कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात शाळा अजूनही बंद आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ऑनलाईन शाळा आणि क्लासरूमचा पर्याय दिला असून त्या माध्यमातून सध्या राज्यात अनेक ठिकाणी शाळा सुरू आहेत. मात्र, सर्वच विद्यार्थ्यांना मोबाईल उपस्थित नसेल, असं म्हटलं जात होतं. राज्यातल्या मोठ्या संख्येने गरीब वर्गामध्ये ऑनलाईन शाळेचे वर्ग पाहाता येतील, असे मोबाईलच उपलब्ध नसल्यामुळे या वर्गातली शाळकरी मुलं शिक्षणापासून वंचितच राहात होती. त्यावरून टीका होत असतानाच एक गंभीर घटना समोर आली आहे. ऑनलाईन शाळेसाठी मोबाईल घेण्याची ऐपत नव्हती, म्हणून एका १०वीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा प्रकार साताऱ्याच्या कराडमध्ये घटला आहे.
साक्षी पोळ असं या १५ वर्षीय मुलीचं नाव असून ती दहावीत होती. मात्र, कोरोनामुळे शाळा बंद झाल्या आणि ऑनलाईन शाळा सुरू झाली. पण घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे मोबाईल घेण्याची ऐपत तिच्या आईची नव्हती. साक्षी लहान असतानाच तिच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यामुळे आईनंच मोलमजुरी करून साक्षी आणि तिच्या लहान भावाला वाढवलं होतं. पण ऑनलाईन क्लाससाठी स्मार्ट फोन आवश्यक असताना तो तिच्यासाठी उपलब्ध होऊ शकत नव्हता.
परिस्थितीमुळे मोबाईल घेता येत नसल्यामुळे साक्षीनं नैराश्यातून हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, अशा प्रकारचं टोकाचं पाऊल न उचलण्याबाबत प्रशासन आणि सामाजिक संस्थांकडून आवाहन करण्यात येत आहे.