आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी असलेली धारावी मुंबई शहरातला पहिला विधानसभा मतदारसंघ आहे. इथले बहुसंख्य मतदार हे मुस्लीम आहेत. त्याशिवाय, मराठी, दक्षिण भारतीय आणि काही प्रमाणात गुजराती मतदारही आहेत. त्याचा परिणाम साहजिकच इथल्या उमेदवार निवडीवर आणि आमदार निवडीवर देखील होतो. अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात आजपर्यंत भाजपला आपला आमदार निवडून आणता आलेला नाही. प्रामुख्याने काँग्रेसचंच वर्चस्व इथे राहिलं आहे. १९९९मध्ये एकदा इथे शिवसेनेचे बाबुराव माने निवडून आले होते. त्याव्यतिरिक्त हा काँग्रेसचाच गड मानला जातो. धारावी पुनर्विकासाचा मुद्दा गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. शिवाय इथल्या नागरी समस्यांनी उग्र रूप धारण केलं आहे. हे मुद्दे प्रत्येक निवडणुकीत चर्चेला येतात. या मतदारसंघात एकूण २७५ मतदान केंद्र आहेत.
मतदारसंघ क्रमांक – १७८
मतदारसंघ आरक्षण – अनुसूचित जाती
मतदारांची संख्या
पुरुष – १,३८,०८३
महिला – १,००,९९०
एकूण मतदार – २,३९,०७३
विद्यमान आमदार – वर्षा गायकवाड, काँग्रेस
एकनाथ गायकवाड यांनी खासदारकीकडे मोर्चा वळवल्यापासून त्यांच्या पुत्री वर्षा गायकवाड या मतदारसंघातून आमदारकीसाठी निवडणूक लढवतात. २००४, २००९ आणि २०१४ या तीन टर्म वर्षा गायकवाड सलग इथून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. या कालावधीत त्यांनी वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, पर्यटन व विशेष सहाय्य या खात्यांच्या राज्यमंत्रीपदाचा तर महिला व बालविकास विभागाच्या मंत्रीपदाचा कार्यभार सांभाळला आहे. मात्र, १५ वर्ष आमदार राहून देखील धारावीच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावण्यात त्यांना अपयश आल्याचं दिसून आलं आहे.
विधानसभा निवडणूक २०१४ निकाल
१) वर्षा गायकवाड, काँग्रेस – ४७,७१८
२) बाबुराव माने, शिवसेना – ३२,३९०
३) दिव्या ढोले, भाजप – २०,७६३
४) हनुमंत नंदीपल्ली, अपक्ष – ५३३३
५) संदीप काटके, बसप – ३१४३
नोटा – १४३६
मतदानाची टक्केवारी – ४९.४२ %