बीड जिल्ह्यातील बीड हा क्रमांक २३० वा विधानसभा मतदारसंघ आहे. राज्याच्या राजकीय संघर्षात काका-पुतण्यांच्या लढतीचा मोठा इतिहास पाहायला मिळतो. याच काका-पुतण्यांच्या लढतीमध्ये आणखी एका घराण्याचे नाव सामील झाले आहे. ते म्हणजे बीडचे क्षीरसागर कुटुंब. राजकीय महत्त्वाकांक्षेतून क्षीरसागर कुटुंबात उभी फूट पडली आणि जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात त्यांचा पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी दंड थोपटले. शिवसेनेचे सुरेश नवले हे याच मतदारसंघातून दोनदा आमदार झाले. यापेकी एका टर्मला तर मंत्रीसुद्धा राहिले होते. त्यांच्या नंतर सुनील धांडे हे शिवसेनेच्या तिकीटावर बीडचे आमदार झाले. एखादा अपवाद वगळता बीड विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशीच परंपरागत लढत राहिली आहे.
मतदारसंघ क्रमांक – २३०
मतदारसंघ आरक्षण – खुला
मतदारांची संख्या
पुरुष – १,५६,९९८
महिला – १,३३,८४६
एकूण मतदार – २,९०,८४५
विद्यमान आमदार – जयदत्त क्षीरसागर, राष्ट्रवादी
दिवंगत नेत्या केशरबाई क्षीरसागर यांचे ज्येष्ठ चिरंजीव आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळातील उपनेते असलेले आमदार जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादीतील ओबीसी नेते म्हणून ओळखले जातात. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून राजकीय फडात उतरलेल्या जयदत्त क्षीरसागर यांनी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, चार वेळा आमदार, उपमंत्री, राज्यमंत्री आणि कॅबीनेट मंत्री असा प्रवास केला. भूविकास बँकेचे अध्यक्ष, जिल्हा बँकेचे संचालक, राज्य मार्केटींग फेडरेशनचे संचालक, जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष यांच्यासोबत गजानन सहाकरी सुतगिरणी, गजानन सहकारी बँकेचेही अध्यक्ष आहेत. अनंत कृषी प्रतिष्ठान, विनायक युवक, प्रतिष्ठान तसेच आदर्श व नवगण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी जिल्हाभरात शिक्षण संस्थांचे जाणे उभारले आहे. अखिल भारतीय तौलिक महासभेचे ते अध्यक्ष आहेत. जयदत्त क्षीरसागर उर्जा मंत्री असतानाच शेतकऱ्यांना वीज बील माफीचा निर्णय झाला होता.
विधानसभा निवडणूक २०१४ निकाल
१) जयदत्त क्षीरसागर, राष्ट्रवादी – ७७,१३४
२) विनायक मेटे, भाजप – ७१,००२
३) अनिल जगताप, शिवसेना – ३०,६९१
४) सिरोजोद्दीन देशमुख, काँग्रेस – ८,७९०
५) सुनील धांडे, मनसे – २,१८४