कोरोना विषाणूने देशाला अक्षरश: विळखा घातला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असून या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, लॉकडाऊन असताना देखील अनेकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत राज्यात लॉकडाऊन सुरु झाल्यापासून कोरोना संदर्भातील १ लाख १६ हजार गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून ५ कोटी ७५ लाख रुपये दंड आकारणी आणि ७५ हजार वाहने जप्त करण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
२३ हजार ३१४ व्यक्तींना अटक
राज्यात २२ मार्च रोजी पहिले लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. त्या दिवसापासून २७ मेपर्यंत २३ हजार ३१४ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तर विविध गुन्ह्यांसाठी ५ कोटी ७५ लाख ३० हजार २६७ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
पोलिसांवर २५४ हल्ले
कोरोनाला रोखण्यासाठी डॉक्टर्स, नर्स, वैद्यकीय प्रशासन आणि पोलीस प्रशासन अहोरात्र मेहनत घेत आहेत. मात्र, अशा दरम्यान, अनेक गुन्हे देखील घडले आहेत. यामध्ये पोलिसांवर हल्ले करण्याचा २५४ घटना घडल्या आहेत. त्यातील ८३३ व्यक्तींना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर पुढील कारवाई सुरु सुरु आहे.
या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १ हजार ३२३ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच ७५ हजार ८१३ वाहने जप्त करण्यात आली. तसेच परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसाचे उल्लंघन केल्याचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.
१०० नंबरवर ९६ हजार फोन
पोलीस विभागाचा १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. मात्र, लॉकडाऊनच्या काळात या फोनवर ९६ हजार ६९७ फोन आले असून त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली आहे.
हेही वाचा – Corona: दिलासादायक! पुण्यात बरे होणाऱ्यांची संख्या निम्म्यावर