कारण आम्हांला करोनाच्या प्रादुर्भावाच्या विचारापेक्षा वर्क फ्रॉम होम हा आदेशच जाम आवडलाय. कारण आम्ही भारतीय सुट्ट्यांसाठी खूपच हावरट आहोत. त्यातच वर्क फ्रॉम होम सारख्या पाश्चिमात्य राष्ट्रात राबवली जाणारी संकल्पना करोनाच्या निमित्ताने का होईना आता इथेही काही दिवसांसाठी का होईना राबवली जाणार असल्याने आम्हाला काय करू आणि काय नको असं झालयं. वर्क फ्रॉम होम स्टेटसमध्ये जरी आम्ही काम करणार असलो तरी त्यानंतरचा किंवा मधल्या ब्रेकमधला वेळ आम्ही कुटुंब आणि मित्रांबरोबर कधी त्यांच्या घरी तर कधी आमच्या घरी चकाट्या पिटवण्यात नाहीतर संध्याकाळी चकना खात बसण्यात घालवत आहोत आणि घालवणार आहोत. त्यातच जर घरात बसून बोर झालोच तर पाय मोकळे करायला म्हणून रस्त्यावर नाहीतर बिल्डींगच्या कट्ट्यावर, नाहीतर गच्चीवर जाणारच आहोत . अथवा मोकळ्या मैदानावर क्रिकेट, फुटबॉल खेळायला आम्ही मोकळेच आहोत.
काय म्हणावं या मानसिकतेला. नको तेवढा आत्मविश्वास की मूर्खपणा. लोकांना गर्दी टाळा. घरातच बसा सांगून आता शासनाचाही घसा बसलाय. काय झालंय हो आपल्याला जरा विचार करा शांतपणे. तेही जमत नसेल तर जरा व्हिडीओ बघा चीन आणि इराण व इटलीने जे यूट्यूबवर टाकलेत. करोनाबाबतचा अतिआत्मविश्वास कसा नडला त्यांना. याची त्यांच्या सरकारनेच या व्हिडीओच्या माध्यमाने कबुली दिली आहे. रोज प्रेतांचे खच पडत आहेत तिथे. पण करोनाची लागण होईल या भीतिने त्यांच्यावर दफनविधी करण्यासाठी कुटुंबीयही पुढे येत नाहीयेत आणि इटलीत तेवढी मोकळी जागाही आता उरली नाहीये. त्यामुळे काही प्रेतांची व्हिल्हेवाट लावण्याची जबाबदारी तेथील लष्कराला देण्यात आली आहे. करोनाच्या याचपार्श्वभूमीवर चीनमध्ये काही दिवसांपूर्वी निर्जनस्थळी प्रेतांचा खच जाळण्यात आल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला. तो बघूनही जर आम्हांला करोनाचे गांभीर्य कळत नसेल तर जगात भारतीयांसारखे मूर्ख कोणीही नाही असे बोलावेच लागेल.
याचा कळस म्हणजे परदेशातून आलेले व सध्या क्वारनटाईनचा स्टॅप हातावर असूनही सार्वजनिक स्थळी बिनधास्तपणे वावरणारे दीडशहाणे फॉरेन रिर्टनर. स्वत: बरोबरच इतरांनाही आपण करोनाच्या दाढेत लोटत आहोत. याची पुसटशी जाणीवही नसेल का त्यांना की जाणीवपूर्वक ते असले कृत्य करत आहेत. याचाही सरकारने विचार करणे आवश्यक झाले आहे. अशा महाभागांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे शासनातर्फे सांगण्यात आले आहे. याची अंमलबाजवणी झाल्याचे गायिका कनिका कपूरवर गुन्हा दाखल झाल्यानंतर समजले. अभिनंदन आणि विशेष आभार सरकारचे. कारण आम्हा बेशिस्त भारतीयांना गर्दी नेहमीच आकर्षित करते. मग ती लग्नाची असो, अंत्यसंस्कारांची असो व आंदोलानची.