घरसणवारआज मार्गशीर्षातील पहिला गुरुवार; जाणून घ्या व्रताचे महत्त्व

आज मार्गशीर्षातील पहिला गुरुवार; जाणून घ्या व्रताचे महत्त्व

Subscribe

मार्गशीर्ष मासाला प्रारंभ झाला असून आज या महिन्यातील पहिला गुरुवार आहे. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते. महाराष्ट्रातील अनेक सुवासिनी अगदी मनोभावे हे व्रत करतात. प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचा घट स्थापन केला जातो. त्याची साग्रसंगीत पूजा करुन आरती केली जाते. पोथीवाचन होते. या दिवशी उपवास केला जातो. संपूर्ण महिलावर्गासाठी आनंदी, उत्साही आणि भक्तीमय असा हा महिना असतो.

- Advertisement -

बहुतांश ठिकाणी स्त्रिया हे गुरुवारचे लक्ष्मीचे व्रत करताना दिसतात. यावेळी लक्ष्मीची पूजा करुन उपवास करण्याची पद्धत आहे. तसेच सवाष्णींना वाण देण्यालाही मार्गशीर्ष महिन्यात विशेष महत्त्व आहे. आता हा महिना आणि त्यातही गुरुवार का महत्त्वाचे हे जाणून घेणे गरजेचे आहे.

जे कुणी महालक्ष्मी-व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील, त्यांना श्रीमहालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावरसुद्धा माणसाने उतू नये, नित्य नेमाने श्रीमहालक्ष्मी व्रत करावे, देवीचे मनन-चिंतन करावे; म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील; तुमची कामना पूर्ण करील असे मानले जाते.

- Advertisement -

असे केले जाते मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत

  • आंब्याच्या डहाळय़ा, चौरंगावर मांडलेला पाण्याने भरलेला कलश आणि महालक्ष्मीचं रूपात स्थापना केली जाते
  • या कलशाला सजवून आरास केली जाते. यानंतर स्तुतिपाठ, आरती, नैवेद्य दाखवला जातो.
  • या व्रतासाठी आंब्याचे डहाळे, पाच पत्री, पाच फळे, महालक्ष्मीसाठी सुवासिक वेणी, नारळ या गोष्टी मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रतासाठी लागतात.
  • लक्ष्मीला गोडोधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. स्त्रिया मनोभावे लक्ष्मीची कहाणी वाचतात. कुटुंबात धनधान्य आणि लक्ष्मीची कायम भरभराट राहावी यासाठी ही पूजा महिलांकडून केली जाते
  • दर गुरुवारी नेमाने केल्या जाणाऱ्या या पुजेचे शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते. या दिवशी हळदीकुंकू देऊन सवाष्णींना फळे तसेच इतर वाण दिले जाते.

मार्गशीर्ष गुरुवार व्रतामागील संपूर्ण कथा..

द्वापार युगात सौराष्ट्रचा राजा भद्रश्रवा हा शूर, दयाळू ,प्रजादक्ष, चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे यांचा ज्ञानी म्ह्णून प्रख्यात होता. भद्रश्रवाची राणी सुरतचंद्रिका रूपाने सुंदर, सुलक्षणी व पतिनिष्ठ होती. या दाम्पत्याला सात पुत्र आणि व एक कन्या अशी एकूण आठ अपत्ये होती.या कन्येचे नाव होते शामबाला. एकदा महालक्ष्मीच्या मनात राजप्रासादी राहण्याचा विचार आला, राजाच्या घरी निवासाने तो स्वतसहित इतरांचे भले करू शकेल तर एखादा गरीब व्यक्ती स्वतःच सर्व संपत्तीचा उपभोग घेईल असा यामागील मुख्य विचार होता. या विचाराने देवी एका म्हातारीच्या रूपात, फाटकी वस्त्रे आणि काठी घेऊन राजप्रासादात पोहचली.

राणीच्या महालाच्या दाराशी येताच एका दासीने तिला अडवत प्रश्नांचा भडीमार केला. या दासीला आपली ओळख सांगताना देवीने, “माझं नाव कमलाबाई. द्वारकेला राहते, असे सांगितले. यासोबतच आपल्या येणायचे औचित्य सांगताना “तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्‍नी होती. त्या जोडप्यात नेहमी भांडणे होत. याला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात भटकू लागली. तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली. मी तिला श्रीमहालक्ष्मी-व्रताची माहिती सांगितली. तिने ते व्रत करताच तिचे दारिद्र्य संपले व घरात समृद्धीने व आनंद मृत्यूनंतर लक्ष्मीव्रत केल्यामुळे ती दोघे पती-पत्‍नी लक्ष्मी-लोकात वैभवात राहिली. या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे, मात्र आता तिला व्रताचा विसर पडला आहे याची आठवण करून येण्यासाठी मी येथे आले आहे, असेही सांगितले”. दरम्यान, हा सगळा संवाद राणीच्या कानी पडताच तिने संतापून म्हातारीला उर्मटपणे सुनावले व निघून जाण्यास सांगितले.

राणीचा उर्मटपणा पाहून महालक्ष्मी देखील तिथे न थांबता स्वस्थानी जाण्यास निघाली , वाटेतच तिला एक मुलगी भेटली ही, मुलगी म्हणजे राजकन्या शामबाला. शामबालेने टाय म्हातारीची विचारपूस केली व झाला प्रकार कळताच तिची माफी मागितली. लक्ष्मीने देखील शामबालेला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली. हा दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता.शामबालेने हे व्रत याथसंग पूर्ण केले. यामुळे तिच्या आयुष्यात देखील सुख येऊन तिचा विवाह सिद्धेश्वर राजपुत्र मालाधर याच्याशी झाला. शामबालेचा संसार जरी सुखाने सुरु तरी भद्रश्रवा व राणी सूरतचंद्रिका यांच्या साम्राज्याला उतरती कळा लागली.

या परिस्थितीत भद्रश्रवा मुलीला भेटण्यासाठी परराज्यात गेला, हे समजताच शामबाला आणि मालाधर यांनी त्यांचा पाहुणचार केला. तसेच जेव्हा भद्रश्रवा जाण्यास निघाला तेव्हा शामबालाने पित्याला एक हंडा भरून धन दिले. हंडा घेऊन भद्रश्रवा घरी परतताच सुरतचंद्रिकेला भारी आनंद झाला. घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले. मात्र आता धनाऐवजी फक्त कोळसे होते.

या नंतर कसेबसे दिवस ढकलत असताना एकदा सुरतचंद्रिकेने लेकीच्या घरी जाण्याचे ठरवले, योगायोगाने हा मार्गशीर्षातील शेवटचा गुरुवार होता. सुरतचंद्रिका मालधराच्या राजप्रासादात पोहचताच तिने शामाबालेला व्रताचे उद्यापन करताना पाहिले. शामबालाने आईकडूनही महालक्ष्मी-व्रत करवून घेतले व तशीच काही दिवसात ती आपल्या स्वगृही परतली. या व्रताच्या प्रभावाने भद्रश्रवा याला पूर्ववैभव प्राप्त झाले.

काही दिवसांनी शामबाला आपल्या माहेरी आली होती. मात्र शामबालेने पित्याला निदान कोळश्याचा हंडा दिला मात्र आपल्याला रिकाम्या हाती पाठवले याच्या रागाने सुरतचंद्रिकेने तिचे स्वागत केले नाही. तरीही शामबालेने याचा राग न बाळगता पुन्हा सासरची वाट धरली निघताना तिने माहेरहून थोडे मीठ घेतले. पत्नी माहेरून परतताच मालाधराने शामबालेला माहेराहून काय आणलेस अशी विचारणा केली. सासरी आल्यानंतर पती मालाधर तिला विचारतो, माहेरुन काय आणणलंस? त्यावर ती उत्तरते मी तिथेलं सार आणले आहे. याचा अर्थ काय? या पतीच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी ती एक दिवस अळणी स्वयंपाक करते. जेवणातील अळणी पदार्थ चाखतो. त्यानंतर शामबाला पानात थोडसं मीठ वाढतो. त्या मीठाने साऱ्या अन्नाला चव येते.

तेव्हा शामबाला म्हणते, हेच आहे माहेरुन आणलेले सार. मीठ जीवनाचे अमृत आहे ! अन्नाला चव येते ती मिठानंच ! मीठ नसलेला पदार्थ अळणी. ज्याचं मीठ खावं, त्याच्याशी इमानी असावं. त्याचं रक्षण करावं. कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे. शामबालेच्या बोलण्यातील खोच पती जाणतो.त्यानंतर मालाधर राजा निश्चयाने उठला. त्यानं आपले सेवक सासर्‍याकडे पाठविले. त्यांना बोलावून घेतले. भद्रश्रवा जावयाकडे येतो. दोघांची गुप्त बैठक होते. मग ते भद्रश्रवांचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करतात. आणि भद्रश्रवाला राज्य पुन्हा मिळतं. त्यानंतर सुरतचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेत. आजन्म त्याचे पालन करते.

महालक्ष्मीची ही कथा, कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण ॥

ॐ महालक्ष्मी नमः । ॐ शांतिः शांतिः शांतिः शांतिः ।

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -