यंदा मकर संक्रांती १४ जानेवारी रोजी देशभर साजरी करण्यात येणार आहे. पोंगल, बिहू आणि उत्तरायण पर्वसुद्धा या दिवशी साजरे केले जाणार आहे. १४ जानेवारी रोजी मकर संक्राती साजरी केली जाते. याच दिवशी हा सण साजरा करण्यामागे देखील काही विशेष कारण असल्याचे सांगितले जात आहे. गुरूवारी १४ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजून १४ मिनिटांनी मकर संक्रातीच्या दिवशी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे. एका संक्रांतीपासून दुसऱ्या संक्रांती पर्यंतचा काळ हा सौर मास म्हणून ओळखला जातो. पौष महिन्यात सूर्य उत्तरायण होऊन मकर राशीत प्रवेश करतो ही गोष्ट देशभर वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारे उत्सव म्हणून साजरी केली जाते.
जाणून घ्या संक्रातीचा इतिहास
मकर संक्रांती हा सण उत्तर भारतात दरवर्षी १४ जानेवारीला साजरा केला जातो. बऱ्याचवेळा सूर्याचा मकर राशीत प्रवेश १४ जानेवारीला संध्याकाळी किंवा रात्री होतो. अशा परिस्थितीत शास्त्रानुसार दुसर्या दिवशी संक्रांती मानली जाते. मकर संक्रांतीची वेळ काळानुसार बदलत गेलेली आहे. ज्योतिष शास्त्रीय गणना आणि घटनेची जोड देण्यावरून असे सूचित होते की मकर संक्रांती डिसेंबरमध्ये महाभारत काळात साजरी केली गेली जायची. असा उल्लेख आहे की मकर संक्रांती २४ डिसेंबर रोजी ६ व्या शतकात सम्राट हर्षवर्धनच्या काळात साजरी केली गेली होती. अकबरच्या काळात १० जानेवारी आणि शिवाजी महाराजांच्या काळात ११ जानेवारी रोजी मकरसंक्रांती साजरी करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, एका वर्षात सूर्याची गती २० सेकंदांनी वाढते म्हणून मकर संक्रातीच्या तारखांचे हे रहस्य आहे. यानुसार, ५००० वर्षांनंतर मकरसंक्रांती जानेवारीत नव्हे तर फेब्रुवारीमध्ये साजरी केली जाण्याची शक्यता आहे. यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी, १४ जानेवारी रोजी सकाळी सूर्य मकर राशीत येत आहे, म्हणून मकर संक्रांती गुरुवार १४ जानेवारीलाच साजरी केली जाणार आहे.
अशी आहे संक्रांतीची पुराणातील कथा
श्रीमद्भगवत तसेच देवी पुराणानुसार शनी महाराजाचे त्यांच्याच वडिलांशी वैर होते. कारण सूर्य देवाने त्याची आई छायाला त्याच्या दुसऱ्या बायकोचा संज्ञाचा मुलगा यमराजाशी भेदभाव करताना पहिले होते. या गोष्टीने नाराज होऊन सूर्य देवाने संज्ञा आणि त्यांचा मुलगा शनी याला स्वतःपासून वेगळे केले होते. म्हणून शनी व छाया यांनी सूर्य देवाला कुष्ठरोग्याचा शाप दिला होता.
यंदाची संक्रात असणार विशेष
मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सूर्याचा पुत्र शनि आपल्या मकर राशीत गुरु महाराज बृहस्पतीत आणि ग्रहांचे राजकुमार बुध चंद्राच्या सहाय्याने सूर्यदेवाचे मकर राशीत स्वागत करतील. अशा ग्रहांचा संयोग फारच दुर्मिळ मानला जातो कारण ग्रहांच्या या संयोगात, ग्रहांचा राजा, गुरु, राजकुमार, न्यायाधीश आणि नक्षत्रपती एकत्र असतील. श्रवण नक्षत्रात सूर्याचा प्रवेश होईल, ज्यामुळे ध्वज नावाचा एक शुभ योग निर्माण होईल.
सूर्य उत्तरायण झाल्याने प्रकृती मध्ये बदलांना सुरुवात होते. थंडीने गारठलेल्या लोकांना सूर्यदेवाच्या उत्तरायण होण्याने थंडीपासून बचाव होण्यास मदत होते, असे मकर संक्रांतीचे वैज्ञानिक कारण आहे. भारत हा कृषी प्रधान देश असून मकर संक्रांतीच्या काळात शेतकरी रब्बी हंगामाची पेरणी करून खरीप हंगामाचे पीक घरी घेऊन येतात. शेतकऱ्यांचे घर अन्नधान्याने भरून जाते. म्हणूनच मकर संक्रांतीला खरीप हंगामातील पदार्थांनी या पर्वाचे स्वागत केले जाते, असेही सांगितले जाते.