घरफिचर्सतबलीगींपेक्षाही मुस्लीम समाजाचे प्रश्न महत्त्वाचे

तबलीगींपेक्षाही मुस्लीम समाजाचे प्रश्न महत्त्वाचे

Subscribe

तबलीगी जमात हा शब्द मी साधारणतः पंचवीसेक वर्षांपूर्वी ऐकला असेन. आमच्या कोकणातील गावात मोहर्रमला ताजिया काढून त्याच्या भोवती फेर धरून नाचतात. रोठ आणि मलिदा करतात व दिवाळीतील फराळासारखा नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रमंडळी यांना वाटतात, नगारा-ताशा वाजवतात. या सगळ्याला गावातील संख्येने मोजक्याच असलेल्या काही तबलीगींनी विरोध केला होता. इस्लाममध्ये या गोष्टी हराम असल्याचं ते सांगत होते. त्याचे लिखित दाखले देत होते. याला गावातील काही ज्येष्ठांनी विरोध केला. ही आपल्या वाडवडलांची प्रथा परंपरा आहे, असं या ज्येष्ठांचं म्हणणं होतं. तेव्हा या जमाती लोकांचं फारसं काही चाललं नाही. मात्र, कालांतराने तबलीगींचं वर्चस्व वाढत गेलं. एकतर मुस्लीम समाजातील अनेक तरुण नोकरी निमित्ताने खाडी देशांमध्ये जाऊ लागले.

तिथला सांस्कृतिक वर्चस्ववाद त्यांच्या नेणिवेत हळू हळू रूजायला सुरुवात झाली. भारतीय मुसलमानांच्या परंपरा कशा अयोग्य आहेत, याचे तर्क त्यांना सांगितले जाऊ लागले व ते हळू हळू त्यांच्या गळी उतरू लागले. इथले ज्येष्ठ वयानुसार जगातून वजा व्हायला लागले व उरलेल्यांचे काही चालेनासेही झाले आणि पुढे इस्लामवर पुस्तक लिहिण्याच्या निमित्ताने अनेक पुस्तके वाचावी लागली. त्यात तबलीगींचे संदर्भ अनेक ठिकाणी आले. विशेषतः माहमूद मामदानी आणि रेझा असलान यांनी यावर प्रकाश टाकला आहे. जॉन कूली हे विविध इस्लामी गट, त्यांच्या चळवळी, त्यांच्यातील आंतर्विरोध आदींचे अभ्यासक आहेत. त्यांचं एक २००० साली प्रकाशित झालेलं अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे अनहोली वॉर त्यात त्यांनी या तबलीगी जमातविषयी विस्तृत लिहिलं आहे, कूली हे अमेरिकी भांडवली विचारांचे असल्याचे दाखले काहीजण देऊ शकतील कदाचित पण माहमूद मामदानी किंवा रेझा अस्लान यांच्या विषयी ते देता येणं कठीण आहे. त्यात मामदानी हे तर डाव्या विचारांचे अमेरिकास्थित मुसलमान आहेत. त्यांच्या विषयी मुस्लीम कट्टरपंथीयांचा राग हा वेगळ्या प्रकारचा असू शकेल.

- Advertisement -

या सगळ्यातून जी माहिती मिळते ती अशी की, मौलाना मुहंमद इलियास यांनी दिल्लीपासून जवळच असलेल्या मेवात या ठिकाणी या तबलीग जमातची स्थापना १९२६ साली केली. उत्तर प्रदेशातील देवबंदच्या दारूल उलमच्या धर्तीवर आणि विचारधारेवरच काम करणारी ही संघटना. मुसलमान हे आपल्या मुख्य विचारांपासून दूर जात आहेत. इस्लामी परंपरांना फाटा देत आहेत. त्यांना खर्‍या इस्लामी परंपरा शिकवल्यासच जगात खर्‍या अर्थाने खुशाली येईल वगैरे प्रकारचा हा मूळ विचार होता. आता या मूळ परंपरा म्हणजे यांच्या दृष्टीने अरबी परंपरा हे सांगायला नकोच. वास्तवात स्वतः पैगंबरांनी याबाबतची कट्टरता फारशी दाखवल्याचं कुठेही इतिहासात नमूद नाही. दुसरी गोष्ट पैगंबरांच्या पश्चात जेव्हा इस्लाम विविध सांस्कृतिक पट्ट्यांमध्ये पसरायला लागला. कारण त्या काळात राष्ट्र किंवा देश ही संकल्पना जन्माला आलेली नव्हती. तेव्हाही पहिल्या चार खलिफांपैकी कुणीही त्या नव्या प्रदेशांतील संस्कृतींशी द्रोह केल्याचेही दिसत नाही. उदाहरणार्थ पर्शिया जिंकल्यानंतर तिथल्या अनेक रूढी, चालीरिती तशाच सुरू ठेवण्यात आल्या, काही कर वसुलीसारख्या नव्या गोष्टी अरबांनी शिकून घेतल्या अशा अनेक गोष्टी सांगता येतील, असो.

तर दक्षिण आशियातील मुसलमानांना शुद्ध इस्लामी चालीरिती शिकवण्याच्या हेतूने या संघटनेची सुरुवात झाली. शुद्ध हा शब्दच खरंतर फार प्रतिगामी वाटावा असाच आहे. शुद्ध शाकाहारी, शुद्ध भाषा त्यात शुद्ध धर्म आला की विचारायलाच नको. मग यांनी मुसलमानांना सुफी परंपरा कशा चुकीच्या आहेत. पिराच्या कबरीसमोर काही मागणे कसे चूक आहे, त्याच्या समोर माथा टेकणे कसे चूक आहे, याचे धडे द्यायला सुरुवात केली. भारतीय परंपरेला साजेशी येथील सुफी परंपरा होती. लोक देवळात मूर्तीसमोर हात जोडत होते, तेच दर्ग्यात येऊन पिराच्या समोर हात फैलावत होते. याला विरोध करायला सुरुवात झाली. ती इतक्या खालच्या पातळीवर गेली की आठ-दहा वर्षांपूर्वी मुंबईतील एका जमाती मौलानाने ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती यांना आपल्या भाषणात शिवीगाळ केली होती. त्यातून सुफी परंपरा मानणारे आणि जमाती यांच्यात काही ठिकाणी छोटे दंगेही उसळले होते. पुढे पोलिसांनी त्यावर नियंत्रण मिळवलं.

- Advertisement -

कूली आणि मामदानी यांच्या म्हणण्याप्रमाणे तबलीगचे मुख्यालय हे पाकिस्तान इथे आहे. तबलीग स्वतःला अराजकीय संघटना अभिमानाने म्हणवून घेत असते. आम्ही केवळ धर्माचे पालन कसे करावे, इस्लामी परंपरा, दररोजच्या जीवनात कसे राहावे, कसे वागावे, कसे खावे, कसे बसावे (अगदी शौचासदेखील) या बाबीच मुस्लिमांना शिकवतो, असे ते सांगतात. मात्र, अफगाणिस्तानातील कम्युनिस्ट सरकार पाडण्यासाठी अमेरिकेने आणि पाकिस्तानने जे प्रयत्न केले त्यातही तबलीगींची त्यांना मोठी मदत झाली. सोविएत युनियनने अफगाणिस्तानात लाल सेना पाठवली होती, त्याला विरोध करण्यासाठी या तबलीगी जमातमधूनच मोठ्या प्रमाणावर भरती करण्यात आल्याचे दाखले कूली आणि मामदानी यांनी दिले आहेत. अल्जेरिया जो १९६२ पर्यंत फ्रेंचांची आणि मोरक्को जो १९५६ पर्यंत स्पेन आणि फ्रेंचांची वसाहत होता. या देशांमध्ये यांच्या वेगळ्या मशिदी आहेत.

या मशिदींमधून तयार होणारे यांचे धर्म प्रसारक अरबी संस्कृती तेथील नागरिकांवर थोपवण्याचा प्रसार जोरात करत असतात. महिलांनी डोक्यावर पदर घ्यावा इथून सुरू झालेला यांचा प्रचार आता महिलांनी बुरख्याशिवाय राहणे हे गैरइस्लामी आहे, इथपर्यंत आले आहे. हे मुद्दामून उद्धृत करण्याचे कारण की, महाराष्ट्रातील कोकणात किंवा पश्चिम महाराष्ट्रातील महिला २०-२५ वर्षांपूर्वी बुरखा वापरत नसत. एका विशिष्ट पद्धतीने पाच वारी साडी नेसण्याचीच परंपरा इथे होती. लग्नात बाकी काही देणं घेणं नसलं तरी चालेल परंतु नवर्‍याकडून बायकोला एक गंठण (काळे मणी आणि सोन्याची छोटी वाटी) हे कंपलसरी होतं. या सगळ्या परंपरा गैर इस्लामी असल्याचा प्रचार जमातींनी मोठ्या प्रमाणावर केला व आज ज्यांच्या आया-आजा साड्या घालत होत्या, त्या घरातील मुली नाती नखशिखांत बुरख्यात वावरताना जागोजागी दिसत असतात.

सांगण्याचा मुद्दा असा की, आम्ही राजकारण करत नाही, म्हणणारे प्रत्यक्षात काय करत असतात हे भारतातल्या लोकांना वेगळे सांगण्याची गरज नाही. नागपूर ते दिल्ली व्हाया अयोध्या हा प्रवास सगळ्यांनाच नीट माहिती आहे.तर अशा या तबलीग जमातचा भारतीय परंपरेतील मुस्लिमांना फार कड आहे, अशातील भाग नाही. किंबहुना बहुतांश मुस्लिमांचे यांच्याशी गावागावात पंगेच आहेत. ते दर्ग्यावर जाण्याच्या मुद्द्यावरून आहेत, ते महर्रमला ताजिया काढून नाचण्याच्या मुद्द्यावर आहेत, ते रमझान ईदेला बिगर मुस्लिमांना घरी बोलावून शिर खूर्मा किंवा मटण खायला घालण्यावरून आहेत. परंतु यांच्या मागे उभ्या असलेल्या प्रचंड आर्थिक ताकदीपुढे विस्कळित गरीब भारतीय मुसलमान हवालदील आहे. एखाद्याला भरती करून त्याला खाडी देशात विशेषतः सौदीसारख्या देशात सहज नोकरी लावणे, किंवा त्याला एखादा छोटासा व्यवसाय उभारून देणे यांच्यासाठी सहज शक्य होते.

जगाचा इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे, या वाक्याचा अनेकदा विसर पडणार्‍या डाव्यांनाही या मागील अर्थकारण समजत नाही किंवा समजून घेण्याची इच्छा दिसत नाही. त्यातूनच हा विषाणू खूप वेगाने फैलावला आहे. करोनाच्या सोबतीने या विषाणूचा प्रसार रोखायचा असेल, तर पुरोगामी शक्तींनी या देशातील मुस्लीम परंपरांबद्दल जाणून घ्यावे लागेल. मुख्य म्हणजे मुस्लिमांबद्दल जाणून घ्यावे लागेल. त्यांचे प्रश्न हे मदरसा आणि कबरस्तानाच्या पलीकडचे आहेत, हे समजून ते सोडवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. सुदैवाने या देशात तुकाराम, चोखामेळा ते बुल्लेशहा, कबीर या गंगा-जमनी परंपरांची घट्ट वीण ना तबलीग काय किंवा संघ काय उखडून फेकू शकलेला नाही. त्या पुरोगामी परंपरा आणि आधुनिक विचार यांची सांगड घालून हा विषाणू नक्कीच रोखता येऊ शकतो. कबीर आपल्या एका दोह्यात म्हणतात, हिन्दू तुरक के बीच में मेरा नाम कबीर जीव मुक्तवन कारने अबिकत धरा सरीर। हिंदू आणि मुसलमानांच्या मध्ये माझं नाव कबीर आहे. लोकांना अज्ञान आणि पापापासून मुक्त करण्यासाठी मी हे शरीर धारण केलं आहे!.

-(समर खडस यांच्या फेसबूक वॉलवरून)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -