घरफिचर्सकाळजावर हात ठेवा आणि लोकशाहीसाठी मतदान करा!

काळजावर हात ठेवा आणि लोकशाहीसाठी मतदान करा!

Subscribe

भारतीय राज्यघटनेने या देशातील नागरिकांना निवडणुकीत मतदानाचा एक फार महत्त्वपूर्ण अधिकार प्रदान केला आहे. स्त्री, पुरुष, गरीब, श्रीमंत, उच्च, नीच असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता राज्यघटना लिहिणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाच्या मताचे समान मूल्य मानले. समानतेचे हे एक फार महत्त्वाचे सूत्र घटनेद्वारे भारतातील प्रत्येकाला मिळाले आहे, त्याचे भान ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मतदान हे प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे याचे भान आल्याशिवाय जगातील सर्वात मोठी असलेली आपली लोकशाही सुदृढ होणार नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवे. म्हणूनच काळजावर हात ठेवा आणि लोकशाहीसाठी मतदान करा.

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर ‘आपलं महानगर’ने गेले दोन एक महिने कुरुक्षेत्र नावाखाली दररोज दोन पाने देशाचा, राज्याचा, खेड्यांचा, शहरांचा, शेतकर्‍यांचा, कामगारांचा आणि समाजाच्या शेवटच्या माणसाला काय वाटते याचा आढावा घेण्यासाठी दिली. त्यात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पक्ष, उमेदवार, रणनीती, आरोप प्रत्यारोप, मुलाखती, मतदारसंघाचा आढावा देतानाच सोशल मीडियातून राजकीय नेत्यांवर होणारी बोचरी टीकाही लोकांना दाखवली. ‘बिनधास्त बोल’ने वात्रटिका सादर केल्या. अँकरने ‘डोक्याला शॉट’ कॉलममधून अशा काही टोप्या उडवल्या की त्याची मजा काही औरच ठरली… मोजके मर्मभेदी शब्द आणि भाषेचा ओघवता सूर गारुड करणारा होता. विशेष म्हणजे ‘माझेही मत’ या स्तंभात युवकांना स्वतःचे मत मांडण्याची संधी दिली.

- Advertisement -

देशाच्या युवा पिढीला उत्तम भान असल्याची जाण यातून दिसली… निवडणुका ऐन रंगात असताना महाराष्ट्रात चौथा आणि अंतिम टप्पा सोमवारी होणार आहे. पहिल्या तीन टप्प्यात ग्रामीण भागातून मतदानाला जोर दिसत असताना तसाच जोश शहरी भागांमध्ये दिसला नाही. गडचिरोलीत 65 टक्क्यांच्या वर मतदान होत असताना विद्वानांचे शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या पुण्यात मात्र अंदाजे 46 टक्क्यांच्या आसपास मतदान झाले. यावर काही मित्रांच्या गंमतीशीर प्रतिक्रिया आल्या… लोकांना 200 टक्के अक्कल शिकवणार्‍या पुणेकरांना झाडून मतदानाला मात्र उतरता आले नाही… असो विषय हा नाही.

‘माझे मत’ या सदरात जयेश सावंत हा विद्यार्थी सांगतो ती मन की बात भावून गेली… मतदान करणे हा आपला मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मतदान करणे गरजेचे आहे. मतदानाच्या दिवशी आपण सतर्क राहून योग्य त्या उमेदवाराला मत देण्याचे कर्तव्य पार पाडले पाहिजे. मतदान करणे म्हणजे एक प्रकारे देशाची सेवा करणे होय. आपण निवडून दिलेला उमेदवार हा योग्य प्रकारे आपल्या मतदारसंघासाठी काम करेल याची शाश्वती आपल्याला असली पाहिजे. कोण्या एका व्यक्तीला केंद्रबिंदू न ठेवता आपल्या मतदारसंघासाठी काम करेल, अशा उमेदवाराला आपण निवडून देण्याची गरज आहे.

- Advertisement -

आपल्या मतदारसंघासाठी नेमके प्रश्न कोणते आणि ते सोडवण्यासाठी आधीच्या खासदाराने कोणते प्रयत्न केले आणि त्याच्या विरोधात असलेल्या उमेदवाराची योग्यता काय, याची तुलना मतदाराला करता आली पाहिजे. तरच आपण योग्य उमेदवार निवडून देऊ शकतो. जर मतदारसंघ चांगला झाला तर देश आपोआप उत्तम होणार आहे… जयेशचे हे मत लोकशाहीत मतदानाला किती महत्व आहे, याचे अचूक विश्लेषण करणारे आहे. आणि म्हणूनच कुठलीही लाट, आश्वासने, जुमलेगिरी, घराणी, विकास, गरिबी हटाव, सोशल मीडियाचा एककल्ली प्रचार, चुकीचे व्हिडीओ या कशा कशालाही बळी न पडता आपल्या काळजावर हात ठेवा आणि लोकशाही जिवंत राहण्यासाठी मतदान करा… असे ‘आपलं महानगर’ सर्वांना आवाहन करत आहे.

भारतीय राज्यघटनेने या देशातील नागरिकांना निवडणुकीत मतदानाचा एक फार महत्त्वपूर्ण अधिकार प्रदान केला आहे. स्त्री, पुरुष, गरीब, श्रीमंत, उच्च, नीच असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता राज्यघटना लिहिणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाच्या मताचे समान मूल्य मानले. समानतेचे हे एक फार महत्त्वाचे सूत्र घटनेद्वारे भारतातील प्रत्येकाला मिळाले आहे, त्याचे भान ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मतदान हे प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे याचे भान आल्याशिवाय जगातील सर्वात मोठी असलेली आपली लोकशाही सुदृढ होणार नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवे. आपण प्रत्येकजण सरकारकडून जशा काही अपेक्षा करत असतो, त्या अपेक्षांच्या पूर्ततेसाठी आपणही मतदान करणे हे कर्तव्य ठरते. लोकशाहीने दिलेला हा अधिकार बजावणे म्हणूनच अतिशय महत्त्वाचे आहे.

आपण एकाट्याने मत न दिल्याने असा काय मोठा फरक पडणार आहे, असा विचार करणारेही या देशात बरेचजण असतात. पण असा विचार आत्मघातकी असतो. आपल्या एका मतानेही फरक पडू शकतो, हे लक्षात घेतले, तर मतदानाचे खरे मूल्य लक्षात येऊ शकेल. आपल्याला जो पक्ष किंवा उमेदवार महत्त्वाचा वाटतो, त्या पक्षाला मत देणे म्हणजे आपण ज्या विचारांवर विश्वास ठेवतो, त्याला आधार देण्यासारखे असते. मत दिल्याशिवाय या देशात परिवर्तन अशक्य आहे, याची जाणीव ठेवली, तर हे सरकार नको होते, असे घडले त्याला हेच सरकार कारणीभूत आहे अशा चर्चाना पूर्णविराम मिळेल. सरकारकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त करण्याची मतदान ही एक संधी असते. कोणत्या प्रकारचे सरकार आपल्याला हवे आहे, हे सांगण्याचे ते एक निमित्त असते. म्हणून मतदानाच्या दिवशी सहलीला जाणे किंवा मतदानालाच न जाणे अतिशय चुकीचे आहे. सशक्त लोकशाही हवी असेल, तर मतदानाशिवाय पर्याय नाही. नागरिक सजग असल्याचे ते एक द्योतक असते. मतदान हा एक मौल्यवान अधिकार आहे. त्याचे मूल्य करून कुणी आपल्याला विकत घेऊ पाहत असेल, तर त्याच्या प्रलोभनांना बळी पडणे म्हणजे या अधिकाराचा घोर अपमान आहे. आश्वासने आणि प्रलोभनांपासून दूर राहून लोकशाही निकोप करण्याच्या प्रयत्नात प्रत्येकाने सहभागी होणे त्यासाठी अतिशय आवश्यक आहे.

लोकशाहीचा खरा आधार जनता असते. जनता लोकशाहीविषयी उदासीन असेल, तर लोकशाही कोसळते. हे राजकारणातले साधे वास्तव आहे. जनतेची भीती नसताना भ्रष्ट व्यवहाराची दीर्घ परंपरा असणारा पक्ष सत्तेतून गेला, म्हणजे देश भ्रष्टाचारमुक्त होईल, ही अपेक्षाच चुकीची आहे. न्यायालये हा मानवी संस्कृतीतील संस्कृतीचा भाग असतात. न्यायालये आपला निर्णय देतात. इतकीच त्यांची सत्ता असते. हा निर्णय अमलात आणण्याचे बळ न्यायालयांजवळ नसते. ज्यांच्या जवळ बळ असते, त्यांनी स्वत:ला अप्रतिष्ठेचा आणि गैरसोयीचा ठरणारा न्यायनिर्णय आदरपूर्वक स्वीकारायचा, ही लोकशाही संस्कृतीची खूण आहे. पण, जिथे हा सगळा अभिनयाचाच भाग असतो, तिथे अशा संस्कृतीची चर्चा करण्यात अर्थ नसतो. स्वार्थ हा माणसाला जन्मजात असतो.

या स्वार्थाविरुद्ध जेव्हा नीती उभी राहते, त्या वेळी वातावरण सत्तापिपासेचे आणि दंभाचे असेल, तर नीतीला स्वत:चे बळ नसते. अधूनमधून लोकशाहीचा अभिनय शिल्लक राहावा, इतकेच शासनविरोधी न्यायनिर्णय सरकार स्वीकारत असते. स्थानिक राजकारणात मध्यमवर्गीयांना रस नसणे, ही त्यामागची जुनीच कारणे. ती बदलत नाहीत, तोवर आभास सुरूच राहतो. लोकशाही ही मूल्यांच्या आधारे उभी राहणारी समाजव्यवस्था असते. बहुमताचे राज्य म्हणजे लोकशाही. पण, बहुमताने अल्पमताचे रक्षण केले पाहिजे. अल्पमताला बहुमत होण्याची मुक्त संधी दिली पाहिजे. या बहुमताने जबाबदारपणे कायद्याच्या आधारे राज्य केले पाहिजे. सर्वच कायदे काही मूल्यांना सुसंगत असले पाहिजेत. आपण अल्पमतात येण्याचा धोका शिल्लक ठेवणे, हे गैरसोयीचे, बहुमताने, इच्छेनुसार काम करण्याऐवजी कायद्याप्रमाणे काम करणे, हेही गैरसोयीचे आणि मूल्य सांभाळणे हे तर सर्वांनाच गैरसोयीचे! म्हणून लोकशाही राष्ट्र व जनता यांना सर्वांत सोयीस्कर रचना असते.

लोकशाही म्हणजे जबाबदार शासनपद्धती, पण दुर्दैवाने जबाबदारपणा कुठेच दिसत नाही. ही जबाबदारीची जाणीव केवळ सामान्य जनतेतच नव्हे, तर देशाचा व स्थानिक संस्थांचा कारभार चालविण्यास निघालेल्या राजकीय कार्यकर्त्यांतही असलेली दिसत नाही. लोकशाहीतील जनतेचे राज्य म्हणजे कसलेही श्रम न करता आपल्याला मुक्तपणे खाण्यासाठी आपल्या पूर्वजांनी निर्माण करून ठेवलेले कुरण आहे, अशी या कार्यकर्त्यांची भावना बनली आहे. महाविद्यालयात असताना कसलाही अभ्यास न करणारा, अभ्यास न करणार्‍या मुलांचे टोळके घेऊन फिरणारा मात्र संघटनकौशल्य असणारा तरुण हा आता लोकशाहीतील नवा राजकीय कार्यकर्ता बनत आहे. सामाजिक कार्याची तळमळ, चारित्र्य, सामाजिक विषयाचा अभ्यास, त्याग करण्याची तयारी या सार्‍या गोष्टी गैरलागू बनलेल्या आहेत. तो एक उपजिविकेचा किंवा इतरांवर प्रभुत्व निर्माण करण्याचा धंदा बनला आहे.

अशा राजकीय कार्यकर्त्यांची गल्लीपासून दिल्लीपर्यंत एक जमात बनली आहे. प्रत्येक क्षेत्रात निवडणूक आली आहे. पतपेढी, सहकारी संस्था, सहकारी बँका, धर्मादाय संस्था यापासून ते ग्रामपंचायत ते लोकसभा येथपर्यंत प्रत्येक ठिकाणी निवडणूक आहे. निवडणूक जिंकणे हे आजच्या लोकशाहीचे सर्वांत महत्त्वाचे अंग बनले आहे. ‘लोकशाही म्हणजे निवडणूक जिंकणे व मग राजकारण, कारभार करणे’ असे समीकरण बनले आहे. निवडणूक जिंकण्यासाठी अगदी साध्या नगरपालिकेच्या, पतपेढ्यांच्या निवडणुकांपासून ते लोकसभेच्या निवडणुकांपर्यंत कोट्यवधी रुपये खर्च केले जातात.

ही भ्रष्ट गुंतवणूक असते सत्ता मिळवण्यासाठी आणि मग सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असे समीकरण तयार होते. इतकी वर्षे आपण तेच बघत आलो आहे. जगातला सर्वात तरुणांचा देश असे आपण अभिमानाने सांगत असू तर आता या तरुणांच्याच हातात जगातील सर्वात मोठी लोकशाही वाचवण्याची ताकद आहे. दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून हा देश बाहेर काढताना लाखो लोकांनी बलिदान केले. आज आपण लोकशाहीत वावरताना तिचे मोल आपल्याला लक्षात येत नाही. पण, जरा इतिहासात डोकावून हुकूमशहांचा कारभार पाहा. भयानक चित्र दिसेल.

गेले दोन महिने आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘हम करेसो कायदा’ हा कारभार पाहिला आणि राहुल आणि गांधी परिवाराची तीच गरिबी हटाव घोषणा तसेच ठेच पोहचल्यानंतर हिंदूंना गोंजारण्यासाठी कर्मकांड करण्याची केलेली नौटंकीही आपण याच डोळ्यांनी पाहिली. म्हणूनच जयेश सावंत म्हणतो, त्याप्रमाणे तुम्ही मतदान करत असलेले उमेदवार पाहा, तुम्ही योग्य उमेदवार निवडून दिला तरच हा देश चांगल्या माणसांच्या हातात सुरक्षित राहील आणि लोकशाहीचा विजय होईल… चला तर काळजावर हात ठेवा आणि सुदृढ लोकशाहीसाठी मतदान करा!

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -