घरफिचर्ससारांशइस शहर में...इक दश्त था

इस शहर में…इक दश्त था

Subscribe

नव्वदच्या दशकात हिंदी पडद्यावरून गझल कमी झाली. चित्रपटांचे विषयही बदलत गेले होते. मात्र तरीही आवारगीतून मुकेश भट्टनी गुलाम अलींना ‘चमकते चाँद को...टुटा हुवा तारा बना डाला...’ म्हणत पुन्हा संधी दिली. मोहसीन नक्वी यांनी लिहिलेली अजरामर गझल ‘इस शहर में इक दश्त था...’ याच काळात बहरली, माटी माँगे खून या १९८३ मध्ये रिलिज झालेल्या चित्रपटात ही गझल पंचमनी वापरली.

साठ आणि सत्तरच्या दशकात संगीतकार मदन मोहन हे नाव हिंदी पडद्यावर गाजत होतं. मदन मोहन यांनी इतर संगीतकारांच्या तुलनेत उर्दू, हिंदी गझलेला पडद्यावर लखनवी तहजीब आणि शालिनतेने पेश केलं. ज्या गाण्यांच्या शब्दांना मदन मोहन यांनी संगीतसाज चढवला, ती गाणी अजरामर झालीत. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत मदन मोहनला फिल्मफेअर, स्क्रिन असा कुठलाही पुरस्कार मिळाला नाही. फिल्म इंडस्ट्री मला सापत्न वागणूक देते, अशी खंत त्यांनी त्यांच्या जवळच्या मित्रमंडळींमध्ये अनेकदा बोलून दाखवली होती. त्यांना त्यांच्या संगीत कारकिर्दीत १९७० मध्ये रिलिज झालेल्या ‘दस्तक’ने एकमेव राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. या एकमेव पुरस्कारात ‘हम है..मताए कुचा ओ बाजार की तरह’ या गझलेचा प्रमुख वाटा होता. मदन मोहन एकाच गाण्यात अनेकविध स्वर-चालींचे अंतरे दाखल करत. एकदा वापरलेली अंतर्‍याचे चाल पुन्हा त्याच गाण्यात दुसर्‍यांदा वापरत नव्हते. असा कठीण प्रयोग त्यांनाच साध्य झाला होता. यातल्या बहुतांशी गझलच होत्या. तीन वेळेस त्यांना फिल्मफेअर पुरस्कारने हुलकावणी दिली. (अनपढ-१९६२) आणि (वो कौन थी-१९६४) तसेच १९७५ मध्ये आलेला ‘मौसम’ या तीनही चित्रपटांचं वैशिष्ठ्य हेच होतं की यात गझलेला मानाचं स्थान होतं. गझलेचा आकृतीबंधात मतला, मक्ता, रदीफ जुळून आलेली गझल मदन मोहनने जिवंत केली. अनेकदा गझलेच्या मार्गाने हार्मोनियमवर एखादी ‘नज्म’ ही येई. तिलाही मदन मोहन गझलेच्या मायेनेच कवेत घेत. अनपढमधलं

‘आपकी नजरों ने समझा…प्यार के काबिल मुझे’
किंवा वो कौन थी मधलं ‘जो हमनें दास्तां अपनी सुनाई…आप क्यूं रोये’ ही

- Advertisement -

हे गाणं, ही उदाहरणं ठरावीत. संजीव, शर्मिलाच्या ‘मौसम’मध्ये गुलजार आणि मदन मोहन असा दूध-मधाचा गोडवा एकजीव झाल्यावर पडद्यावर लता, रफी, भुपेंद्र सिंग यांनी ‘दिल ढुंढता है… फिर वही फुरसत के रात दिन’ आणि ‘रुके रुके से कदम…रुक के बार बार चले’ या गझलांचा गडद परिणाम ऐकणार्‍यांवर होणार होताच.
मदन मोहनच्या हृदयात गझलेच्या रियाजासाठी स्वतंत्र खोली होती. इथं फक्त आणि फक्त गझलेलाच रियाज करण्याची परवानगी मिळे. १९६४ मध्ये मीना कुमारी आणि सुनील दत्त यांचा ‘गझल’ पडद्यावर आला. या चित्रपटांचा विषय संपूर्ण गझलाच वाहिलेला होता. यात एकाच गझलेतले अंतरांचे शब्द आणि स्वर काहीसे बदलून मदन मोहनने रसिकांसमोर ‘पेश’ केले होते. किसे पेश करू…या रदिफच्या आधी लतास्वर असा आहे…

नग़मा-ओ-शेर की सौगात किसे पेश करूँ
ये छलकते हुए जज़बात किसे पेश करूँ

- Advertisement -

हेच गाणं मदन मोहनने रफीकडूनही गावून घेतलं होतं, त्याचा बाज विरहाचा होता.

