शिकलेल्या तरुण जोडप्यांमध्ये याविषयी माहिती व जागृतीचा अभाव आहे, हे खरच धक्कादायक आहे. करियर, आर्थिक सुबत्ता याकडे प्रामुख्याने नवविवाहित जोडप्यांचा कल अधिक असतो. त्यामुळे गर्भधारणा होण्यासाठी त्यांच्याकडे मोजकाच कालावधी असतो हे त्यांच्या लक्षात येत नाही किंवा कळूनही लक्ष देत नसल्याचे प्रकर्षाने जाणवते. वैयक्तिक व व्यावसायिक स्थितीनुसार केव्हा मूल होऊ द्यायचे हे ठरवण्याचे स्वातंत्र्य महिलांना आहे, परंतु हे निर्णय घेत असताना प्रजननाच्या वयाचे भानही ठेवणे गरजेचे आहे.
तिशीनंतर होणारी गर्भधारणा
* एखाद्या जोडप्याने मूल उशिरा होऊ देण्याचा निर्णय घेतल्यास त्यांनी शक्य तितक्या लवकर फर्टिलिटी स्पेशालिस्टचा सल्ला घ्यावा आणि स्त्रीमधील अंड्यांची संख्या तपासून घ्यावी.
* एएमएच लेव्हल्स या ब्लडटेस्टद्वारे महिलांच्या अंड्यांचा साठा जाणून घेता येतो. यामुळे त्यांना स्वतःची शारीरिक स्थिती समजून घेण्यासाठी व भविष्याच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी मदत होते.
* तिशीनंतर महिलांना गर्भधारणा झाल्यास त्यांनी ‘ट्रीपल स्क्रिनिंग टेस्ट’ केली पाहिजे. त्याचबरोबर चांगला आहारही घेतला पाहिजे. गर्भधारणा झाल्यावर महिलांनी स्वत:ची काळजी घेतल्यास प्रसूतीवेळी होणारी गुंतागुंत टाळता येणे सहज शक्य आहे.
* गर्भवती महिलांनी त्यांचा दिनक्रम ठरवून घेतला पाहिजे. दुपारी दोन तास त्यांनी आराम करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर रात्री सात तास शांत झोप घेतली पाहिजे. प्रसूतीवेळी गुंतागुंत झाल्यास रक्त अथवा रक्तातील घटकांची आवश्यकता असते.
समुपदेशन महत्त्वाचे
उशिराने लग्न करणार्या जोडप्यांचे लग्नाआधी समुपदेशन केले जाते. जोडप्यांची रक्ततपासणी करून काही समस्या असल्यास त्यावर उपचारही वेळेत सुरू केले जाऊ शकतात, तसेच गरदोर होण्यापूर्वी तीन महिने आधीच फॉलीक अॅसिडच्या डोसची सुरुवात केली जाते. यादरम्यान रक्तदाब आढळल्यासही त्यानुसार औषधे सुरू केली जात असून, बाळाची वाढ खुंटणार नाही याची दक्षता घेतली जाते.
– डॉ. गंधाली देवरुखकर, स्त्री रोग विशेषज्ञ