अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो.
- फरसबी, मटारचे दाणे, भोपळी मिरची इत्यादी भाज्या शिजवताना आधी हळद, मीठ घातलेल्या पाण्यात भाज्या शिजवाव्या. यामुळे रंग हिरवागार राहतो.
- अळूच्या वड्या करताना पाने स्वच्छ पुसून थोडेसे तेल लावावे आणि वरून पीठ पसरावे. यामुळे वड्या चुरचुरीत होतात.
- लाल भोपळा, कलिंगड, खरबूज यांच्या बिया कडक उन्हात वाळवाव्या. नंतर सोलून साठवून ठेवाव्या. पदार्थ गार्निश करण्यासाठी त्याचा उपयोग होतो.
- साबुदाण्याची खिचडी करताना मिरच्यांचे तुकडे न घालता मिरचीचा ठेचा घालावा. यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली येण्याचा धोका कमी होतो. त्याचप्रमाणे खिचडीला एकसारखा तिखटपणा मिळतो.
- पालकाच्या भाजीत पुदिन्याची पानं घालून वरून लिंबू पिळल्यास स्वाद वाढतो.
- गरम तव्यावर थालिपीठ थापता येत नाही. म्हणून एखाद्या जाड कागदावर किंवा प्लास्टिकवर थापून मग थालिपीठ तव्यावर टाकावे.
- सुगंध यावा यासाठी दही विरजताना त्यात कढीपत्त्याची दोन तीन पाने टाकावीत.
- बुंदीचे लाडू उरल्यास दूध घालून त्याची खीर करावी. ही खीर चवीला छान लागते.
- कोणतेही पीठ चाळताना चाळणीत छोटीशी वाटी ठेवावी. पीठ लवकर चाळले जाते.
- पराठ्यांसाठी पीठ भिजवताना कणकेत दोन चमचे मैदा घातल्यास पराठे मस्त खुसखुशीत होतात.
- कोफ्त्यासाठी कच्ची केळी वापराल्यास कोफ्ते एकदम पटकन चांगले कुरकुरीत होतात आणि ते जास्त तेल पण शोषून घेत नाहीत.