाम सरकारला याची दखल घ्यावी लागली. त्या सरकारनं तेथील सर्व रहिवाशांना नुकसानभरपाई करून दिली तेव्हा कुठे लोकांचा राग शांत झाला. सरकारनं जादव यांच्या कार्याची प्रशंसा केली. (तेव्हापासून दरवर्षी हे हत्ती मोलाई फॉरेस्टमध्ये येतात व सहा महिन्यांसाठी तेथे मुक्काम करतात.) या प्रसंगापासून जादव यांची माहिती माध्यमाद्वारे सर्वाना समजली. त्यानंतर त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठानं 22 एप्रिल 2012 या दिवशी म्हणजे जागतिक वसुंधरादिनी जादव यांचा सत्कार केला व त्यांना ‘फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया’ हा पुरस्कार दिला. माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनीही जादव यांचा सत्कार केला. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2015 साली ते पद्मश्री पुरस्काराचे ते मानकरी ठरले.

- Advertisement -

2012 पर्यंत जादव यांच्या कार्याची माहिती भारतात पसरली होती, परंतु परदेशात त्यांच्या कार्याची माहिती करून देण्याचं काम विल्यम डग्लस मॅकमास्टर या अमेरिकी माणसानं केलं. त्यानं 2013 मध्ये जादव यांच्या कार्यावर एक माहितीपट तयार केला. तिचं नाव ‘फॉरेस्ट मॅन’ (यू ट्यूबवर हा माहितीपट उपलब्ध आहे.) या माहितीपटाला ‘उत्कृष्ट माहितीपट’चा पुरस्कार मिळाला. जंगल उभारणारा हा माणूस मात्र अजूनही आपल्या कुटुंबीयांसमवेत मजुली बेटावरच राहतो. पत्नी बिनीता, दोन मुलगे व एक मुलगी असा त्याचा परिवार आहे. घरातले सर्व जण त्यांना त्यांच्या कार्यात मनापासून मदत करतात. जादव यांच्याकडे पन्नासेक गाई, म्हशी आहेत. त्यामुळे दुग्ध व्यवसायातून येणार्‍या पैशावर जादव यांचा चरितार्थ चालतो. जादव यांनी लावलेल्या जंगलात आयुर्वेदिक औषधी असलेली असंख्य झाडं आहेत. पण याव्यतिरिक्त जंगलात त्यांनी तीन प्रकारचं गवत लावलं आहे. यातला एक प्रकार हत्तींसाठी, दुसरा गेंड्यांसाठी व तिसरा गाई, म्हशी, हरिण, शेळ्या यांच्यासाठी. त्यांना या गवताची नावं माहीत नाहीत, पण ते गमतीत म्हणतात, ‘जनावरांना तरी कुठं नावं माहिती असतात?’ जमिनीचा कस (पोत) वाढवण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. कुणी काही सांगितलं की जादव ते करायचा प्रयत्न करायचे. एकदा कुणी तरी सांगितलं की, लाल मुंग्यांमुळे जमिनीचा पोत सुधारतो. झालं, लगेचच ते एका खेड्यात गेले व तिथून भरपूर लाल मुंग्या अरुणा शापोरीवर आणल्या. हे करताना त्यांना इतक्या मुंग्या चावल्या की त्या वेदना त्यांना आजही जाणवतात.

ही जंगल उभारणी पूर्ण झाल्यानंतर त्यांचं लक्ष ब्रह्मपुत्रेतल्या दुसर्‍या बेटाकडे, मेकाहीकडे लागलंय. तिथल्या सहाशे हेक्टर (1500 एकर) जागेवर आता त्यांना जंगल उभं करायचं आहे. अजूनही दररोज सकाळी स्वत: न कंटाळता ते काम करीत आहेत. मात्र आता त्यांना आसाम सरकारची साथ आहे. सत्य हे कल्पनेपेक्षा विलक्षण असतं या म्हणीप्रमाणे पायेंग हा हाडामासांचा खराखुरा मनुष्य आहे! भारतीय मातीत जन्मलेला आणि वाढलेला अस्सल ‘फॉरेस्ट मॅन!’

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -