परदेशात उन्हाळा म्हटलं की, सर्वांसाठी आनंदमय वातावरण असतं. पण भारतातील उन्हाळा हा सर्वांनाच नकोसा असतो. घामाच्या धारा आणि कोरडी पडणारी त्वचा यामुळे भारतातील लोकांना ऊन नकोसे वाटत असते. उन्हाळ्यामध्ये त्वचेच्या बऱ्याच समस्या उद्भवतात. त्यातील सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे कोरडी त्वचा. बऱ्याचदा घरी जाताना ऊन आणि ऑफिसमध्ये वातानुकूलित वातावरणात बसल्यामुळे त्वचेच्या समस्या अधिक प्रमाणात उद्भवतात. वातावरणात ज्याप्रमाणे बदल होतो त्याप्रमाणेच तुमच्या त्वचेमध्येदेखील बदल होत असतो. अशा उन्हाळी वातावरणामध्ये त्वचेला ओलाव्याची (moisture) हायड्रेशनची जास्त प्रमाणात गरज असते. या उन्हाळ्यात आपल्या कोरड्या त्वचेची काळजी कशी घ्याल याबद्दल काही टीप्स –
भरपूर पाणी प्या –
आपली त्वचा नितळ आणि तजेलदार राहावी यासाठी तुम्ही दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्यावे. तुमच्या शरीरातील टॉक्झीन्स काढून टाकण्यासाठी याची मदत होते.
त्वचेला तेल लावून रात्री झोपा –
उन्हाळ्याच्या दिवसात नारळाच्या तेलाचा जास्त प्रमाणात उपयोग करावा. त्वचा तजेलदार आणि नितळ दिसण्यासाठी तेलाचा नैसर्गिकरित्या उपयोग होतो. रात्री झोपताना हातापायावर तेल लावून झोपावे. त्यामुळे त्वचा सकाळी मऊ राहते.
पाण्यात कडूलिंबाची पाने टाकून आंघोळ करा –
कडूलिंब, कडिपत्ता आणि हळद या तिन्ही गोष्टींमुळे त्वचेचा तजेलदारपणा जास्त उठावदार होतो. पस्तीशीनंतर शरीरावर येणाऱ्या सुरकुत्या, त्वचेला येणारी खाज यापासूनसुद्धा त्वचा निरोगी बनवते. कडिलिंबाची पाने पाण्यात टाकून आंघोळ केल्यास अंगावर घामुळं आणि खाज येत नाही. दिवसातून साधारण तीन वेळा थंड पाण्याने स्वच्छ चेहरा धुवा.
दिवसाची सुरुवात गरम पाण्यात त्रिफळा घेऊन करावी –
सकाळी उठल्यानंतर दात घासून झाल्यावर गरम पाण्यात दोन चमचे त्रिफळा चूर्ण मिसळून ते प्यावे. तसेच त्वचा चांगली राहण्यासाठी हलका आणि नियमित व्यायामदेखील करावा. यामध्ये योगा करण्यास प्राधान्य द्यावे. त्यामुळे शरीर दिवसभर निरोगी राहते आणि काम करण्यासाठी ऊर्जा मिळते.
खाण्याच्या सवयी –
उन्हाळ्यात जास्त पचायला जड खाणे न खाता जास्त प्रमाणात फळे खावीत. फळे, भाज्या, ड्रायफ्रुट्स आणि कडधान्य यांचे अधिक सेवन करावे. शरीराला जास्त ऊर्जा मिळणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. अननस, कलिंगड, काकडी, संत्र ही फळे त्वचा अधिक तजेलदार दिसण्यास मदत करतात. तेलकट पदार्थ, तसेच मैदा, साखर, कॅफेन, मांस हे पदार्थ खाण्याचे टाळावे. ताक, लिंबूपाणी, पन्हे, कोकम सरबत, आवळा सरबत अशा पित्तशामक गोष्टींचे अधिक सेवन करावे. ज्यामुळे शरीरात साखरेचे प्रमाण व्यवस्थित राहून उन्हाचा त्रास कमी होतो.