सभेतली माणसं अचानक उठून जाऊ लागली…व्यासपीठावरच्या नेत्यांना त्यांच्या गॉगलमधून हे विदारक दृश्य दिसू लागलं.
…मारणार्याचा हात धरता येतो किंवा माइकसमोर बोलणार्या माणसालाही चिठ्ठी पाठवून थांबवता येतं म्हणजचे त्याचं तोंड धरता येतं…पण सभेतली माणसं उठून जायला लागल्यावर काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला आहे!…
…ज्यांच्या सभांना गर्दीच होत नाही त्यांच्या सभांचं एकवेळ ठीक असतं…त्यांना माणसं उठली काय आणि भर सभेतून उठून गेली काय!…कशाचं सोयरसुतक नसतं…
…पण ज्याच्या नुसत्या नावाने सभेच्या ठिकाणची धरणी आतबाहेर थरारून जाते त्याच्या सभेला जमलेली माणसं उठून जायला निघाली की बरेच प्रश्न निर्माण व्हायला लागतात…प्रश्न कसले, नको नको ते संशयच निर्माण होतात…
…त्या दणदणत्या वक्त्याच्या समोरची गर्दी ओसरायला लागल्याचे मथळे वर्तमानपत्रात तरंगू लागतात…वय होऊ लागताच डोईवरचे केस विरळ होऊ लागावे तशा सभेतल्या रिकाम्या खुर्च्या टीव्हीवर दिसू लागतात…
…वक्त्याच्या लोकप्रियतेचा दर विकास दरासारखा घसरू लागल्याची कुजबुज कानोकानी सुरू होऊ लागते…थोडक्यात सांगायचं तर पुर्वी वक्त्याच्या भाषणाला आपल्याला आलेली जांभई जे लोक तोंडातल्या तोंडात लपवायचे ते आता वक्त्याच्या तोंडावर देऊ लागतात…
…भाड्याची माणसं जमवल्याच्या शंका येऊ लागतात…कारण आता भाड्याने जमवलेली माणसंही कधी वक्त्याचा डोळा चुकवत तर कधी वक्त्याच्या डोळ्यादेखत सभेतून उठून पोबारा करतात…
…वक्त्याचं अपयश तर दिसू लागतंच…पण माणसं जमवणार्या माणसांचं अपयशही दिसू लागतं…
…गर्दी का जमत नाही ह्यावर सभेनंतर तिथल्या तिथे चिंतन बैठक सुरू होते…सभेतल्या मागच्या रांगा की पुढच्या रांगा विरळ होताहेत ह्यावर संशोधन सुरू होतं…
…सभेला गोरेगोमटे की सावळे लोक येताहेत ह्याची पाहणी सुरू होते…वक्त्याची लोकप्रियता शहरी की ग्रामीण भागात ओसरतेय ह्याचं सर्वेक्षण सुरू होतं…
…सगळ्या दृष्टीने, सगळ्या बाजुंनी हा शोध सुरू झाला की एके दिवशी पाहणी अहवाल येतो…त्यात निष्कर्ष काढला जातो की वक्त्याचं भाषण एकसुरी होतंय आणि तेच तेच मुद्दे त्याच वरच्या पट्टीत रेकले जाताहेत…
…पुर्वी वक्त्याचं भाषण लोकांना हळुवार गझल वाटायची…आता कर्कश्य कव्वाली वाटतेय!…
– अँकर