घरफिचर्सगावाचं आरोग्य हाती आलं, अन सरपंच केलं

गावाचं आरोग्य हाती आलं, अन सरपंच केलं

Subscribe

सुरेखाताई या 2007 पासून आशा वर्कर म्हणून काम करत आहेत. 2014 मध्ये जेव्हा ग्रामपंचायतीची निवडणूक होती त्यावेळेस त्यांच्या भागासाठी ओबीसी आणि महिलेेसाठी जागा आरक्षित होती. अशा स्थितीत गावकर्‍यांनी एकमुखाने सुरेखा कुंभार हे नाव पक्कं करायचं ठरवलं. आशा वर्कर म्हणून त्या करत असलेलं काम, नियुक्त कामांपलिकडे जाऊन प्रत्येकीची मदत करण्याची वृत्ती गावकर्‍यांनी पाहिली होती.

गावखेड्यातल्या कुठल्या घरात दुखणं खूपणं आहे, कुणाच्या घरची बाई गरोदर आहे, कुठली मुलं कुपोषित आहेत, कुणाच्या मुलांच्या लसीकरणाची वेळ जवळ आलीये, कुण्या नवमातेला स्तनपान कसं द्यायचं शिकवायचंय…अशी सगळी इत्तंभूत माहिती कुणाकडे असते तर आशा वर्कर. गावातल्या प्रत्येकीच्या माजघरात तिला प्रवेश असतो. वेळीअवेळी आलेल्या बोलावण्याला ती धावून जाते. कधी पदरमोड करून ती एखाद्या अडलेल्या बाईला घेऊन प्रसूतिगृह गाठते. आता आशा वर्करच ती. पण एखाद्या आशा वर्करला तिच्या कामातील सचोटीमुळे गावकर्‍यांनी थेट तिला सरपंचपदी बिनविरोध निवडून दिलं तर. भोर तालुक्यातील नायगाव या चारशेक लोकसंख्येच्या गावच्या सरपंच सुरेखा रामचंद्र कुंभार असं या सरपंच आशा वर्करचे नाव. एखाद्या गावांनं आपल्या सरपंचावर विश्वास टाकला तर छोटंसं खेडंही बदलू लागतं. छोट्या गावामध्ये अजूनही पुरुष सरपंच असावा किंवा सरपंच स्त्री झाली तरी कारभार तिच्या पतीनं पहावी अशी मानसिकता आणि स्थिती अधिक आहे. पण जर गावातूनच हा विचार बाजूला पडू लागला की, मग तुमचा सरपंच स्त्री आहे की पुरुष हा मुद्दाच उरत नाही.

- Advertisement -

सरपंच सुरेखाताई यांची भेट झाली तेव्हा गावातील महिलांसाठी रक्ततपासणी शिबीर सुरू होते. शाळेच्या प्रांगणातच बायका जमल्या होत्या. आरोग्य अधिकारी आणि त्यांचे इतर कर्मचारी रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्याने काय होऊ शकते हे सांगत होते. तपासणीचा रिपोर्ट आल्यावर ज्यांना रक्तवाढीच्या गोळ्यांची गरज भासेल त्यांनी नियमित गोळ्या घ्यावे हेही सुचवत होते. सकाळी अकरा साडेअकराची वेळ होती. प्रांगणात सुरूवातीला तीसेक बायका जमल्या होत्या आणि हळूहळू करत त्यांना आणखी तीस पस्तीसजणी येऊन मिळाल्या. यातल्या बहुतांश महिला रोजंदारीवर जाणार्‍या आहेत. त्यांचा दिवसाचा रोज 200 रूपये असतो. तासभराच्या रक्ततपासणीसाठी या बायकांनी तो रोज बुडवला होता. गावात रोजंदारीवर भल्या सकाळीच जावं लागतं. मात्र रक्ततपासणीची वेळ अकराची असल्याने बायकांना तो बुडवण्याखेरीज पर्याय नव्हता. मात्र दिवसाचे 200 रूपये बुडित करण्यास त्या तयार झाल्या ते केवळ सुरेखा कुंभार यांच्या शब्दाखातर. सुरेखाताईंनी हे शिबीर घेतलं आहे म्हणजे ते निश्चितच आपल्यासाठी फायद्याचे आहे. या एवढ्याशा विचाराने या महिला तिथं जमल्या होत्या. सुरेखाताईंच्या सातत्यपूर्ण कामाची ती पावतीच होती.

सुरेखाताई या 2007 पासून आशा वर्कर म्हणून काम करत आहेत. 2014 मध्ये जेव्हा ग्रामपंचायतीची निवडणूक होती त्यावेळेस त्यांच्या भागासाठी ओबीसी आणि महिलेेसाठी जागा आरक्षित होती. अशा स्थितीत गावकर्‍यांनी एकमुखाने सुरेखा कुंभार हे नाव पक्कं करायचं ठरवलं. आशा वर्कर म्हणून त्या करत असलेलं काम, नियुक्त कामांपलिकडे जाऊन प्रत्येकीची मदत करण्याची वृत्ती गावकर्‍यांनी पाहिली होती. त्या कामातील तळमळ, सेवावृत्ती पाहता सुरेखाताईंनाच सरपंचपद देण्यात आलं. एकाअर्थी एखाद्या आशा कार्यकर्तीला तिच्या कामाची दिलेली ही पोचच होती.

- Advertisement -

सुरेखाताई वर्ष 2000 पासून रचना संस्थेसोबत बालहक्कासाठी काम करू लागल्या होत्या. त्या सांगतात, गरीब, गरजू घरातल्या मुलींचं आम्ही लेझिम पथक तयार केलं आणि त्या पथकाच्या माध्यमातून उभे राहणारे पैसे त्याच मुलींच्या शिक्षणासाठी वापरू लागलो. बालहक्काची माहितीच या पथकातून देत होतो. त्यामुळे ही कल्पना फारच लोकप्रिय झाली. हा उपक्रम पाच वर्षे राबवला. 2007 मध्ये आशा वर्कर म्हणून नियुक्त झाले. जननीसुरक्षा योजना, दारिद्य्ररेषेखाली महिलांसाठीच्या योजना महिलांना सांगू लागले. अडल्या नडल्या बायकांसाठी मदतीला धावू लागले. अगदी सुरवातीच्या काळातली एक घटना सांगते. गावात दिवस भरलेली गर्भवती होती. तिच्या पोटात दुखू लागलं म्हणून तिला घेऊन प्रसूतीगृहात गेले. पण ती लघवीसाठी बाहेर गेली आणि तिथंच तिचं बाळ अर्ध बाहेर आलं. मी धावत जाऊन ते बाळ हातात घेतलं. ती बाई कातकरी समाजातील होती. तो समाज आणि गावकरी एकमेकांत फारसे मिसळत नसत. तरीही मी त्या बाईला मदत केली आणि बाळ वाचवलं यामुळे गावकर्‍यांच्याही मनात माझ्याविषयी एक विश्वास निर्माण झाला की सुरेखा मदतीला धावून येणार.

यानंतर त्यांची आशा कार्यकर्ती म्हणून ओळख निर्माण झाली ती आजतागायत. त्या सरपंच ही आहेत आणि गावच्या आशा कार्यकर्तीसुद्धा. सरपंचपदाने त्यांना महिला सक्षमीकरणासाठी इतरही उपक्रम राबविण्याची संधी मिळाली. त्यानुसार महिलांना शेगड्या, तांब्याची हंडे-कढई, ताडपत्री, शेवई मशीन्स वाटल्या. 7 महिला बचत गट तयार करून खेळते भांडवल उपलब्ध करून दिलं. ग्रामीण महिलांनी पुढाकार घेऊन आरोग्य, कृषी विकास कसा साधला याचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी त्यांनी 50 महिलांना सहलीसाठी नेले. त्यातून महिलांची समज वाढली आणि आता त्या आपल्या भागात काय करता येईल यासाठी एकत्र येत आहेत. सुरेखाताई सांगतात, गावातल्या मुलीदेखील आता शिकताहेत. गावात बालविवाह होत नाहीत. उलट मुली पदवीपर्यंत शिक्षण घेत आहेत. हळूहळू चित्र बदलत आहे. आता गावाला अ‍ॅनिमियामुक्त करायचं आहे. ‘सुरेखाताई आणि त्यांच्या कामात सतत सोबत असणारे उपसरपंच तानाजी खुटवड दोघांच्याही डोळ्यांत गावकर्‍यांसाठी स्वप्न दिसत होते.

शिबिरात आलेली एक तेवीस वर्षीय तेजश्री खुटवड सांगत होती की तिचं एचबी 9 होते. मागच्यावेळेस जेव्हा अशी चाचणी झाली तेव्हाच तिला ते समजलं होतं. त्यामुळे यावेळेस ती अगदी नेटाने आली होती. पल्लवी शिंदे या गावाच्या पोलीस पाटलीणचंही हेच मत होतं की महिलांना केवळ घरच्यांसाठी कष्टायचं माहीत असतं, पण थेट चाचणी झाली आणि त्यातून सत्य समोर आले की त्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकतील आणि म्हणून अशी शिबिरं व्हायला हवीत.आमचं गाव त्यासाठी पुढाकार घेतंय हेही महत्वाचं. त्यांच्यासारख्याच इतरही महिला तेवढ्यासाठीच तर खाडा करून आल्या होत्या.

एकूणच सुरेखाताई सरपंच असूनही त्यांचा वावर कुठंही मिरवण्यापुरता मर्यादित नव्हता की त्यात कुठलंही पुढारलेपण नव्हतं. उलट त्या कार्यकर्तीच्याच उत्साहानं रक्ततपासणीच्या शिबिराकडे लक्ष देऊन होत्या. प्रत्येकीची विचारपूस करत होत्या आणि त्यांना आग्रहानं अल्पोपहार घेण्यास सांगत होत्या. रक्ततपासणी ही काय मोठी भानगड असं कुणालाही वाटू शकतं, पण मोबाईलची रेंजही न मिळणारं हे गाव आहे. संपर्काचं साधन न मिळणार्‍या गावात जर वेळीच महिलांना स्वत:चे आरोग्य आणि आरोग्याची काळजी आणि पर्यायाने कुटुंबाच्या आरोग्याची काळजी याची ओळख होणार असेल तर त्याचं महत्त्व कशात मोजणार? एक आशा कार्यकर्ती सरपंच होते आणि गावकरी त्यांच्या कामाचं महत्त्व जाणतात तेव्हा गावाचा आरोग्य विकास होणं फार दूरची गोष्ट राहत नाही.

-हिनाकौसर खान-पिंजार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -