जालना जिल्ह्यातील जालना हा विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. जालना मतदारसंघ हा शहरी आणि ग्रामीण मतदारांमध्ये विभागलेला आहे. शहरी मतदारांची संख्या अधिक असल्यामुळे या मतांवर उमेदवाराचे भविष्य ठरते. जालना जिल्ह्याला बियाणांचे आगार म्हणतात. १९९० पर्यंत इथे काँग्रेसचे वर्चस्व होते. १९९० साली पहिल्यांदा अर्जुन खोतकर यांच्या रुपाने शिवसेनेने खाते उघडले. त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये दोन वेळा अर्जुन खोतकर तर दोन वेळा काँग्रेसचे कैलास गोरंट्याला निवडून आलेले आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणूकीतही दोन्ही उभय नेत्यांमधील मतांचे अंतर हे केवळ २९६ एवढे होते.
जालना मतदारसंघात मुस्लिम आणि दलित मतदारांची संख्या देखील लक्षणीय आहे. २०१४ साली बसपाच्या रशिद अब्दुल यांनी तब्बल ३६ हजार ३५० मते मिळवून चौथा नंबर गाठला होता. हीच मते पुर्वी काँग्रेसला पडत असत. २०१९ च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी इथे कोणता उमेदवार देते, त्यावरून बरीच गणिते ठरणार आहेत. वंचित बहुजन आघाडीचा फटका हा काँग्रेसलाच अधिक बसणार असल्यामुळे शिवसेना-भाजपची युती झाल्यास अर्जुन खोतकर यांचा विजय सोपा मानला जात आहे.
मतदारसंघ क्रमांक – १०१
मतदारसंघ आरक्षण – खुला
मतदारांची संख्या
पुरुष – १,५७,७७१
महिला – १,३६,६६३
एकूण मतदान – २,९४,४३४
विद्यमान आमदार – अर्जुन खोतकर, शिवसेना
अर्जुन खोतकर यांनी विविध शैक्षणिक संस्था स्थापन करुन त्यामाध्यमातून समाजकारणात आपला पाया भक्कम केलेला आहे. त्यानंतर जालना कृषी उत्पन्न बाजार समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. अर्जुन खोतकर यांनी आतापर्यंत चार वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
अर्जुन खोतकर आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यातील वाद २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत चांगलाच गाजला होता. लोकसभा लढविण्यासाठी खोतकर अडून बसले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समजूत घातल्यानंतर खोतकर यांनी माघार घेतली होती.
विधानसभा निवडणूक २०१४ निकाल
१) अर्जुन खोतकर, शिवसेना – ४५,०७८
२) कैलास गोरंट्याल, काँग्रेस – ४४,७८२
३) अरविंद चव्हाण, भाजप – ३७,५९१
४) अब्दुल रशिद, बसपा – ३६,३५०
५) रवी राऊत, मनसे – ५,५००