रंग और नूर की बारात किसे पेश करू
हे मुरादों की हँसी रात किसे पेश करू

या दोन्ही गाण्यातले अंतरे म्हणजे द्विपदी (शेर) त्यांचा बाज, प्रसंगातली गरज एकच रदिफ असतानाही वेगवेगळे होते. मदन मोहनने गझलेला आणखी सुंदर बनवले.
गझलेवर जाँ निसार प्रेम करणारं जाँ निसार अख्तर…. हे आणखी एक असंच नाव…ज्येष्ठ कवी, कथा पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी लता मंगेशकर यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी त्यांनी विचारलं, ‘आपल्या पाच दशकांपेक्षा मोठ्या गायन कारकिर्दीतलं आपल्या मनाजवळ असलेलं एक गाणं कोणतं? रजिया सुलतानमधलं ‘ऐ दिले नादाँ…’ असं उत्तर त्यावर समोरून आलं. ‘त्यावर अख्तर म्हणाले, आपने हजारो गीतोंमेसे जो गाना चुना है…मे मेरे ..आपने मेरे भी गाने गाये…है लेकीन बाप तो बाप होता है…जो गझल आपने बताई वो मेरे बाप ने लिखी थी..म्हणजेच जाँनिसार अख्तर यांनी…

आप यूँ फासलों से गुजरते रहे
दिल सें कदमों की आवाज आती रही                                                                                         

ही सुद्धा गझलेच्या मार्गाने जाणारी नज्म, जाँ निसांर साहेबांचीच होती.
मुजफ्फर अलींचा ‘गमन’ही सत्तरच्या दशकातच रिलिज झाला, या चित्रपटाने सुरेश वाडकर हे नाव समोर आणलं. ‘सीने में जलन…आँख में तुफान सा क्यूं है’…यासह ‘आपकी याद आती रही रातभर…’ हे छाया गांगुलींनी गायलेली गझल आजही एफएमवर रात्री हटकून ऐकायला येतेच. आहिस्ता आहिस्ता, इजाजत, बाजार, उमराव जान असे अनेक गझलपट सत्तर ऐंशीच्या दशकात दाखल झाले होते.

ऐंशीच्या दशकात हळुवार गझल प्रगल्भ बनली. १९८२ मध्ये महेश भट्टचा अर्थ पडद्यावर आला. यात झुकी झुकी सी नजर…, कोई ये कैसे बताए…, तेरे खुशबू में बसे खत…तुम इतना जो मुस्कुरा रहे हो…राजेंद्र नाथ रहबर, कैफी आझमी आणि इफ्तीकार इमाम यांच्या गझलांनी चित्रपटाला ‘अर्थ’ दिला होता. जगजित आणि चित्रा सिंग यांच्या आवाजाच्या खोलीने शब्दांना पुरेपूर न्याय दिला. याच वर्षी रमण कुमार यांचा ‘साथ साथ’ही रिलिज झाला. त्यातही गझलांचे विविध रंग होतेच. यूँ जिंदगी की राह में मजबूर हो गये…, प्यार मुझसे किया तुने तो क्या पाओगे…, तुमको देखा तो ये खयाल आया…., ये बता दे मुझे जिंदगी…., ये तेरा घर ये मेरा घर…अशी एकाहून एक सुरस गीतरचना आणि गझला होत्या.

याच बी. आर. चोप्रा यांचा निकाह रिलिज झाला. चुपके चुपके रात दिन…म्हणत गुलाम अलींनी गझलप्रेमींना भारून टाकलं होतं. नव्वदच्या दशकात हिंदी पडद्यावरून गझल कमी झाली. चित्रपटांचे विषयही बदलत गेले होते. मात्र तरीही आवारगीतून मुकेश भट्टनी गुलाम अलींना ‘चमकते चाँद को…टुटा हुवा तारा बना डाला…’ म्हणत पुन्हा संधी दिली. मोहसीन नक्वी यांनी लिहिलेली अजरामर गझल ‘इस शहर में इक दश्त था…’ याच काळात बहरली, माटी माँगे खून या १९८३ मध्ये रिलिज झालेल्या चित्रपटात ही गझल पंचमनी वापरली. १९८१ मध्ये चेतन आनंदच्या ‘कुदरत’मध्ये ‘हमें तुमसे प्यार कितना’ या ठुमरीसाठी परवीन सुलताना यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तर हेच गाणं किशोरनेही आजही लक्षात राहाण्यासारखं गायलं होतंच की…ही आर. डी. बर्मनची जादू होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -